Monday, February 9, 2026

"माजी मंत्री विजय शिवतारे यांचे वर्चस्व असलेल्या पुरंदर तालुक्यातील वीर - भिवडी जिल्हा परिषद गटात अतितटीच्या लढतीत भाजपचे हरिभाऊ लोळे विजयी; वीर पंचायत समिती गणात अत्यंत चुरशीच्या लढतीत शिवसेनेचे प्रवीण जगताप "इतक्या" मतांनी विजयी; वीर पंचायत समिती गणातील "या" प्रमुख गावांमध्ये "या" उमेदवारांना किती मते मिळाली? कुणाचा पराभव नक्की कोणामुळे? वाचा सविस्तर निकाल, विश्लेषण"...


पुरंदर, वीर, दि.९ : पुणे जिल्ह्यातील, पुरंदर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या वीर-भिवडी जिल्हा परिषद गटात आणि वीर पंचायत समिती गणात मतदारांनी आपला कौल शिवसेना व भाजपच्या उमेदवारांना दिला आहे. 9 फेब्रुवारी 2026 रोजी पार पडलेल्या मतमोजणीनंतर, माजी मंत्री, पुरंदर - हवेलीचे आमदार विजय शिवतारे यांचे वर्चस्व असलेल्या वीर - भिवडी जिल्हा परिषद गटातून भाजपचे हरिभाऊ लोळे अतितटीच्या लढतीत 557 मतांनी विजयी झाले तर वीर पंचायत समिती गणातून शिवसेनेचे  प्रविण जगताप अत्यंत चुरशीच्या लढाईत  149 मतांनी विजयी झाले.

पुणे जिल्ह्यातील, पुरंदर तालुक्यातील वीर - भिवडी जिल्हा परिषद गटात अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली. येथे एकूण 32,449 मतदान झाले.भाजपचे  उमेदवार हरिभाऊ  लोळे  यांनी  एकूण 11 हजार, 630 मते मिळवून  विजय मिळवला.

पुरंदर तालुक्यातील वीर - भिवडी जिल्हा परिषद गटातील शिवसेनेचे उमेदवार समिर जाधव  यांनी 11,073 मते मिळवून भाजपच्या हरिभाऊ लोळे यांना कडवी झुंज दिली. समीर जाधव यांचा केवळ 557 मतांनी पराभव झाला. परिंचे गावचे माजी सरपंच असलेले समीर जाधव हे मागील अनेक वर्षांपासून परिंचे पंचक्रोशीतील गावांमध्ये विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून लोकांपर्यंत थेट पोहोचलेले आहेत. माजी मंत्री पुरंदर - हवेलीचे आमदार विजय शिवतारे यांची ताकद देखील त्यांच्या पाठीशी नेहमीच राहिलेली आहे. 

समीर जाधव यांचा जनसंपर्क, तरुणांचा पाठिंबा, सामाजिक कार्य शिवसेनेचा प्रभावशाली प्रचार असून देखील परिंचे गावातील राष्ट्रवादीचे उमेदवार पुष्कराज जाधव यांना मिळालेली  "लक्षणीय मते" व एकच गावातील दोन तुल्यबळ उमेदवारांची मतविभागणी ही भाजपच्या हरिभाऊ लोळे यांच्या विजयास व समीर जाधव यांच्या पराभवास कारणीभूत ठरल्याचे निकालावरून दिसून येते. परिंचे गावातील एकच तुल्यबळ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असता तर विजय सुकर झाला असता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार  पुष्कराज जाधव  यांना 7,038 मते मिळाली असून त्यांनी या  लढतीत आपली ताकद दाखवून दिली आहे. परिंचे गावातील दोनही तुल्यबळ उमेदवार समीर जाधव व पुष्कराज जाधव यांच्या मतविभाजनाचा फायदा भाजपचे हरिभाऊ लोळे यांना झाल्याचे निकालावरून दिसून येते.

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

पुरंदर तालुक्यातील प्रसिद्ध नेते हेमंतकुमार माहूरकर यांनी यावेळी अपक्ष निवडणूक लढवली. त्यांना यावेळी वीर - भिवडी जिल्हा परिषद  गटातील निवडणुकीत 1876 मते मिळाली. माजी जिल्हा परिषद सदस्य राहिलेल्या हेमंतकुमार माहूरकर यांचा लोकसंपर्क मोठा असताना, एवढी कमी मते मिळाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

वीर गावातील काँग्रेसचे उमेदवार नवनाथ माळवे यांना 344 मते मिळाली. कुठली मोठी राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांनी निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केलेला होता.

