Thursday, February 5, 2026

पुणे...

 पुणे...

News in Editing in Process...


"पुणे शहरात सामाजिक उपक्रमात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या आंबेगाव पठार ज्येष्ठ नागरिक संघ व हृदयमित्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हृदयविकारासंबंधी जनजागृती करणारे आरोग्य शिबिर उत्तम प्रतिसादात संपन्न; 106 ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी, 55 ज्येष्ठ नागरिकांची मोफत ईसीजी; ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांसाठी लढणारे शिलेदार भरतकाका बाबर यांच्या कार्याचे कौतुक"....


पुणे, 05 : पुणे शहरामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या न्याय व हक्कांसाठी लढणारी प्रसिद्ध सामाजिक संघटना "आंबेगाव पठार ज्येष्ठ नागरिक संघ" नेहमीच वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवून समाजातील विविध घटकांची सेवा करण्याचा प्रयत्न करत असते. आंबेगाव पठार परिसरातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते भरत काका बाबर त्यांच्या ज्येष्ठ नागरिक संघातील पदाधिकारी, कार्यकर्ते व सहकारी यांच्या मदतीने नेहमीच आंबेगाव पठार परिसरात वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवत असतात.


आंबेगाव पठार जेष्ठ नागरिक संघ आणि हृदयमित्र फाऊंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने श्री शंकर मंदिर, दांगट इस्टेट, आंबेगाव पठार येथे 'हृदयविकार संबंधी' विशेष आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले. हे शिबीर रविवारी २५ जानेवारीला घेण्यात आले त्याला आंबेगाव पठार परिसरातील शेकडो ज्येष्ठ नागरिकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. या आरोग्य शिबिरात स्थानिक जेष्ठ नागरिकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यात आली.


या शिबीरात एकूण १०६ जेष्ठ नागरिक (महिला व पुरुष) यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यापैकी ५५ ज्येष्ठ नागरिक लाभार्थ्यांच्या ECG तपासण्या पूर्णपणे मोफत करण्यात आल्या.या शिबीराचे आयोजन जेष्ठ नागरिकांच्या हृदयआरोग्याबाबत जागृती निर्माण करणे आणि वेळीच योग्य तपासणी व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने करण्यात आले होते.


हे शिबीर हृदयरोग तज्ज्ञ डॉ. राहुल सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. डॉ. सावंत हे MBBS, MD, MRCP (लंडन), CCT Cardiology (केंब्रिज, यूके), FACC (USA) असे उच्च पदवीधर तज्ज्ञ असून, हृदयमित्र फाऊंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष आहेत. त्यांनी शिबीरात जेष्ठ नागरिकांना हृदयाच्या आरोग्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. हृदयविकाराच्या जोखीम घटक, जीवनशैलीतील बदल, नियमित व्यायाम, आहार नियंत्रण, तणाव व्यवस्थापन आणि वेळीच तपासणीचे महत्त्व याबाबत त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.


त्यांच्या सोप्या आणि प्रभावी शैलीमुळे जेष्ठांना हृदयआरोग्याचे महत्त्व पटले. आजच्या काळामध्ये हृदय रोगाचे प्रमाण खूप वाढलेले आहे अशा वेळेस असे हृदयरोगासंदर्भात जनजागृती करणारे आरोग्य शिबिर होणे खूप गरजेचे आहे.

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

या आरोग्य शिबीराला पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३८ मधील नवनिर्वाचित नगरसेविका सौ. प्रतिभाताई  चोरघे यांनी भेट दिली. जेष्ठ नागरिक संघाच्या संचालिका श्रीमती अंजली कुलकर्णी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी शिबीराच्या आयोजनाचे कौतुक करताना, जेष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे सांगितले.


आंबेगाव पठारावरील प्रमुख सामाजिक कार्यकर्ते श्री. दत्तात्रय  वीर, श्री. दशरथ पवार, श्री. सचिन शेवते, श्री. सतीश जगताप, श्री. नंदकुमार देवगिरीकर आणि श्री.दत्तात्र्य बोरगे यांनीही शिबीरास भेट देऊन सहभाग वाढवला. 


जेष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष प्रा. काका सुर्यवंशी, श्री. भास्कर सातपुते,श्री. नारायण उल्हाळकर,श्री. सुर्यकांत ढोरे, श्री. भीमराव चव्हाण,वर्धमान सोसायटीचे चेअरमन श्री. बापूसाहेब शिरोळे,श्री. रुपनवर आणि श्री. सोमनाथ पाटील यांनी शिबीर यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.