"पुरंदर तालुक्यात शिवसेना पक्षात अनेक वर्षांपासून काम करणारे हरिभाऊ लोळे यांनी अचानक भाजपमध्ये प्रवेश करून, वीर - भिवडी जिल्हा परिषदेसाठी भाजपचे तिकीट मिळवून, निवडणुकीत जोरदार प्रचार करून, रंगत आणली होती. माजी आमदार संजय जगताप यांचा पाठिंबा, भाजपची प्रचार यंत्रणा व हरिभाऊ लोळे यांचा राजकीय अनुभव, संघटन, सामाजिक कार्य व प्रभावशाली प्रचार यामुळे त्यांचा विजय सुकर झाल्याचे दिसून येत आहे."

पुरंदर तालुक्यातील, वीर पंचायत समिती गणातील अत्यंत चुरशीच्या लढतीत  शिवसेनेच्या प्रविण जगताप यांनी भाजपच्या सुधीर आप्पा धुमाळ यांचा अवघ्या 149 मतांनी पराभव केला.

"ऐतिहासिक वीर गाव पुणे जिल्ह्यामध्ये व महाराष्ट्रमध्ये श्रीनाथ म्हस्कोबा देवाच्या पारंपारिक यात्रेमुळे प्रसिद्ध  आहे. वीर गाव हे पुरंदर तालुक्यातील लोकसंख्येने व मतदारसंख्येने मोठे असलेले, राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण गाव आहे. वीर पंचायत समिती गणाच्या रंगतदार निवडणुकीत वीर गावातील दोन उमेदवारांच्या मतविभाजनाचा फायदा शिवसेनेचे विजयी उमेदवार प्रवीण जगताप यांना मिळाल्याचा निकालावरून दिसून येत आहे.

पुरंदर तालुक्यातील वीर पंचायत समिती गणातील अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत एकूण 15 हजार 860 मतदान झाले.

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now

शिवसेनेचे प्रवीण जगताप यांनी एकूण 5 हजार 940 मतांसह विजय मिळवला. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उत्तम धुमाळ यांना 3 हजार 264 मते मिळाली.

"वीर पंचायत समिती गणातील चुरशीच्या लढतीत भाजपचे उमेदवार सुधीरआप्पा  धुमाळ यांनी 5 हजार 791 मते मिळवून, कडवी झुंज दिली. सहकार क्षेत्रात कार्यरत असणारे, वीर गावचे सुधीरआप्पा धुमाळ शांत, संयमी, अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. भाजपची प्रभावशाली प्रचार यंत्रणा असताना देखील, वीर पंचायत समिती गणाच्या निवडणुकीत वीर गावातीलच दोन उमेदवार उभे असल्याने त्यांच्या मतविभाजनाचा फटका बसल्याने भाजपचे सुधीरआप्पा धुमाळ यांना अवघ्या 149 मतांनी पराभवाला सामोरे जावे लागले."

वीर पंचायत समिती गणाच्या निवडणुकीत वीर गावचे काँग्रेसचे उमेदवार महेश धुमाळ यांना 305 मते मिळाली तर अपक्ष उमेदवार किशोर  वचकल यांना 369 मते मिळाले. या वीर गावच्या दोन्ही उमेदवारांच्या मतविभाजणाचा फायदा शिवसेनेचे प्रवीण जगताप यांना मिळाल्याचा निवडणूक निकालावरून दिसून येते.

वीर पंचायत समिती गणातील प्रमुख गावांमध्ये उमेदवारांना मिळालेले मतदान : 

(मतदान आकडेवारी सौजन्य - निवडणूक आयोग - पुरंदर तालुका प्रशासन)

"वीर पंचायत समिती गणातील सर्वात मोठया असलेल्या वीर गावात भाजपचे सुधीरआप्पा धुमाळ यांना 1 हजार 788 मते मिळाली तर शिवसेनेचे विजयी उमेदवार प्रवीण जगताप यांना 910 मते मिळाली. वीर गावात भाजपचे सुधीरआप्पा धुमाळ यांना चांगले मतदान मिळाले त्यांनी 878 मतांची आघाडी घेतली. शिवसेनेचे प्रवीण जगताप यांना वीर गावात प्रतिस्पर्धी उमेदवार सुधीरआप्पा धुमाळ यांच्या एकूण मताच्या 50 टक्के पेक्षा जास्त मतदान मिळाल्याचे निकालाच्या आकडेवारीवरून दिसून येते."