या आरोग्य शिबीराच्या यशात जेष्ठ नागरिक संघाचे संस्थापक व अध्यक्ष श्री. भरत काका बाबर यांचे मोलाचे योगदान राहिले. जेष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी ते सातत्याने स्तुत्य उपक्रम राबवित असतात. त्यामुळे उपस्थितांनी त्यांचे विशेष आभार मानले.

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now

"आमच्या आंबेगाव पठार जेष्ठ नागरिक संघामार्फत वेगवेगळे सामाजिक उपक्रम नेहमीच राबवले जातात. हे आरोग्य शिबीर आंबेगाव पठार परिसरातील जेष्ठ नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले असून, समाजातील विविध स्तरांतील लोकांनी एकत्र येऊन जेष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठी केलेला हा सामूहिक प्रयत्न कौतुकास्पद आहे. अशा उपक्रमांमुळे जेष्ठ नागरिकांना आरोग्यसेवा मिळण्यासाठी आमचे ज्येष्ठ नागरिक संघातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सहकारी, हृदयमित्र फाउंडेशन व  नागरिकांचेही आम्हाला नेहमीच सहकार्य असते. आमच्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांची सेवा करण्याची आम्हाला संधी मिळते हे आम्ही आमचे भाग्य समजतो." अशी प्रतिक्रिया जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते भरत काका बाबर यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.


आंबेगाव पठार जेष्ठ नागरिक संघ व हृदयमित्र फाउंडेशन पुणे या सामाजिक संस्थेचा हृदयविकारासंबंधीचा जनजागृती करणारा हा उपक्रम खूपच कौतुकास्पद आहे.


"पुणे शहरातील आंबेगाव पठार परिसरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भरत काका बाबर नेहमीच या परिसरातील नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्याचे प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतात. या परिसरातील पाणी प्रश्न असो, रस्त्याचे प्रश्न असो अशा नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांसाठी नेहमीच आवाज उठवताना दिसतात. ज्येष्ठ नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी ते नेहमीच वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवताना दिसतात. तरुण पिढीलाही लाजवेल अशा ऊर्जेने काम करणाऱ्या भरत काका बाबर यांच्या सामाजिक कार्याला या परिसरातील लोकांकडून खूप मोठी पसंती मिळत आहे."


भारतात तसेच महाराष्ट्रात आज हृदयविकारांचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावरती वाढलेले आहे अशा वेळेस जेष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून हृदयरोग विषयी जनजागृती करणारे व ज्येष्ठ नागरिकांच्या हृदयाची काळजी घेणाऱ्या असे सामाजिक उपक्रम राबवणे ही काळाची गरज आहे.

Monday, February 2, 2026

"महाराष्ट्रातील लाखो भाविक - भक्तांना भक्तीचे वेड लावणारा, लाखो भाविकांना ऊर्जा देणारा, माघ पौर्णिमेच्या चांदण्या रात्री रंगला श्रीनाथ म्हस्कोबा व जोगेश्वरी मातेचा पारंपरिक विवाह सोहळा; श्री क्षेत्र वीर येथे सवाई सर्जाचं चांगभलं च्या जयघोषात मंत्रमुग्ध झाला लाखो भाविक - भक्तांचा जनसागर".


पुरंदर, वीर, दि.02 :  महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुणे जिल्ह्यातील, पुरंदर तालुक्यातील  प्रसिद्ध देवस्थान क्षेत्र वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा व जोगेश्वरी माता यांचा ऐतिहासिक विवाह सोहळा रविवारी मानकरी, सालकरी, पाटील, पुरोहित  यांच्या उपस्थितीत, फटाक्यांच्या आतिषबाजीत, माघ पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रकाशात, ढोल-ताशांच्या गजरात, उत्साहात, पारंपारिक पद्धतीने, भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.


महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध अशी क्षेत्र वीरची ऐतिहासिक यात्रा महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेला भक्तीची ऊर्जा देणारा महाउत्सव असतो.

क्षेत्र वीर येथे श्रीनाथ म्हस्कोबा महाराज व जोगेश्वरी माता यांच्या पारंपरिक विवाह सोहळ्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातुन आलेला लाखो भाविक भक्तांचा जनसमुदाय "सवाई सर्जाचं चांगभलं" च्या गजरात, भक्तिमय वातावरणात मंत्रमुग्ध होऊन गेला.

रविवारी पहाटे ५ वाजता मंदिरात देवाची पूजा होऊन, मुख्य गाभारा बंद करण्यात आला, सहा वाजता मुख्य गाभारा  खुला करून सकाळी देवाला अभिषेक करण्यात आला. 

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

यानंतर सकाळी १०.३० वाजता देवाला दहीभाताची पूजा बांधण्यात आली. दुपारी बारा वाजता धुपारती होऊन मंदिराचा मुख्य गाभारा बंद करण्यात आला. यानंतर दुपारी १ वाजून १५ मिनिटांनी मुख्य गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात आला.

पुरंदर तालुक्यातील प्रसिद्ध  श्री क्षेत्र कोडीतची मानाची काठी - पालखी घेऊन  मानकरी, सालकरी, ग्रामस्थ मंडळी यांचे सायंकाळी सात वाजता क्षेत्र वीर येथे आगमन झाल्यानंतर, देवाची धुपारती घेऊन वीर गावचे मुकादम पाटील, सर्व विश्वस्त व ग्रामस्थ मंडळी, मानकरी, दागिनदार, सालकरी मंडळी यांच्या उपस्थितीत त्यांची सन्मानाने भेटाभेट होऊन, वाजत गाजत स्वागत करण्यात आले. 

यावेळी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवून, योग्य ती काळजी घेऊन व्यवस्थित नियोजन केले. यानंतर मानाची काठी, देवाची पालखी पालखी स्थळावर स्थानापन्न झाली. रात्री ११.३० वाजता समस्त राऊत मंडळींच्या वतीने देवाला पोषाख करून, देवदेवतांना आवाहन करून,विधी करण्यात आले. श्रीनाथ म्हस्कोबा देवाच्या उत्सवमूर्ती पालखीत ठेवून ढोल ताशाच्या गजरात तसेच कोडीतचीही पालखी बाहेरून अंधारचिंच येथे मानाच्या काठीच्या भेटाभेटीच्या पारंपरिक सोहळ्यासाठी  आल्या.

यावेळी शिंगाडे, तरडे, बुरुंगले, व्हटकर, ढवाण या मानकऱ्यांना फुलांच्या माळा घालण्यात आल्या. 

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now

वाई व कन्हेरी पालख्यांसह मानाच्या काठ्यांची भेटाभेट होऊन,भक्तिमय वातावरणात सर्व पालख्या देऊळवाड्यात आल्या.

एक मंदिर प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर चंद्रकांत ज्ञानोबा धुमाळ (मुकादम पाटील) यांच्या हस्ते विधिवत मंत्रोपचार होऊन मध्यरात्री पावणे तीन वाजता श्रीनाथ म्हस्कोबा  व जोगेश्वरी माता  यांच्या लग्न सोहळ्याला सुरुवात झाली. 

रात्रीच्या चंद्राच्या प्रकाशात लग्नाच्या सात मंगलाष्टका होऊन, २ वाजून ५५ मिनिटांनी पारंपरिक शाही लग्न सोहळा संपन्न झाला. यावेळी पुरोहित दिपक थिटे, संतोष थिटे यांनी पौराहित्य केले. यानंतर सर्व काठ्या - पालख्या पारंपारिक प्रदक्षिणेसाठी गेल्या.

वीर देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून, श्रीनाथ म्हस्कोबा महाराज व जोगेश्वरी माता यांचा शाही, पारंपरिक विवाह सोहळा महाराष्ट्रातील हजारो भाविकांना ऑनलाईन यूट्यूबच्या चॅनेलच्या माध्यमातून पाहता आला.

"श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टमार्फत  या पारंपरिक लग्न सोहळ्यासाठी लाईट, जनरेटर, पालखी मार्ग व्यवस्थापन, विद्युत रोषणाई, परिसर स्वच्छता, आवश्यक कर्मचारी, स्वयंसेवक, ट्राफिक पोलीस इत्यादीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती वीर देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त  मोहनराव धुमाळ यांनी दिली."

मंदिरात वीर देवस्थान ट्रस्ट व दिलीप धुमाळ मित्र परिवारातर्फे आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती.

Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now

यावेळी श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त, सर्व विश्वस्त आणि सल्लागार उपस्थित होते. सर्व विश्वस्त व सर्व सल्लागार या सर्व मंडळींनी वीर देवस्थान ट्रस्टतर्फे सर्व व्यवस्था पाहून, उत्तम नियोजन केले.

पुरंदर तालुका पंचायत समिती, पुरंदर आरोग्य विभाग, पुरंदर तहसीलदार कार्यालय, विद्युत वितरण कंपनी, पोलीस प्रशासन व वीर ग्रामपंचायत यांच्याकडूनही या ऐतिहासिक यात्रा सोहळ्यासाठी उत्तम व्यवस्था केली जाते.