"वीर पंचायत समिती गणातील मतदार संख्येने मोठ्या असलेल्या मांडकी गावात शिवसेनेचे उमेदवार प्रवीण जगताप यांना 1 हजार 642 मते मिळाली तर भाजपचे सुधीर आप्पा धुमाळ यांना अवघी 183 मते मिळाली. मांडकी गावचे मा. पोलीस पाटील असलेल्या प्रवीण जगताप यांना मांडकी गावातील नागरिकांनी प्रचंड मोठे मताधिक्य दिले. मांडकी गावात शिवसेनेचे उमेदवार प्रवीण जगताप यांना 1 हजार 459 मतांची आघाडी मिळाली. मांडकीकरांनी दिलेली 1 हजार 459 मतांची आघाडी शिवसेनेच्या प्रवीण जगताप यांच्या विजयात खूप महत्त्वपूर्ण ठरली. मांडकी गावात भाजपचे सुधीरआप्पा धुमाळ यांना प्रतिस्पर्धी उमेदवार प्रवीण जगताप यांच्या एकूण मतदानाच्या 30 टक्केही मतदान मिळाले नाही. हे निकालाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे."

वीर पंचायत समिती गणातील राजकीय दृष्टया महत्त्वपूर्ण असणाऱ्या परिंचे गावात शिवसेनेचे प्रवीण जगताप यांना 886 मते मिळाली तर भाजपचे सुधीरआप्पा धुमाळ यांना 928 मते मिळाली. परिंचे गावात भाजपचे सुधीरआप्पा धुमाळ यांना 42 मतांची आघाडी मिळाली.

वीर पंचायत समिती गणातील राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण असणाऱ्या जेऊर गावात शिवसेनेचे प्रवीण जगताप यांना 449 मते मिळाली तर भाजपचे सुधीरआप्पा धुमाळ यांना 242 मते मिळाली तर जेऊर गावचे राष्ट्रवादीचे नेते उत्तम धुमाळ यांना जेऊर गावातून 861 मते मिळाली.

भिवडी पंचायत समिती गणात भाजपच्या सायली शिंदे एकूण 6 हजार 791 मते मिळवुन विजयी झाल्या. भाजपचे विजयी उमेदवार सायली शिंदे यांनी शिवसेनेच्या उमेदवार पूजा मोकाशी यांचा 871 मतांनी पराभव केला.

शिवसेनेच्या उमेदवार पूजा मोकाशी यांनी 5 हजार 920 मते मिळवत चांगली लढत दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अनुजा पोमण यांना 3 हजार 611 मते मिळाली.

Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now

"पुरंदर तालुक्यात झालेल्या पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजपला चांगले यश मिळाले. जनतेसाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या लोकांना आम्ही उमेदवारी दिलेल्याचे आम्हाला समाधान आहे. तालुक्यातील भाजपच्या उमेदवारांचा विजय हा कौतुकास्पद आहे." अशी प्रतिक्रिया पुरंदर - हवेलीचे मा. आमदार संजय जगताप यांनी दिली.

"लोकनेते अजितदादा पवार यांचे पुणे जिल्हा परिषद ही प्रचंड बहुमताने जिंकण्याचे स्वप्न होते ते सर्व मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला प्रचंड मोठे बहुमत देऊन,पूर्ण केले आणि अजितदादांना श्रद्धांजली अर्पण केली. अजितदादा पवार यांचे महान कार्य तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेल्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या अथक प्रयत्नामुळे पुरंदर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला खूप चांगले यश मिळाले. पुरंदर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही अहोरात्र मेहनत करू." अशी प्रतिक्रिया पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.

"वीर - भिवडी जिल्हा परिषद गटातील निवडणूक तुल्यबळ उमेदवारामुळे चुरशीची ठरली. भाजपचे हरिभाऊ लोळे यांनी अत्यंत चुरशीच्या लढतीत समीर जाधव यांचा अवघ्या 557 मतांनी पराभव करून अनपेक्षित विजय मिळवला. राष्ट्रवादीचे पुष्कराज जाधव यांनी जोरदार प्रचार केला, मात्र अपक्ष उमेदवार बबूसाहेब माहुरकर यांच्यामुळे झालेल्या मतविभाजनाचा फटका त्यांना बसला. शिवसेनेच्या प्रविण जगताप यांनी सर्व स्तरातील कार्यकर्त्यांना एकत्र घेत, नियोजनबद्ध प्रचार केल्यामुळे त्यांचा विजय सुकर झाला. भाजपचे सुधीरआप्पा धुमाळ यांचा लोकसंग्रह मोठा होता, मात्र वीर गावातील दोन उमेदवार रिंगणात असल्याने झालेल्या मतविभाजनामुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. चुरशीच्या लढतीत लोकांचा कौल महत्त्वाचा ठरतो" अशी प्रतिक्रिया पुरंदर तालुक्यातील वरिष्ठ पत्रकार शिवदास शितोळे यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.

"पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुका हा ऐतिहासिक व सांस्कृतिकदृष्ट्या खूप समृद्ध तालुका आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये पुरंदर तालुक्यातील जनतेने पुरंदर तालुका पंचायत समितीवरती राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा जनादेश देऊन, चार जागांवरती विजय मिळवून दिला. पुरंदर तालुक्यातील दोन जिल्हा परिषद गटांमध्ये राष्ट्रवादीला यश मिळाले तर दोन जिल्हा परिषद गटांमध्ये भाजपला यश मिळाले. शिवसेनेला पंचायत समितीच्या दोन जागांवर यश मिळाले. संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेल्या वीर - भिवडी जिल्हा परिषद गटामध्ये अतितटीच्या लढाईत भाजपचे हरिभाऊ लोळे 557 मतांनी विजयी झाले. परिंचे गावातील दोन तुल्यबळ उमेदवारांच्या मतविभाजनाचा फायदा भाजपचे उमेदवार हरीभाऊ लोळे यांना झाल्याचे निकालावरून दिसून येते. वीर पंचायत समिती गणात शिवसेनेचे प्रवीण जगताप अत्यंत चुरशीच्या लढतीत 149 मतांनी विजयी झाले. वीर गावातील दोन उमेदवारांच्या मतविभाजणाचा फायदा शिवसेनेचे विजयी उमेदवार प्रवीण जगताप यांना झाल्याचे निकालावरून दिसून येते. गावचा एकच उमेदवार असता तर वीर व परिंचे गावातील तुल्यबळ उमेदवार निवडून आले असते. पुरंदर तालुक्यातील निवडून आलेल्या सर्व विजयी उमेदवारांनी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मोठे योगदान द्यावे." अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र गर्जना न्यूजचे  संपादक अजित जगताप यांनी दिली.

पुणे जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक 51 जागा जिंकून पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याचे सिद्ध केलेले आहे.

पुरंदर तालुक्यात सर्वांचे लक्ष लागलेल्या, अत्यंत चुरशीची लढत असलेल्या वीर - भिवडी जिल्हा परिषद गटात व वीर पंचायत समिती गणात जनतेने भाजप व शिवसेनेला कौल दिलेला आहे. सर्व विजयी उमेदवारांनी वीर - भिवडी गटाच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने काम करावे अशा भावना जनतेतून व्यक्त होत आहेत.

Thursday, February 5, 2026

"पुणे शहरात सामाजिक उपक्रमात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या आंबेगाव पठार ज्येष्ठ नागरिक संघ व हृदयमित्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हृदयविकारासंबंधी जनजागृती करणारे आरोग्य शिबिर उत्तम प्रतिसादात संपन्न; 106 ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी, 55 ज्येष्ठ नागरिकांची मोफत ईसीजी; ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांसाठी लढणारे शिलेदार भरतकाका बाबर यांच्या कार्याचे कौतुक"....