"श्रीनाथ म्हस्कोबा महाराज व जोगेश्वरी देवीचा पारंपरिक विवाह सोहळा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो भाविकांच्या उपस्थितीत,पारंपारिक पद्धतीने, आनंदमय वातावरणात, उत्साहात संपन्न झाला. आमच्या देवाचा कृपाआशीर्वाद नेहमीच आमच्या पाठीशी असतो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो भाविक - भक्तांची सेवा करण्याची आम्हाला संधी मिळते हे आमचे खूप मोठे भाग्य आहे." अशी प्रतिक्रिया श्रीनाथ म्हस्कोबा वीर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त राजेंद्र धुमाळ यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.

"काशीखंडाचे काळभैरव श्रीनाथ म्हस्कोबा महाराज आणि माता जोगेश्वरी यांचा पारंपरिक विवाह सोहळा रविवारी संपन्न झाला. संपूर्ण महाराष्ट्र तथा देश विदेशातून भाविक - भक्तांनी या सोहळ्याला हजेरी लावली. काशीचे क्षेत्रपाल काळभैरव आपल्या दक्षिण अवतारात वेगवेगळ्या लीला करत अनेक ठिकाणी गेले. त्यापैकी श्री क्षेत्र वीर हे एक ठिकाण आहे. पौराणिक लोककथेनुसार माघ पौर्णिमेला रविवारच्या दिवशी देव वीरगावी आले. त्यांनी भक्त कमळसिद्ध यांची सत्व परीक्षा घेतली. त्यानंतर त्यांनी वीर गावाला आपले क्षेत्र बनवले. भक्त कमळसिद्ध आणि त्यांची पाच मुले, राऊत, जमदाडे व वीरगावचे गावकरी यांनी देवाचा एक उत्सव सुरू केला तोच हा वीर यात्रेचा उत्सव. या ठिकाणी प्रत्येक समाजाने आपली आपली सेवा अर्पण केली. त्यानुसार नवीन रितीरिवाज सुरू झाले. दिवसेंदिवस अनेक भाविक - भक्तांना प्रचिती येत गेली तसे या उत्सवाचे स्वरूप वाढत आहे.यंदा योगायोगाने विवाह सोहळ्यासह यात्रेची सुरुवातही रविवारच्या दिवशी झाली. विवाह आणि यात्रा उत्सव सोहळा हा सामाजिक एकोप्याचे दर्शन घडवतो. इथे सर्व स्तरातील लोक, गावकरी, पाहुणे, विविध गावच्या पालख्या, सासन काठ्या, मानकरी, सेवेकरी, शेतकरी, चाकरमानी, व्यावसायिक हे एक होऊन लाल रंगात न्हाऊन जातात.वर्षभर कामानिमित्त परदेशी राहत असलो तरी वर्षातून एकदा यात्रेचे दहा दिवस आम्ही वीरला येतो. इथं पावलेलं दान वर्षभर पुरते. दहा दिवसाची सेवा यात्रा वर्षभर ऊर्जा आणि प्रेरणा देत राहते." अशी प्रतिक्रिया इतिहास अभ्यासक, श्रीनाथभक्त अजय समगीर यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.

"महाराष्ट्रातील अठरापगड जाती-जमातींमधील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले क्षेत्र वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा देवाची यात्रा अठरापगड जातीतील लोकांना एकत्र आणून, भक्तीच्या धाग्यात जोडून, माणुसकी समृद्ध करणारा हा उत्सव आहे.महाराष्ट्रातील लाखो भाविकांना ऊर्जा, प्रेरणा देणाऱ्या या भक्तिमय सोहळ्याची, प्रत्येक वर्षी क्षेत्र वीर येथील या ऐतिहासिक यात्रा सोहळ्याची लाखो भाविक भक्तांना ओढ असते." अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र गर्जना न्यूजचे संपादक अजित जगताप यांनी दिली.

महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र वीर येथील ऐतिहासिक यात्रा सोहळा लाखो भाविक भक्तांना भक्ती - शक्तीची, ऊर्जा देणारा महान सोहळा असतो. 

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या लाखो भाविक भक्तांना यात्रा काळात श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर मिळणारा भक्तीचा आनंद हा अनमोल असतो.

Thursday, January 29, 2026

"महाराष्ट्राचे लोकनेते,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे महाराष्ट्र शोकसागरात; बारामतीचे हृदय हरपले, शोकाकुल वातावरणात 'महाराष्ट्राच्या लाडक्या अजितदादांवर' शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; सहकारातील शिलेदार ते महाराष्ट्राचे सत्ताकेंद्र ते शब्दाला जागणारा लोकनेता,विकासपुरुष; बारामतीकरांनो आपल्या अजितदादांचे "हे" स्वप्न पूर्ण करा"...