पुणे, 05 : पुणे शहरामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या न्याय व हक्कांसाठी लढणारी प्रसिद्ध सामाजिक संघटना "आंबेगाव पठार ज्येष्ठ नागरिक संघ" नेहमीच वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवून समाजातील विविध घटकांची सेवा करण्याचा प्रयत्न करत असते. आंबेगाव पठार परिसरातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते भरत काका बाबर त्यांच्या ज्येष्ठ नागरिक संघातील पदाधिकारी, कार्यकर्ते व सहकारी यांच्या मदतीने नेहमीच आंबेगाव पठार परिसरात वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवत असतात.


आंबेगाव पठार जेष्ठ नागरिक संघ आणि हृदयमित्र फाऊंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने श्री शंकर मंदिर, दांगट इस्टेट, आंबेगाव पठार येथे 'हृदयविकार संबंधी' विशेष आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले. हे शिबीर रविवारी २५ जानेवारीला घेण्यात आले त्याला आंबेगाव पठार परिसरातील शेकडो ज्येष्ठ नागरिकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. या आरोग्य शिबिरात स्थानिक जेष्ठ नागरिकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यात आली.


या शिबीरात एकूण १०६ जेष्ठ नागरिक (महिला व पुरुष) यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यापैकी ५५ ज्येष्ठ नागरिक लाभार्थ्यांच्या ECG तपासण्या पूर्णपणे मोफत करण्यात आल्या.या शिबीराचे आयोजन जेष्ठ नागरिकांच्या हृदयआरोग्याबाबत जागृती निर्माण करणे आणि वेळीच योग्य तपासणी व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने करण्यात आले होते.


हे शिबीर हृदयरोग तज्ज्ञ डॉ. राहुल सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. डॉ. सावंत हे MBBS, MD, MRCP (लंडन), CCT Cardiology (केंब्रिज, यूके), FACC (USA) असे उच्च पदवीधर तज्ज्ञ असून, हृदयमित्र फाऊंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष आहेत. त्यांनी शिबीरात जेष्ठ नागरिकांना हृदयाच्या आरोग्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. हृदयविकाराच्या जोखीम घटक, जीवनशैलीतील बदल, नियमित व्यायाम, आहार नियंत्रण, तणाव व्यवस्थापन आणि वेळीच तपासणीचे महत्त्व याबाबत त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.


त्यांच्या सोप्या आणि प्रभावी शैलीमुळे जेष्ठांना हृदयआरोग्याचे महत्त्व पटले. आजच्या काळामध्ये हृदय रोगाचे प्रमाण खूप वाढलेले आहे अशा वेळेस असे हृदयरोगासंदर्भात जनजागृती करणारे आरोग्य शिबिर होणे खूप गरजेचे आहे.

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

या आरोग्य शिबीराला पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३८ मधील नवनिर्वाचित नगरसेविका सौ. प्रतिभाताई  चोरघे यांनी भेट दिली. जेष्ठ नागरिक संघाच्या संचालिका श्रीमती अंजली कुलकर्णी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी शिबीराच्या आयोजनाचे कौतुक करताना, जेष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे सांगितले.


आंबेगाव पठारावरील प्रमुख सामाजिक कार्यकर्ते श्री. दत्तात्रय  वीर, श्री. दशरथ पवार, श्री. सचिन शेवते, श्री. सतीश जगताप, श्री. नंदकुमार देवगिरीकर आणि श्री.दत्तात्र्य बोरगे यांनीही शिबीरास भेट देऊन सहभाग वाढवला. 


जेष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष प्रा. काका सुर्यवंशी, श्री. भास्कर सातपुते,श्री. नारायण उल्हाळकर,श्री. सुर्यकांत ढोरे, श्री. भीमराव चव्हाण,वर्धमान सोसायटीचे चेअरमन श्री. बापूसाहेब शिरोळे,श्री. रुपनवर आणि श्री. सोमनाथ पाटील यांनी शिबीर यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.


या आरोग्य शिबीराच्या यशात जेष्ठ नागरिक संघाचे संस्थापक व अध्यक्ष श्री. भरत काका बाबर यांचे मोलाचे योगदान राहिले. जेष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी ते सातत्याने स्तुत्य उपक्रम राबवित असतात. त्यामुळे उपस्थितांनी त्यांचे विशेष आभार मानले.