बारामती,दि.२९ : महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी सकाळी विमान अपघातात निधन झाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राभर  शोककळा पसरली. महाराष्ट्राचे दिलखुलास, लोकप्रिय नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यातील लाखो - करोडो लोकांना धक्का बसला. लोकनेते अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे बारामतीकरांचे हृदय हरपले.

महाराष्ट्राच्या राजकारणातील एक झंझावाती नेतृत्व, राज्याचे उपमुख्यमंत्री,लोकनेते अजित पवार यांचा २८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी एका भीषण विमान अपघातात मृत्यू झाला. बारामती येथील गोजुबावी परिसरात झालेल्या या दुर्घटनेमुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली. एका कार्यक्षम प्रशासकाचा, लोकनेत्याचा असा अकाली अंत होणे, ही राज्याच्या राजकीय इतिहासातील मोठी पोकळी मानली जात आहे.

​लोकनेते अजित पवार हे मुंबईहून बारामतीकडे जिल्हा परिषदेच्या प्रचारासाठी येत असताना बुधवारी 'लिअरजेट ४५' या खाजगी विमानाने प्रवास करत होते. सकाळी ८:४५ च्या सुमारास बारामती विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न करत असताना दाट धुक्यामुळे वैमानिकाला धावपट्टीचा अंदाज आला नाही. 'गो-अराउंड' (पुन्हा हवेत उडणे) करण्याच्या प्रयत्नात तांत्रिक बिघाड झाल्याने, विमान शेतात कोसळले आणि क्षणात आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या भीषण दुर्घटनेत अजित पवारांसह पाच जणांनी प्राण गमावले.

या दुर्दैवी घटनेने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली. 29 जानेवारी रोजी बारामतीतील विद्या प्रतिष्ठान मैदानावर बारा वाजून आठ मिनिटांनी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पार्थ व जय पवार यांनी अजित पवारांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. यावेळी जमलेल्या लाखो लोकांनी व बारामतीकारांनी अश्रूंचा बांध फोडत,आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक प्रमुख नेते त्यावेळी उपस्थित होते.

"ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासामध्ये महत्त्वाचे योगदान असणारे लोकनेते, राज्याच्या प्रशासनावर उत्तम पकड असलेले ध्येयवादी नेते अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे राज्यातील लाखो लोकांचा काळजाचा ठोका चुकला. हजारो बारामतीकर, लाखो अजितदादा प्रेमी शोकसागरात बुडून गेले."

"माझ्या बारामती शहराला देशातील क्रमांक एकचे विकसित शहर बनवायचे आहे." हे लोकनेते अजित पवार यांचे स्वप्न आता बारामतीकरांनाच पूर्ण करावे लागणार आहे. बारामतीकर जनता ही योग्य नेतृत्वाची निवड करून, बारामतीच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या नेत्यांच्या  पाठीशी खंबीरपणे उभी राहते. 

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांची राजकीय कारकीर्द ही केवळ एका व्यक्तीची यशोगाथा नसून, महाराष्ट्राच्या राजकारणातील एका प्रगल्भ आणि कार्यक्षम नेतृत्वाचा प्रवास आहे. सहकार क्षेत्रापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास सत्तेच्या सर्वोच्च शिखरापर्यंत जनसेवेतून पोहोचला.

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

महाराष्ट्राच्या राजकारणात 'दादा' या नावाने लोकप्रिय असलेले अजित पवार हे एक असे नेतृत्व होते, ज्यांच्या नावाशिवाय राज्याच्या राजकारणाची चर्चा पूर्ण होऊ शकत नाही. निर्भीड,स्पष्टवक्तेपणा, प्रशासकीय पकड आणि वेळेचे पक्के नियोजन या गुणांच्या जोरावर त्यांनी महाराष्ट्राच्या सत्तेत स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले.

महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री, लोकनेते अजित पवार यांची प्रभावशाली राजकीय कारकीर्द ​: -

सहकारातून सत्तेच्या मुख्य प्रवाहात :

लोकनेते ​अजित पवार यांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे झाला. राजकारणाचे बाळकडू त्यांना त्यांचे काका आणि भारताचे ज्येष्ठ नेते,माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्याकडून मिळाले. १९८२ मध्ये एका सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर निवडून येऊन त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाचा श्रीगणेशा केला. १९९१ मध्ये ते पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (PDCC) अध्यक्ष झाले, जिथे त्यांनी सलग १६ वर्षे आपली पकड कायम ठेवून सहकार क्षेत्रात स्वतःचे वर्चस्व निर्माण केले.