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now

"आमच्या आंबेगाव पठार जेष्ठ नागरिक संघामार्फत वेगवेगळे सामाजिक उपक्रम नेहमीच राबवले जातात. हे आरोग्य शिबीर आंबेगाव पठार परिसरातील जेष्ठ नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले असून, समाजातील विविध स्तरांतील लोकांनी एकत्र येऊन जेष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठी केलेला हा सामूहिक प्रयत्न कौतुकास्पद आहे. अशा उपक्रमांमुळे जेष्ठ नागरिकांना आरोग्यसेवा मिळण्यासाठी आमचे ज्येष्ठ नागरिक संघातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सहकारी, हृदयमित्र फाउंडेशन व  नागरिकांचेही आम्हाला नेहमीच सहकार्य असते. आमच्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांची सेवा करण्याची आम्हाला संधी मिळते हे आम्ही आमचे भाग्य समजतो." अशी प्रतिक्रिया जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते भरत काका बाबर यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.


आंबेगाव पठार जेष्ठ नागरिक संघ व हृदयमित्र फाउंडेशन पुणे या सामाजिक संस्थेचा हृदयविकारासंबंधीचा जनजागृती करणारा हा उपक्रम खूपच कौतुकास्पद आहे.


"पुणे शहरातील आंबेगाव पठार परिसरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भरत काका बाबर नेहमीच या परिसरातील नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्याचे प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतात. या परिसरातील पाणी प्रश्न असो, रस्त्याचे प्रश्न असो अशा नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांसाठी नेहमीच आवाज उठवताना दिसतात. ज्येष्ठ नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी ते नेहमीच वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवताना दिसतात. तरुण पिढीलाही लाजवेल अशा ऊर्जेने काम करणाऱ्या भरत काका बाबर यांच्या सामाजिक कार्याला या परिसरातील लोकांकडून खूप मोठी पसंती मिळत आहे."


भारतात तसेच महाराष्ट्रात आज हृदयविकारांचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावरती वाढलेले आहे अशा वेळेस जेष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून हृदयरोग विषयी जनजागृती करणारे व ज्येष्ठ नागरिकांच्या हृदयाची काळजी घेणाऱ्या असे सामाजिक उपक्रम राबवणे ही काळाची गरज आहे.

Monday, February 2, 2026

"महाराष्ट्रातील लाखो भाविक - भक्तांना भक्तीचे वेड लावणारा, लाखो भाविकांना ऊर्जा देणारा, माघ पौर्णिमेच्या चांदण्या रात्री रंगला श्रीनाथ म्हस्कोबा व जोगेश्वरी मातेचा पारंपरिक विवाह सोहळा; श्री क्षेत्र वीर येथे सवाई सर्जाचं चांगभलं च्या जयघोषात मंत्रमुग्ध झाला लाखो भाविक - भक्तांचा जनसागर".


पुरंदर, वीर, दि.02 :  महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुणे जिल्ह्यातील, पुरंदर तालुक्यातील  प्रसिद्ध देवस्थान क्षेत्र वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा व जोगेश्वरी माता यांचा ऐतिहासिक विवाह सोहळा रविवारी मानकरी, सालकरी, पाटील, पुरोहित  यांच्या उपस्थितीत, फटाक्यांच्या आतिषबाजीत, माघ पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रकाशात, ढोल-ताशांच्या गजरात, उत्साहात, पारंपारिक पद्धतीने, भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.


महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध अशी क्षेत्र वीरची ऐतिहासिक यात्रा महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेला भक्तीची ऊर्जा देणारा महाउत्सव असतो.

क्षेत्र वीर येथे श्रीनाथ म्हस्कोबा महाराज व जोगेश्वरी माता यांच्या पारंपरिक विवाह सोहळ्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातुन आलेला लाखो भाविक भक्तांचा जनसमुदाय "सवाई सर्जाचं चांगभलं" च्या गजरात, भक्तिमय वातावरणात मंत्रमुग्ध होऊन गेला.

रविवारी पहाटे ५ वाजता मंदिरात देवाची पूजा होऊन, मुख्य गाभारा बंद करण्यात आला, सहा वाजता मुख्य गाभारा  खुला करून सकाळी देवाला अभिषेक करण्यात आला. 

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

यानंतर सकाळी १०.३० वाजता देवाला दहीभाताची पूजा बांधण्यात आली. दुपारी बारा वाजता धुपारती होऊन मंदिराचा मुख्य गाभारा बंद करण्यात आला. यानंतर दुपारी १ वाजून १५ मिनिटांनी मुख्य गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात आला.