संसदीय आणि विधानसभा कारकीर्द : 

​अजित पवार यांनी १९९१ मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. मात्र, काका शरद पवार यांच्यासाठी त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आणि राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले. १९९१ पासून ते आजतागायत त्यांनी बारामती विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले. गेल्या सात दशकांपासून बारामती आणि पवार कुटुंब हे समीकरण त्यांनी आपल्या विकासकामांच्या जोरावर घट्ट केले.

​विक्रमी 'उपमुख्यमंत्री' आणि अर्थमंत्री : 

​अजित पवार यांच्या नावावर एक अनोखा विक्रम आहे – त्यांनी सहा वेळा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे अशा विविध मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळात त्यांनी ही धुरा समर्थपणे सांभाळली.

​अर्थमंत्री म्हणून दबदबा : राज्याचा अर्थमंत्री म्हणून त्यांनी ११ वेळा अर्थसंकल्प सादर केला. महाराष्ट्राच्या आर्थिक नियोजनावर त्यांची करडी नजर असायची. कामाचा उरक इतका की, सकाळी ६ वाजल्यापासून त्यांचे दौरे आणि बैठका सुरू व्हायच्या.

महत्त्वाची पदे आणि योगदान :

​अजित पवार यांनी जलसंपदा, ऊर्जा, नियोजन, ग्रामीण विकास आणि वित्त अशा महत्त्वाच्या खात्यांचे कॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहिले.

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now

१. सिंचन क्षेत्र : राज्याच्या सिंचन क्षमतेत वाढ करण्यासाठी त्यांनी अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लावले.

२. पायाभूत सुविधा : बारामती, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराचा कायापालट करण्यात, पुणे मेट्रो आणि रिंग रोडसारख्या प्रकल्पांना गती देण्यात अजित पवार यांचा सिंहाचा वाटा होता.

३. प्रशासकीय शिस्त : "फाईलवरची सही आणि जनतेचा प्रश्न" यात विलंब न लावण्याची त्यांची शैली अधिकाऱ्यांमध्ये धाक निर्माण करणारी होती.

​कोणत्याही मोठ्या नेत्याप्रमाणे लोकनेते अजित पवार यांची कारकीर्द वादांपासून, धक्कादायक राजकीय वळणांपासून दूर राहिली नाही. सिंचन घोटाळ्याचे आरोप असोत किंवा पहाटेचा शपथविधी, त्यांनी अनेकदा राजकीय वादळांचा सामना केला. २०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेली फूट आणि त्यानंतर त्यांनी भाजप-शिवसेना युतीसोबत सत्तेत जाण्याचा घेतलेला निर्णय हा त्यांच्या राजकीय कारकीर्दीतील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरला. राजकीय आयुष्यात कितीही मोठी संकटे, अडचणी आल्या तरी आपण घेतलेल्या राजकीय निर्णयाशी ठाम राहून अजित पवार यांनी लोकांसाठी विकास कामांच्या माध्यमातून प्रामाणिकपणे पोहोचण्याचा प्रयत्न केला.

​अजित पवार हे केवळ बारामतीचे नेते नव्हते, तर ते विकासाची दूरदृष्टी असलेले महाराष्ट्राचे  लोकनेते होते. 'नियोजन' आणि 'अंमलबजावणी' यांचा संगम त्यांच्या कामात दिसायचा.

२८ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या विमान अपघातात त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राने एक असा नेता गमावला आहे, जो शेवटच्या श्वासापर्यंत राज्याच्या विकासाचा, जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचा विचार करत होता.

अजित पवार यांची कार्यशैली ही 'शब्द दिला तर तो पाळायचाच' आणि 'कामात कसलीही तडजोड नाही' यावर आधारलेली होती. 

अजित पवार यांनी राबवलेल्या ऐतिहासिक योजना :

पुणे आणि पिंपरी-चिंचवडचा कायापालट : आज आपण जे आधुनिक पुणे आणि पिंपरी-चिंचवड पाहतो, त्याचे नियोजन अजित दादांनीच केले होते. विशेषतः 'नदी सुधार प्रकल्प' आणि मेट्रो रेल्वे प्रकल्पांना त्यांनी आर्थिक बळ दिले.