पुरंदर तालुक्यातील प्रसिद्ध  श्री क्षेत्र कोडीतची मानाची काठी - पालखी घेऊन  मानकरी, सालकरी, ग्रामस्थ मंडळी यांचे सायंकाळी सात वाजता क्षेत्र वीर येथे आगमन झाल्यानंतर, देवाची धुपारती घेऊन वीर गावचे मुकादम पाटील, सर्व विश्वस्त व ग्रामस्थ मंडळी, मानकरी, दागिनदार, सालकरी मंडळी यांच्या उपस्थितीत त्यांची सन्मानाने भेटाभेट होऊन, वाजत गाजत स्वागत करण्यात आले. 

यावेळी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवून, योग्य ती काळजी घेऊन व्यवस्थित नियोजन केले. यानंतर मानाची काठी, देवाची पालखी पालखी स्थळावर स्थानापन्न झाली. रात्री ११.३० वाजता समस्त राऊत मंडळींच्या वतीने देवाला पोषाख करून, देवदेवतांना आवाहन करून,विधी करण्यात आले. श्रीनाथ म्हस्कोबा देवाच्या उत्सवमूर्ती पालखीत ठेवून ढोल ताशाच्या गजरात तसेच कोडीतचीही पालखी बाहेरून अंधारचिंच येथे मानाच्या काठीच्या भेटाभेटीच्या पारंपरिक सोहळ्यासाठी  आल्या.

यावेळी शिंगाडे, तरडे, बुरुंगले, व्हटकर, ढवाण या मानकऱ्यांना फुलांच्या माळा घालण्यात आल्या. 

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now

वाई व कन्हेरी पालख्यांसह मानाच्या काठ्यांची भेटाभेट होऊन,भक्तिमय वातावरणात सर्व पालख्या देऊळवाड्यात आल्या.

एक मंदिर प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर चंद्रकांत ज्ञानोबा धुमाळ (मुकादम पाटील) यांच्या हस्ते विधिवत मंत्रोपचार होऊन मध्यरात्री पावणे तीन वाजता श्रीनाथ म्हस्कोबा  व जोगेश्वरी माता  यांच्या लग्न सोहळ्याला सुरुवात झाली. 

रात्रीच्या चंद्राच्या प्रकाशात लग्नाच्या सात मंगलाष्टका होऊन, २ वाजून ५५ मिनिटांनी पारंपरिक शाही लग्न सोहळा संपन्न झाला. यावेळी पुरोहित दिपक थिटे, संतोष थिटे यांनी पौराहित्य केले. यानंतर सर्व काठ्या - पालख्या पारंपारिक प्रदक्षिणेसाठी गेल्या.

वीर देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून, श्रीनाथ म्हस्कोबा महाराज व जोगेश्वरी माता यांचा शाही, पारंपरिक विवाह सोहळा महाराष्ट्रातील हजारो भाविकांना ऑनलाईन यूट्यूबच्या चॅनेलच्या माध्यमातून पाहता आला.

"श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टमार्फत  या पारंपरिक लग्न सोहळ्यासाठी लाईट, जनरेटर, पालखी मार्ग व्यवस्थापन, विद्युत रोषणाई, परिसर स्वच्छता, आवश्यक कर्मचारी, स्वयंसेवक, ट्राफिक पोलीस इत्यादीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती वीर देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त  मोहनराव धुमाळ यांनी दिली."

मंदिरात वीर देवस्थान ट्रस्ट व दिलीप धुमाळ मित्र परिवारातर्फे आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती.

Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now

यावेळी श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त, सर्व विश्वस्त आणि सल्लागार उपस्थित होते. सर्व विश्वस्त व सर्व सल्लागार या सर्व मंडळींनी वीर देवस्थान ट्रस्टतर्फे सर्व व्यवस्था पाहून, उत्तम नियोजन केले.

पुरंदर तालुका पंचायत समिती, पुरंदर आरोग्य विभाग, पुरंदर तहसीलदार कार्यालय, विद्युत वितरण कंपनी, पोलीस प्रशासन व वीर ग्रामपंचायत यांच्याकडूनही या ऐतिहासिक यात्रा सोहळ्यासाठी उत्तम व्यवस्था केली जाते.

"श्रीनाथ म्हस्कोबा महाराज व जोगेश्वरी देवीचा पारंपरिक विवाह सोहळा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो भाविकांच्या उपस्थितीत,पारंपारिक पद्धतीने, आनंदमय वातावरणात, उत्साहात संपन्न झाला. आमच्या देवाचा कृपाआशीर्वाद नेहमीच आमच्या पाठीशी असतो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो भाविक - भक्तांची सेवा करण्याची आम्हाला संधी मिळते हे आमचे खूप मोठे भाग्य आहे." अशी प्रतिक्रिया श्रीनाथ म्हस्कोबा वीर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त राजेंद्र धुमाळ यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.

"काशीखंडाचे काळभैरव श्रीनाथ म्हस्कोबा महाराज आणि माता जोगेश्वरी यांचा पारंपरिक विवाह सोहळा रविवारी संपन्न झाला. संपूर्ण महाराष्ट्र तथा देश विदेशातून भाविक - भक्तांनी या सोहळ्याला हजेरी लावली. काशीचे क्षेत्रपाल काळभैरव आपल्या दक्षिण अवतारात वेगवेगळ्या लीला करत अनेक ठिकाणी गेले. त्यापैकी श्री क्षेत्र वीर हे एक ठिकाण आहे. पौराणिक लोककथेनुसार माघ पौर्णिमेला रविवारच्या दिवशी देव वीरगावी आले. त्यांनी भक्त कमळसिद्ध यांची सत्व परीक्षा घेतली. त्यानंतर त्यांनी वीर गावाला आपले क्षेत्र बनवले. भक्त कमळसिद्ध आणि त्यांची पाच मुले, राऊत, जमदाडे व वीरगावचे गावकरी यांनी देवाचा एक उत्सव सुरू केला तोच हा वीर यात्रेचा उत्सव. या ठिकाणी प्रत्येक समाजाने आपली आपली सेवा अर्पण केली. त्यानुसार नवीन रितीरिवाज सुरू झाले. दिवसेंदिवस अनेक भाविक - भक्तांना प्रचिती येत गेली तसे या उत्सवाचे स्वरूप वाढत आहे.यंदा योगायोगाने विवाह सोहळ्यासह यात्रेची सुरुवातही रविवारच्या दिवशी झाली. विवाह आणि यात्रा उत्सव सोहळा हा सामाजिक एकोप्याचे दर्शन घडवतो. इथे सर्व स्तरातील लोक, गावकरी, पाहुणे, विविध गावच्या पालख्या, सासन काठ्या, मानकरी, सेवेकरी, शेतकरी, चाकरमानी, व्यावसायिक हे एक होऊन लाल रंगात न्हाऊन जातात.वर्षभर कामानिमित्त परदेशी राहत असलो तरी वर्षातून एकदा यात्रेचे दहा दिवस आम्ही वीरला येतो. इथं पावलेलं दान वर्षभर पुरते. दहा दिवसाची सेवा यात्रा वर्षभर ऊर्जा आणि प्रेरणा देत राहते." अशी प्रतिक्रिया इतिहास अभ्यासक, श्रीनाथभक्त अजय समगीर यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.

"महाराष्ट्रातील अठरापगड जाती-जमातींमधील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले क्षेत्र वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा देवाची यात्रा अठरापगड जातीतील लोकांना एकत्र आणून, भक्तीच्या धाग्यात जोडून, माणुसकी समृद्ध करणारा हा उत्सव आहे.महाराष्ट्रातील लाखो भाविकांना ऊर्जा, प्रेरणा देणाऱ्या या भक्तिमय सोहळ्याची, प्रत्येक वर्षी क्षेत्र वीर येथील या ऐतिहासिक यात्रा सोहळ्याची लाखो भाविक भक्तांना ओढ असते." अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र गर्जना न्यूजचे संपादक अजित जगताप यांनी दिली.

महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र वीर येथील ऐतिहासिक यात्रा सोहळा लाखो भाविक भक्तांना भक्ती - शक्तीची, ऊर्जा देणारा महान सोहळा असतो. 

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या लाखो भाविक भक्तांना यात्रा काळात श्रीनाथ म्हस्कोबा महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर मिळणारा भक्तीचा आनंद हा अनमोल असतो.