​जलयुक्त शिवार व सिंचन प्रकल्प : जलसंपदा मंत्री असताना त्यांनी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक प्रलंबित धरणांची कामे मार्गी लावली. 'कृष्णा खोरे विकास महामंडळा'च्या माध्यमातून त्यांनी सिंचनाचे जाळे विस्तारले.

महिलांसाठी विशेष धोरण : अर्थमंत्री म्हणून काम करताना त्यांनी महिलांच्या नावे घर खरेदी केल्यास मुद्रांक शुल्कात (Stamp Duty) १% सवलत देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता, ज्यामुळे राज्यातील हजारो महिलांना फायदा झाला.


पुणे जिल्हा परिषद शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना अमेरिकेतील जगप्रसिद्ध नासाला - अवकाश संशोधन संस्थेला भेट उपक्रम : महाराष्ट्रातील पहिला असा कार्यक्रम आहे ज्यात ग्रामीण शाळांतील विद्यार्थ्यांना थेट नासा भेटीची संधी दिली जाते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्यातील अधिकारी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवत असतात. २०२५ मध्ये निवडलेल्या २५ विद्यार्थ्यांनी नोव्हेंबरमध्ये अमेरिकेला भेट दिली, ज्यात नासाच्या कॅनेडी स्पेस सेंटर, स्मिथसोनियन नॅशनल एअर अँड स्पेस म्युझियम आणि सॅन फ्रान्सिस्कोतील टेक कंपन्यांचा समावेश होता. डिसेंबर २०२५ पर्यंत ते परतले. इस्रो भेटीही ऑक्टोबर २०२५ मध्ये आयोजित करण्यात आल्या.

Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now

बारामती विकास मॉडेल : बारामतीला सौर ऊर्जेवर चालणारे शहर बनवणे, तिथे अत्याधुनिक रस्ते आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शैक्षणिक संस्था (विद्या प्रतिष्ठान) उभारणे, शिक्षण, आरोग्य, उद्योग क्षेत्रातील प्रगतशील वाटचाल हे त्यांच्या विकासाचे 'मॅजिक मॉडेल' मानले जाते.

अजित पवार यांचे भाषण म्हणजे रोखठोक आणि थेट संवाद असायचा. त्यांच्या भाषणाचे काही खास पैलू :

वेळेचे भान : ते भाषणांमध्ये कधीही वेळ वाया घालवत नसत. त्यांच्या भाषणाची सुरुवात आणि शेवट नेहमी वेळेतच होत असे.

​अधिकाऱ्यांना सज्जड दम : "काम करा, अन्यथा खुर्च्या खाली करा," अशा शब्दांत ते भरसभेतून अधिकाऱ्यांना तंबी द्यायचे, ज्यामुळे जनतेमध्ये त्यांची 'काम करणारा नेता' अशी प्रतिमा तयार झाली.

हजरजबाबीपणा : पत्रकारांनी कितीही अवघड प्रश्न विचारले तरी ते आपल्या खास शैलीत आणि कधीकधी विनोदी अंगाने त्याचे उत्तर देत. "माझं चुकलं तर मी जाहीरपणे मान्य करतो," ही त्यांची वृत्ती त्यांच्या भाषणांमधून अनेकदा दिसून आली.

सकाळी ६ ची वेळ : राजकारणात 'पहाटेचा शपथविधी' जितका गाजला, तितकीच त्यांची 'सकाळी ६ ची वेळ' प्रसिद्ध होती. ते पहाटे ६ वाजता प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी करायचे. पुण्यातील पुलांची कामे असोत किंवा रस्त्यांची, अधिकारी त्यांच्या भेटीमुळे नेहमी सतर्क असायचे.

​शिस्तप्रिय स्वभाव : एकदा मंत्रिमंडळाच्या बैठकीत उशिरा येणाऱ्या मंत्र्यांना त्यांनी जाहीरपणे टोकले होते. "जर आपल्याला जनतेने सेवा करण्यासाठी पाठवले असेल, तर आपण वेळेवर पोहोचलेच पाहिजे," असे त्यांचे मत होते.

बारामती ते मंत्रालय : विकासाचा वस्तुपाठ

​बारामतीचा विकास हे अजित पवारांच्या कल्पकतेचे प्रगतशील रूप आहे. रस्ते, पाणी, शिक्षण आणि उद्योग या चतु:सूत्रीवर त्यांनी बारामतीचा कायापालट केला. पण त्यांचे कर्तृत्व केवळ बारामतीपुरते मर्यादित नव्हते. राज्याचे अर्थमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या तिजोरीची चावी त्यांच्याकडे असताना, त्यांनी राज्याच्या प्रत्येक कोपऱ्यात निधी पोहोचवण्याचा प्रयत्न केला. मेट्रो असो वा समृद्धी महामार्ग, दादांच्या सहीशिवाय आणि त्यांच्या पाठपुराव्याशिवाय प्रकल्पांना गती मिळणे कठीण असायचे.

कार्यकर्त्यांचा 'दादा' : 

​अजित पवार हे कार्यकर्त्यांसाठी निव्वळ नेते नव्हते, तर ते त्यांचे पालक होते. कार्यकर्त्याच्या घरातील लग्न असो वा दु:खाची घटना, दादांची उपस्थिती तिथे असायचीच. गराडा घालून बसणाऱ्या नेत्यांपेक्षा, थेट फोन उचलून "काय म्हणतोय, काय अडचण आहे?" असे विचारणारे दादा कार्यकर्त्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत राहिले.

कधीही न भरून निघणारी पोकळी : 

​अजित पवारांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक 'अघोषित पर्व' संपले आहे. संकटाच्या काळात निर्णय घेण्याची क्षमता आणि प्रशासकीय पकड असलेला असा नेता मिळणे कठीण आहे. विमान अपघाताच्या त्या काळ्या दिवसाने महाराष्ट्राचा एक हिरा हिरावून नेला असला, तरी त्यांनी उभ्या केलेल्या विकासकामांच्या माध्यमातून 'अजित दादा' हे नाव महाराष्ट्राच्या मातीत सदैव जिवंत राहील.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गुरुवारी शोकाकुल वातावरणात, शासकीय इतमामात बारामती येथे अखेरचा निरोप देण्यात आला. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या परिसरात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पचक्र अर्पण करून, अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली.

याशिवाय विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, प्रताप जाधव, रक्षा खडसे, खासदार मुरलीधर मोहोळ, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलमताई गोऱ्हे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री छगन भुजबळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, आंध्र प्रदेशचे शिक्षण मंत्री नारा लोकेश, खासदार निरज चंद्रशेखर, मंत्री गणेश नाईक, बाबासाहेब पाटील, मकरंद पाटील, दत्तात्रय भरणे, पंकजा मुंडे, गिरीश महाजन, मंगल प्रभात लोढा, संजय राठोड, कु.आदिती तटकरे, शंभूराज देसाई, जयकुमार गोरे, शिवेंद्रराजे भोसले, प्रा. डॉ. अशोक उईके, नरहरी झिरवाळ तसेच राज्यमंत्री माधुरी मिसाळ, मेघना बोर्डीकर, आकाश फुंडकर उपस्थित होते.

प्रशासनाच्या वतीने राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी राज्यभरातील खासदार, आमदार, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, राजकीय, सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांसह सर्वसामान्य नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिला.

Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

अंत्यसंस्कारापूर्वी अजित पवार यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी विद्या प्रतिष्ठान परिसरात पहाटेपासूनच जनसागर उसळला होता. सामान्य नागरिक, शेतकरी, युवक, महिला तसेच विविध संघटनांचे प्रतिनिधी यांनी शांतपणे रांगेत उभे राहून श्रद्धांजली अर्पण केली.

महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री, लोकनेते अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर, लाखो लोकांनी  बारामती येथे येऊन त्यांच्या लाडक्या अजितदादांचे अंत्यदर्शन घेऊन,अखेरचा दंडवत केला. 

"विकासाची दूरदृष्टी असलेला जननायक, समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करणारा लोकनेता हरपल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे खूप मोठे नुकसान झालेले आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर जीवापाड प्रेम करणारा, प्रमाणिकपणे कार्य करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून कार्यकर्त्यांना बळ देणारा लोकनेता हरपल्यामुळे राज्यातील हजारो कार्यकर्त्यांनी साश्रू नयनांनी हळहळ व्यक्त केली. जनसामान्यांचा विकास केंद्रबिंदू  ठेवून प्रचंड कष्ट व मेहनत करणारा महाराष्ट्राचा लोकनेता, राजकारणातील जनसामान्यांच्या विकासासाठी लढणारा कोहिनूर हिरा हरपल्याची भावना हजारो लोकांनी व्यक्त केली."

"दादा परत या"... "अजितदादा अमर रहे"... या हृदय हेलावून टाकणाऱ्या आक्रोशात बारामतीत हजारो कार्यकर्त्यांनी अश्रूंचा बांध फोडला. लोकनेते अजित पवार यांच्यावरती मनापासून प्रेम करणाऱ्या हजारो - लाखो लोकांचे प्रेम, दुःख, आक्रोश आज संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला.