Thursday, June 17, 2021

"आमदार रोहित पवार यांना बारामतीचे लेखक, शेतकरी अनिल माने यांचे 'पोल्ट्रीव्यावसायिक शेतकरी तरुणाची व्यथा' सांगणारे खुले पत्र"...

  



"आमदार रोहित पवार यांना बारामतीचे लेखक, शेतकरी अनिल माने यांचे 'पोल्ट्रीव्यावसायिक शेतकरी तरुणाची व्यथा' सांगणारे खुले पत्र"....


प्रति,

आमदार श्री.रोहित राजेंद्र पवार दादा,


जय जिजाऊ !

आपले फेसबुक अकाउंट हाताळणाऱ्या लोकांना वेळेवर पगार दाणापाणी भेटत असल्याने ते सजगपणे माझं म्हणणं आपल्यापर्यंत पोहोचवतील अशी अपेक्षा बाळगून मी फेसबुकद्वारेच आपणाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्या सोशल टीमने जरी हे म्हणणं आपल्यापर्यंत पोहोचवलं नाही, तरी निदान फेसबुकवर तुमच्यासाठी बिनपगारी काम करणारे आमचे काही मित्र तरी हे म्हणणं आपल्यापर्यंत पोहोचवतील अशी खात्री आहे. 


विषय प्रासंगिक आहे. योगेश चौरे  या आमच्या मित्राने खूप कष्टाने पोल्ट्रीव्यवसाय सुरु केला आहे. त्याचे प्रामाणिक कष्ट आम्ही पाहिले आहेत, अनुभवले आहेत.त्याने त्याच्या पोल्ट्रीतील पक्षांना लागणाऱ्या खाद्याबाबत माझ्याकडे विचारणा केली, त्यावेळी मी त्याला आपल्या बारामती ऍग्रो कंपनीचे पोल्ट्रीखाद्य घेण्याबाबत सुचवले होते. त्याने इतरही ठिकाणी विचारणा केली. शेवटी बारामती ऍग्रोचे खाद्य वापरण्याचा त्याने निर्णय घेतला.




तेव्हापासून तो नियमितपणे आपल्याच कंपनीचे खाद्य वापरतो आहे. काही काळापूर्वी आपल्या कंपनीने जो खाद्याचा लॉट पुरवला होता, त्यामुळे आपल्या पोल्ट्रीतील पक्षांचे नुकसान झाले आहे अशी त्याची आणि त्याच्या भागातील अजून काही पोल्ट्री व्यावसायिकांची तक्रार आहे. 




सुरुवातीला कंपनी व्यवस्थापनाकडे पाठपुरावा करुन त्यांनी आपली समस्या मांडण्याचा प्रयत्न केला, परंतु व्यवस्थापनाने त्यांना योग्य प्रतिसाद दिला नाही. सोशल मिडियाद्वारे आपल्याविषयी त्यांच्या मनात “आपला माणूस” अशी प्रतिमा आहे, त्या समजुतीतून त्यांनी आपल्याशी फोनद्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु आपलाही संपर्क होऊ शकला नाही. गेले दीड महिने हा प्रकार सुरु असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.





आपल्यासारख्या युवा नेत्याकडून अपेक्षाभंग झाल्याने सदरहू नुकसानग्रस्तांनी फेसबुक माध्यमावर पोस्ट टाकून आपला रोष व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. अशा प्रसंगी मित्र म्हणून अनेकजण त्यांच्या पाठीशी उभे राहिले.




त्यांच्या सुरात सूर मिसळून अनेकांनी त्यांना त्यांच्या नुकसानाची भरपाई मिळण्याची मागणी केली. आम्हीदेखील आमच्या मित्राने कुणाचीही भीडभाड न बाळगता गुळमुळीत न बोलता निर्भीडपणे स्वतःच्या हक्कासाठी लढण्याची अपेक्षा व्यक्त केली. 



त्यापुढे टीका, टिप्पणी, ट्रोलिंग अशी सोशल मीडियाची आयुधेही वापरली. निदान अशा प्रकारातून तरी आपल्यापर्यंत या विषयाचे गांभीर्य जावे हीच आमची अपेक्षा होती.


 


या प्रकारानंतर आपल्याकडून काहीही प्रतिक्रिया आली नाही. आमच्या मित्रांनी आपल्या स्वीय सहायकांना संपर्क केला असता तिकडून मुजोरपणाची भाषा ऐकावी लागली. आपल्या पगारी आणि बिनपगारी समर्थकांनीही विषयाचे गांभीर्य समजून न घेता नुकसानग्रस्त पोल्ट्री व्यावसायिक आणि त्यांच्या पाठीशी उभे असणाऱ्या मित्रांवरच फेसबुकच्या माध्यमातून प्रतिहल्ला करायला सुरुवात केली.


या सगळ्या प्रकारची हाईट म्हणजे “आमच्या युवा नेत्याला फोन करायचा असेल तर तेवढी लायकी कमवा” असे आव्हान आपले समर्थक करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर तुमची प्रतिमा “आपला माणूस” अशी आहे, त्या आपलेपणातूनच राज्यातील अनेक गरजू लोक आपल्याकडे कामानिमित्त, नोकरीच्या आशेने येतात. त्यांचीही हेटाळणी आपले समर्थक करताना दिसत आहेत.



कृपया दादा आपणच आम्हाला सांगाल का, आपल्याला फोन करण्यासाठी लायकीचे प्रमाण किती असावे आणि त्याचे प्रमाणपत्र कुठे मिळेल ? आपल्याकडे कुणी यावे आणि कुणी नाही हे जर आपले समर्थक ठरवणार असतील तर इथून पुढच्या काळात महादेवाच्या देवळाबाहेर असणाऱ्या नंदीबैलाप्रमाणे आपल्या समर्थकांनी परवानगी दिल्यानंतरच लोकांनी आपल्याला भेटायला यावे का याची स्पष्टता व्हावी. 


दादा, आपला आणि मराठा सेवा संघ-संभाजी ब्रिगेडमधील पदाधिकाऱ्यांचा स्नेह चांगला आहे याची मला कल्पना आहे. आपण पुणे जिल्हा परिषदेची निवडणूक असो किंवा कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील निवडणूक असो, या संघटनेतील लोकांनी आपल्या विजयासाठी घेतलेले परिश्रम आपणास माहीत आहेत.


 


आपल्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मा.प्रवीणदादा गायकवाड आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणी स्वखर्चाने आपले कार्यक्रम आयोजित केले. संघटनेच्या माध्यमातून जोडले गेलेल्या युवकांशी आपला परिचय घडवून आणला. 




संघटनेतील कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांनाही बारामती दौरा घडवून आपल्या बारामती ऍग्रो, बारामती ऍग्रीकल्चरल ट्रस्टच्या उदाहरणांसहित व्यावसायिक विषयावर मार्गदर्शन सत्र आयोजित केले. अशा अनेक घटना आहेत, जिथे ही संघटना आणि आपला स्नेहभाव आहे. परंतु पोल्ट्रीखाद्य प्रकरणावरुन आपले समर्थक संघटनेची मापं काढण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसत आहेत. या प्रकाराला आपले समर्थन नसेलच अशी अपेक्षा आहे. याबाबत आपण मौन सोडले तर सर्वांना त्याची स्पष्टता होईल.


जाता जाता एक विषय, पवार कुटुंबाला सामाजिक कार्याचा वारसा आहे. अनेक चांगल्या गोष्टींसाठी आपल्या कुटुंबाने अनेकदा आर्थिक सहकार्य केले आहे, पण त्या आर्थिक सहकार्याची कधी जाहिरात केली नाही.


 


परंतु पोल्ट्रीखाद्य प्रकरणावरुन आपले समर्थक महापुरुषांच्या नावाने सुरु असणाऱ्या सोहळ्यांना आपण केलेले आर्थिक सहकार्य हे उपकार म्हणून दाखवण्यात मग्न झाली आहेत. हा तर आपल्या कौटुंबिक वारशाचा आणि महापुरुषांच्या सोहळ्याचाही अपमान आहे.


महापुरुषांचा सोहळा हा खरोखर अशा उपकाराखाली दबलेला आहे असे जर आपलेही मत असेल, तर मग पुढच्या सोहळ्याच्या आधी आपले हे उपकार व्याजासहित फेडून महापुरुषांचा सोहळा कुठल्याही उपकाराच्या ओझ्याखालून मुक्त करण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरु करावेत का याचीही सूचना आम्हाला मिळावी अशी अपेक्षा आहे.


विनंती : सदर पोस्ट दादांचे फेसबुक अकाउंट हाताळणारे लोक आणि समर्थक वाचत आहेत असा मला विश्वास आहे. मोठ्या मनाने आपल्या लहान भावाचे म्हणणे आदरणीय रोहित दादांपर्यंत पोहोचवून सहकार्य करा. कमीजास्त असेल तर चुकभुल देणेघेणे.


आपला नम्र,

अनिल माने.


पत्र लेखक : - प्रगतशील शेतकरी, युवा लेखक अनिल  माने 





Tuesday, June 15, 2021

"महाराष्ट्रातील "या" सामाजिक आक्रमक चेहऱ्यामागील 'एक हळवे अन कनवाळू, माणुसकीबाज व्यक्तिमत्त्व; 'लोकहिताच्या कार्यात' वाहून घेणाऱ्या "महाराष्ट्राच्या प्रेरणादायी योद्धा"...



"महाराष्ट्रातील "या" सामाजिक आक्रमक चेहऱ्यामागील 'एक हळवे अन कनवाळू, माणुसकीबाज व्यक्तिमत्त्व; 'लोकहिताच्या कार्यात' वाहून घेणाऱ्या "महाराष्ट्राच्या प्रेरणादायी योद्धा"...


       

काही लोक हे केवळ इतिहास घडवायला येतात. कोणत्याही गोष्टींची तमा न बाळगत प्रवाहाविरुद्ध पोहणे हा त्यांचा अंगभूत स्वभाव असतो. अशाच एक महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीतील अग्रगण्य नेत्या, कोणत्याही पक्षीय राजकारणाला बळी न पडता महिलांच्या न्याय हक्कांसाठी लढणारी मजबूत ढाल, राज्यघटनेतील स्त्री - पुरुष समानतेच्या तत्वाचे रक्षण आपल्या जीवाची पर्वा न करता करणारी तळपती तलवार म्हणजे तृप्ती देसाई. 




देशात तृप्ती देसाई हे नाव म्हणजे जणू काही आक्रमकतेचेच प्रतीक आहे असे बऱ्याच जणांना वाटते. परंतु त्या आक्रमक चेहऱ्यामागील एक हळवे आणि कनवाळू व्यक्तिमत्व शोधण्याचा प्रयत्न कधीही झाला नाही. कारण  त्यांच्या पडद्यावरील आक्रमक चेहऱ्याला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली. परंतु भूमाता फाऊंडेशनच्या माध्यमातून पडद्यामागे चालत असलेल्या सामाजिक लोकहिताचे कार्य कधीच बाहेर आले नाही. 




 2020 ला अचानक लॉकडाऊन जाहीर झाले. सर्व काही बंद झालं. काही दिवसांनी शहरात अशी परिस्थिती निर्माण झाली की लोकांच्या घरी खायला अन्न नव्हतं. रेशन देण्याचं शासनाने जाहीर केलं पण बऱ्याच लोकांकडे रेशन कार्ड देखील नव्हते.


 



अशा लोकांनी आपल्या हातातले काम गेल्यावर आपली पोटाची भूख कशी भागवायची हा प्रश्न उभा राहिला. आपल्याला माहीत असलेली कुणीही व्यक्ती उपाशी राहू नये अशी भावना तृप्तीताईंच्या मनात होती. अशावेळी पुण्यामध्ये जिथपर्यंत सहजगत्या कुणी पोहचत नाही अशा ठिकाणी जाऊन त्यांना धान्याचे किट वाटप केले. लोकांमध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याने कोरोनाची भीती देखील मागच्या वर्षीच्या तुलनेत जास्त होती.




त्यामुळे सेवा देणारी लोक सुद्धा यावर्षी काही प्रमाणात लोकांच्या घरी जायला घाबरत. काही ठिकाणी तर उपासमारीने सुद्धा लोकं दगावल्याची दाट शक्यता होती. एका छोट्या कुटुंबाला महिनाभर पुरेल इतके साहित्य त्या किटमध्ये होते. रस्त्यावर, सिग्नलवर फुगे विकणारी मुले, झोपडपट्टी भागात राहणारे अत्यंत गरीब आणि गरजू लोक व तृतीयपंथी लोकांपर्यंत सुद्धा ही मदत पोहचत होती. गरजूंना मास्क, सेनीटायझर,  हॅण्ड ग्लोवज व आवश्यक तेथे पी.पी. ई. किट देखील वाटप केले. हे सगळं कार्य भूमाता फाऊंडेशन तर्फे चालू होतं.




           

लॉकडाऊन दरम्यान महिलांसंबंधी अनेक नवीन सामाजिक प्रश्न निर्माण झालेत. बऱ्याच मुलींचे लॉकडाऊन मध्ये लग्न जुळलेले होते. पण कंपन्या व कारखाने बंद झाल्याने बऱ्याच लोकांचे रोजगार गेलेत. मुलींचे लग्न लावायला बऱ्याच लोकांकडे पैसा राहिला नाही. 



त्यातल्या काही मुलींचे आई किंवा वडील अपंग होते. काहींना आई वडील नव्हते. अशावेळी महिलांसाठी काम करणारी अशी ओळख त्यांच्या संघटनेची असल्याने जबाबदारीने पुढे येऊन त्यांना काम करावे लागले. अगदी साध्या पद्धतीने लग्न करायला कमीत कमी येऊ शकणाऱ्या खर्चाचा अंदाज बांधून 15 हजार एवढी रक्कम लग्नासाठी निश्चित करण्यात आली. अगदी घरापुढे हिरवा मांडव टाकून देखील लग्नाला तयार झालेल्यांना ही रक्कम पुरेशी होती. 




नवरीसाठी आवश्यक वस्तू घेण्यापासून इतरही बाबींवर ती रक्कम खर्च करता येणार होती. त्यानुसार लग्न जुळलेल्या मुलींच्या थेट बँक खात्यामध्ये ही रक्कम पाठवण्यात आली. नांदेड, परभणी, लातूर, अमरावती, सातारा, कोल्हापूर व गडचिरोली अशा महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात ही मदत पोहोचवली गेली.


 



एका मुलीच्या डोळ्याला अपंगत्व आल्याने गेल्या 6 वर्षांपासून तिचे लग्न जुळत नव्हते. तिला वडील नव्हते आणि आईवर जवळपास दहा हजारांचे कर्ज होते. मजुरी अगदी 70-80 रुपये. अशावेळी तिला भूमाता फाऊंडेशन कडून 25 हजारांची मदत तिच्या खात्यात पाठवली गेली. 15 हजार रुपयांत ते लग्न पार पाडून उर्वरित रकमेत आईचे कर्ज देखील फेडले गेले. त्यावेळी आपण गरजू मुलींच्या लग्नासाठी पाठवत असलेली रक्कम पुरेशी असल्याचा आनंद तृप्तीताईंना झाला. 




 पुढील काही दिवसांत 15 ते 20 लग्न फाऊंडेशन तर्फे पार पाडणार असल्याचा संकल्प करणार आहेत. दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये  मृत्यूची भीती मोठ्या प्रमाणात वाढल्याने मदत गोळा करण्यासाठी असो की गरजूंचा शोध घेण्यासाठी बऱ्याच ठिकाणी त्यांना स्वतः जावे लागले.



मागच्या वर्षी 700-750 कुटुंबांना व यावर्षी जवळपास चारशे कुटुंबांना धान्याचे किट वाटप करण्यात आले. त्यामध्ये 5 किलो गव्हाचे पीठ, 5 किलो तांदूळ, सूर्यफुल तेल, तूरडाळ, साखर, मीठ अशा सर्व गरजेच्या अत्यंत दर्जेदार गुणवत्ता असलेल्या वस्तू त्यात देण्यात आल्या. आपण जे घरी खातो त्याच दर्जेच्या वस्तू त्या किटमध्ये समाविष्ट केल्या. 




कोल्हापूरला भूमाता फाऊंडेशनच्या कार्यक्रमाला राज्यातील आरोग्य राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 250-300 कोरोना योद्ध्यांना वाफ घेण्याची मशीन भेट देण्यात आली. त्यांचा सत्कार करण्यात आला. पोलिसांना देखील विविध आवश्यक वस्तू पुरवल्या.


 

      

कोरोनाचे संकट देशावर येण्यापूर्वी देखील त्यांचे सामाजिक जनकल्याणाचे कार्य असेच सुरू होते. मागच्या वर्षी कोल्हापूरला पूर आल्यानंतर महिलांना अत्यंत आवश्यक असतील अशा सगळ्या वस्तूंचा पुरवठा देखील भूमाता फाऊंडेशन तर्फे करण्यात आला. 



सगळ्यांनी दुर्लक्ष केलेल्या सांगलीच्या तुरुंगातील कैद्यांना देखील त्याकाळात त्यांनी मदत केली. वाटेतील गरजूंना आवश्यक त्या वस्तू ऐन वेळेला देता याव्यात म्हणून स्वतःच्या गाडीमध्ये त्या नेहमीच महिलांसाठी साडी चोळी पासून शाल पर्यंत अनेक वस्तू बाळगतात. वाटेत भेटणाऱ्या वृद्ध गरजू महिलांना व पुरुषांना त्या देऊन टाकतात ही त्यांची नेहमीचीच सवय. 




 या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत त्यांनी आपल्या संघटनेतील सहकाऱ्यांना व कुटुंबियांना देखील गमावले परंतु ते वैयक्तिक दुःख मनात न ठेवता आपले कार्य सुरूच ठेवले. गरज असेल तेथे इतरांच्या मदतीला त्या धाऊन गेल्या. 


निपाणी हे त्यांचं जन्मगाव. जन्मापासून बेळगाव - निपाणी सीमा वादाचा संघर्ष अनुभवल्याने कदाचित त्या स्वतः आक्रमक आणि संघर्षशील बनलेल्या असाव्यात. त्यामुळेच लढणे आणि संघर्ष करणे हे त्यांच्या रक्तात आहे. अन्यायाविरूद्ध उभे राहणे हा त्यांचा जन्मजात पिंड आहे. 



पुण्याला बालपणीच येऊन त्यांचं कुटुंब स्थायिक झालं. कॉलेजला असतानापासूनच त्यांनी अनेक लढ्यांचे नेतृत्व स्वीकारले होते. तसेच त्या घडत गेल्या. त्यांनी लढलेले 25 हजार ठेवीदारांचे पहिले आंदोलन असो की महिलांच्या न्याय हक्कांसाठी मंदिर प्रवेश आंदोलन असो त्या खंबीरपणे लढल्या.


 


यादरम्यान अनेक जीवघेणी संकटे त्यांच्यावर आलीत. पण त्या कधीच डगमगल्या नाहीत. त्यांनी माघार घेतली नाही. समाज माध्यमांमध्ये त्यांना प्रचंड ट्रोल केले गेले. पण त्यालाही त्यांनी कधीच जुमानले नाही. आपल्या निश्चयापासून त्या कधीच विचलित झाल्या नाहीत.




समाज परिवर्तनाचे लढे लढतांना लोकांचा रोष सहन करावाच लागतो. शिवीगाळ ऐकावी लागते. पण अशा परिस्थितीत आपल्या घरच्या लोकांचा पाठिंबा फार महत्त्वाचा असतो. तो त्यांना माहेरी व सासरी दोन्ही ठिकाणी मिळाला. त्यांची आई, वडील, सासूबाई व पती नेहमीच खंबीरपणे पाठीशी उभे राहिलेत. 




त्या बाहेरून जितक्या आक्रमक आहेत तितक्याच त्या प्रेमळ आहेत. एखाद्या सहृदयी व कनवाळू व्यक्तीलाच चुकीच्या गोष्टींची चीड येते. सामान्य लोकांवर होणारा अन्याय त्याला सहन होत नाही. मग तो व्यवस्थेविरूद्ध व सामाजिक रूढी परंपरांविरूद्ध बंड करून उठतो. परिवर्तनाचे वाटसरू म्हणून समाजाच्या रोषाचा सामना तर सावित्रीबाई फुलेंना देखील करावा लागला होता. त्यातून आपण तरी कसे सुटणार अशीच भावना  त्यांच्या मनात येत असावी.


त्यांचे व्यक्तिमत्त्व असेच उत्तरोत्तर बहरत जावो. त्यांनी हाती घेतलेल्या प्रत्येक लढ्याला यश मिळो. देशाच्या उत्तुंग शिखरावर जाण्यासाठी त्यांना प्रचंड आत्मबळ लाभो त्यासाठी निसर्ग त्यांना उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य देवो. 


लेखक : - डॉ. मिलिंद भोई (भोई फाऊंडेशन), प्रा. कमलनारायण उईके








Thursday, June 10, 2021

"राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रबांधणीची गरज" - राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे यांचा 'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर्धापन दिन' विशेष लेख...



राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि राष्ट्रबांधणीची गरज...


संसदीय लोकशाहीमध्ये राजकीय पक्ष आणि सार्वत्रिक निवडणूका महत्वाच्या असतात. प्रत्येक मतदार हा राजकीय व्यक्ती असतो.लोकशाहीत कुणीही नागरिक अराजकीय नसतात. त्यामुळे राजकारण आपल्यासाठी सर्वांसाठी खूप महत्वाचे क्षेत्र आहे दुर्लक्ष्य करून चालत नसते.आपले समविचारी आपण मिळवायचे असतात.जे संविधान पूर्वक भूमिका घेतात ते राष्ट्रबांधणीसाठी महत्वाचे व गरजेचे असतात.


महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातील एक मोठं नाव म्हणजे शरद पवार. त्यांच्या राजकीय जीवनाची सुरवात काँग्रेस पक्षातून झाली. एका विशिष्ट राजकीय परिस्थितीत शरद पवार यांना बावीस वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करावी लागली. काँग्रेसपासून वेगळे झाले तरी लगेच झालेल्या निवडणुकीनंतर काँग्रेससोबत एकत्र येऊन विभाजनवादी शक्तींना सत्तेत येण्यापासून रोखले. त्यानंतर दोन दशकांनी अशाच प्रकारे दोन्ही काँग्रेसनी शिवसेनेला सोबत घेऊन भाजपला सत्तेपासून रोखून इतिहासाची पुनरावृत्ती घडवली.


 Best Offer Amazon



मुंबईत 10 जून 1999 रोजी शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. तेव्हापासून आजपर्यंत शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करत आहेत. त्यावेळच्या आणि अलीकडच्या अशा दोन्हीवेळच्या परिस्थितीचे विश्लेषण राजकीय विश्लेषकांनी वेळोवेळी  केले आहे. 




पक्षाची मूलभूत भूमिका व विचारधारा :-

भारतीय संविधानाचा संपूर्ण सन्मान व आदर ठेवणे, संसदीय लोकशाही व्यवस्थेची जपणूक व जोपासना करणे, धर्मनिरपेक्ष व पुरोगामी विचारांची बांधिलकी, सार्वजनिक जीवनात सर्वधर्मसमभावाची जोपासना करणे, अहिंसक मार्गाने कायद्यांच्या चौकटीत राहून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत राहणे, भारतीयत्व हेच राष्ट्रीयत्व मानून भूमिका व धोरण ठरवणे, समता, बंधुता व सामाजिक न्यायासाठी बांधील राहून भूमिका घेणे.  





शिव-शाहू-फुले-गांधी-आंबेडकर यांचे तत्वज्ञान व विचारधारा पक्षाने आदर्श मानलेली आहे. या समविचारी सरकार राज्यात व देशात सत्तास्थानी असावे यासाठी सतत प्रयत्नशील राहून सर्व प्रकारच्या निवडणुकीत सक्रिय सहभाग घेणे.

 


राजकीय वाटचाल :- 

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मूलभूत विचारधारेत व तत्वज्ञानात विशेष असा काही फरक नाही. संघटनात्मक कार्यपद्धतीत मात्र थोडासा फरक आहे. दोन्ही काँग्रेसचा एक नंबरचा राजकीय प्रतिस्पर्धी मात्र भाजपच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची वाटचाल सुरुवातीपासून सत्तेत राहिली.




नव्या कार्यकर्त्यांना 2014 पर्यंत फक्त सत्ता माहिती होती. सत्तेशिवाय पक्ष असतो याचा अनुभव 2014 ते 2019 मध्ये आला. तोपर्यंत पक्षातील फक्त सत्ताप्रेमी असलेले आत्मकेंद्री आमदार  इतर पदाधिकारी पक्षांतर करून विसंगत विचारांच्या भाजपमध्ये सहज सामील झाले. त्यामुळे भाजपची तत्कालिन राजकीय गरज पूर्ण झाली. अनेकांनी पक्षांतर  केले तरी पक्ष न डगमगता सर्व निवडणुकांना यशस्वीपणे सामोरा गेला. 




याचे कारण म्हणजे पक्षाचे मुख्य आधारस्तंभ शरद पवार हेच आहे. कोणत्याही संकटाचा किंवा विपरीत परिस्थितीचा सकारात्मक दृष्टीकोन ठेवत कार्यमग्न राहून सामना कसा करायचा हे शरद पवारांनी देशाला अनेकदा दाखवून दिलेले आहे. धर्मांध व जात्यंध विचारांना व कृतीला पक्षाने सतत विरोध केलेला आहे.




1999 ते 2014 या 15 वर्षाच्या आघाडी सरकारच्या सत्ताकाळात  देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र सर्वार्थाने प्रगतीपथावर गेलेला स्पष्ट दिसून येतो. विविध शेतीपूरक व्यवसाय , राज्यातील वाढलेले औद्योगीकरण, आधुनिक शेतीला प्रोत्साहन व  चालना, फलोत्पादन, कृषीमाल प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन व चालना, पाणलोट क्षेत्र विकास, ग्रामीण विकास, ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारे सहकारी संस्थांचे जाळे, विविध प्रकारचे तंत्रशिक्षणाची सोय, महिला सक्षमीकरणासाठीचे विशेष धोरणात्मक निर्णय, अभूतपूर्व पोलीस भरती, ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत हागणदारीमुक्त गावे, जादूटोना विरोधी कायदा, गुटखाबंदी, डान्सबारबंदी, व्यक्तिगत लाभाच्या विविध योजना, सर्व समाज घटकांना समान न्यायाची भूमिका व विविध धोरणात्मक निर्णय इत्यादी कामांची व राबविलेल्या धोरणांची मोठी यादी देता येईल.


पण  भौतिक व सामाजिक विकासाचे प्रश्न कायम अपूर्ण असतात कारण परिस्थितीनुसार गरजा बदलत असतात. सर्व प्रश्न संपले असं कधीच होत नसते. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाची दखल अन्य राज्यांनी व देशाने घेतली आहे याचे श्रेय तत्कालीन आघाडी सरकारला द्यावेच लागेल.

 


दरम्यानच्या काळात भाजप ने गोबेल्स नीतीचा वापर करून समाज माध्यमांचा दुरुपयोग करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला व प्रमुख नेत्यांना भ्रष्टाचाराचे खोटे आरोप करून बदनाम करण्याचा एककलमी कार्यक्रम कायम राबविला पण आद्यपपर्यंत त्यांचा एकही आरोप सिद्ध झालेला नाही होऊ शकणार नाही.पण खोटे आरोप करून राजकीय फायदा मात्र भाजपला काही प्रमाणात झाला हे कुणीही नाकारू शकत नाही. 


15 वर्षाच्या सत्ताकाळात नेत्यांनी पक्षसंघटनेकडे दुर्लक्ष केले. संघटना नावाला होती की काय अशीच स्थिती होती कारण पक्षात अनेक जण पदे घेऊन व्यक्तिशः मोठे झाले  त्यांना सुभेदार म्हंटले जायचे. तेच पुढे पक्षाला डोईजड झाले होते. मात्र संघटना कमकुवत बनली होती. त्यामुळे 2014 च्या निवडणुकीत त्याचा काही प्रमाणात पक्षाला फटका बसला.




सद्यस्थिती :- 

राष्ट्रवादी काँग्रेसची स्वतन्त्र राजकीय वाटचाल आता बरीच पुढे गेलेली आहे. पक्ष स्थापन होऊन 21 वर्षे पूर्ण झाली. पक्षात 1 नवीन पिढी ज्याला तिसरी पिढी म्हणता येईल ती तयार झाली आहे. महाराष्ट्राशिवाय केरळ, गोवा ,गुजरात, दिल्ली, बिहार इत्यादी राज्यात पक्ष रुजत आहे वाढत आहे. देशाच्या पातळीवर संसदीय राजकारणात नव्या पिढीचे नेतृत्व खासदार सुप्रियाताई सुळे करत आहेत. संसदेतील त्यांची कामगिरी आदर्श आणि उल्लेखनीय ठरलेली आहे. 




संसदरत्न म्हणून त्यांचा दरवर्षी गौरव होत आहे. राष्ट्रीय पातळीवर त्यांनी जनसंपर्क ठेवलेला आहे. समाजकारणासाठी राजकारण,  राजकारणात सुसंस्कृतपणा असला पाहिजे, कोणतेही धोरण ठरवताना त्यात देशहित व समाजहित असले पाहिजे ही यशवंतराव चव्हाणांची कृतिशील शिकवण पक्षासाठी कायम मार्गदर्शक व आदर्श आहे. पद्मविभूषण शरद पवार ही पक्षाची मोठी संपत्ती आहे. 




सध्या महाविकासआघाडी सरकारमध्ये पक्षाचा सहभाग मोठा आहे. अजितदादा पवार सरकारमध्ये पक्षाचे सक्षमपणे नेतृत्व करत आहेत. जयंत पाटील यांच्या सारखा अभ्यासू व संयमी नेता पक्षाच्या राज्य संघटनेची धुरा यशस्वीपणे सांभाळत आहेत. दर आठवड्याला पक्ष कार्यालयात पक्षाचे सर्व मंत्री जनता दरबार घेत असतात. त्याचा राज्यातील सर्वसामान्य जनतेला नक्कीच फायदा होतोय. महाविकासआघाडी ही राज्याची सध्याची राजकीय गरज होती ती पूर्ण झाली. 





हाच प्रयोग 2024 साठी राष्ट्रीय पातळीवर देशाला दिशादर्शक ठरू पहात आहे. राज्यात सरकार बनले आणि थोड्याच दिवसांत कोव्हीड महामारीचे संकट आले त्याचा सामना सर्वपातळीवर सरकार व आपण सर्वजण करत आहोत. लोकशाही मूल्यांची गळचेपी होईल अशी भूमिका कधी घेतली नाही किंवा आपल्या राजकीय विरोधकांना नामोहरम करण्यासाठी  राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने कधीही शासन व्यवस्थेचा दुरुपयोग केला नाही करत नाही. हे आज अतिशय महत्वाचे आहे.


वैचारिक बांधिलकी असलेल्या कार्यकर्त्यांचीच पक्ष संघटना बांधणी करणे आवश्यक आहे. कार्यकर्त्यांची वैचारिक जडणघडण कार्यकर्त्यांच्या सततच्या निवासी शिबिरातून होऊ शकते. मध्यंतरी तसे प्रयत्न झाले. दुसरा मार्ग नाही.यासाठी प्रमुख नेत्यांनी विशेष लक्ष्य देणे आवश्यक वाटते. पक्षाच्या मूलभूत विचारांशी बांधिलकी असलेल्या कार्यकर्त्यांची निर्मिती प्रयत्नपूर्वक करावी लागेल. सत्तेचे लाभार्थी पक्षाच्या मूलभूत विचारांशी बांधील असतीलच असे नाही. याबाबत पक्ष नेतृत्व खबरदारी घेईल हा विश्वास आहे.


देशाच्या राष्ट्रबांधणीसाठी धर्मांध व प्रतिगामी विचारांच्या शक्ती मुख्य अडसर ठरत आहेत. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राज्याला व देशाला गरज आहे. गांधी- नेहरू- आंबेडकरांच्या तत्व आणि विचारांनीच आपला देश सक्षम व महान होऊ शकतो सर्वांगीण प्रगती करू शकतो यावर पक्षाचा विश्वास आहे.  सर्व जाती धर्मियांना बरोबर घेऊन जाणारा एकमेव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. कोणतीही राजकीय  पार्श्वभूमी नसलेल्या सामान्य युवक युवतींना पक्ष विविध पातळीवर नेतृत्व करण्याची संधी देत असतो.अशी बरीच जुनी नवी नावे सांगता येतील.  भविष्य काळातील पक्षाची जबाबदारी घेणारी पिढी तयार होत आहे.




आज अनेकांना टीका करण्यासाठी आरोप करण्यासाठी शरद पवार हवे असतात,कुणाला राजकीय फायद्यासाठी हवे असतात कुणाला स्वतः बातमीत राहण्यासाठी हवे असतात. कुणाला निवडणुकित जिंकून येण्यासाठी हवे असतात. कुणाला आपल्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी हवे असतात, राजकीय घडामोडीवेळी समन्वयक म्हणून शरद पवार हवे असतात. राजकीय चर्चेत आणि बातमीत मात्र शरद पवार कायम असतात. महाराष्ट्राचे पालक म्हणून दिल्लीत एकमेव शरद पवार आहेत. त्यांचा 60 वर्षांचा राजकीय कार्यकाळ विधिमंडळ आणि संसद  असा अखंड आहे देशात असे एकमेव तेच आहेत. शरद पवार व्यक्ती नसून एक विचार आहेत ज्यांचा भारतीयांच्या  सामूहिक शहाणपणावर विश्वास आहे. तीच पक्षासाठी मोठी ऊर्जा व संपत्ती आहे. 





कार्यकर्त्यांनी राजकरणात कोणतेही शॉर्टकट शोधू नयेत असे शॉर्टकट शोधणारे कार्यकर्ते लॉंगटर्मसाठी रहात  नाहीत.हाच संदेश या निमित्ताने नव युवकांना घेता येईल.


लेखक : - सामाजिक चळवळीमध्ये 25 वर्षांपेक्षा जास्त वर्ष कार्यरत असणारे सामाजिक कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे.






     

Tuesday, June 8, 2021

"संभाजी ब्रिगेडच्या सर्व कार्यकर्त्यांना यापुढे 'वादळा' सारखे काम करावे लागेल" - तरुण सामाजिक कार्यकर्ते, संभाजी ब्रिगेडचे शिलेदार, प्रदेश संघटक संतोष शिंदे यांचा विशेष लेख...

 


संभाजी ब्रिगेडच्या सर्व कार्यकर्त्यांना यापुढे 'वादळा' सारखे काम करावे लागेल...!


संभाजी ब्रिगेड राष्ट्राला समर्पित कॅडरबेस संघटन आहे. व्यवस्था परिवर्तन हा संभाजी ब्रिगेडचा श्वास आहे. महाराष्ट्रातील नागरिकांच्या न्याय हक्कासाठी संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता सतत धडपड करत आहे. आपली जुनी संभाजी ब्रिगेड नव्या पद्धतीने परत आक्रमक दाखवावी लागेल. माझी जबाबदारी जास्त आहे हे प्रत्येकाला वाटले पाहिजे. कुणाच्याही अडचणीच्या काळात संभाजी ब्रिगेड धावून जाते...! न्याय मिळवून देते...! हे वेगळे सांगायची गरज नाही. 




जनतेच्या प्रश्नाला सर्वोच्च केंद्रबिंदू मानून लोकहितासाठी संघर्ष करणारी व्यवस्था म्हणजे संभाजी ब्रिगेड आहे. सर्वसामान्यांना १००% न्याय आजपर्यंत संभाजी ब्रिगेडचा प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्ता हा देत आलेला आहे. आम्ही संघर्ष करतो, मात्र त्याचा रॉयल्टी वजा फायदा संघटनेसाठी करून घेत नाही, त्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांमध्ये संख्यांची बेरीज होत नाही. 





संभाजी ब्रिगेडची स्टाईल हा महाराष्ट्राचा वैचारिक क्रांती चा इतिहास आहे. आदरयुक्त वादळ म्हणून संभाजी ब्रिगेड गेली ३० वर्षापासून आक्रमक, बुलंद व हक्काचा आवाज म्हणून महाराष्ट्राच्या घराघरापर्यंत पोहोचला. लोकांना संभाजी ब्रिगेड आपली वाटली पाहिजे... यासाठी संभाजी ब्रिगेडच्या प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आता मरगळ झटकून वादळासारखे काम केलं पाहिजे. कार्यकर्त्यांवर विश्वास टाकून नवीन माणसांना जोडण्याचं काम आता प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केले पाहिजे.





पूर्णवेळ कार्यकर्ते आपल्याला अपेक्षित आहेत. संभाजी ब्रिगेडच्या प्रत्येक जिल्हा, तालुका आणि शहरातल्या पदाधिकाऱ्यांनी आपली कार्यकारिणी पुनर्गठित केली पाहिजे. सर्वांना संभाजी ब्रिगेड मध्ये सामावून घेऊन त्यांच्या खांद्यावर संभाजी ब्रिगेडचा भगवा 'झेंडा' देऊन प्रत्येक कार्यकर्त्याला काम करण्याची संधी दिली पाहिजे.




संभाजी ब्रिगेड वादळ आहे, ते कुणासाठी ही थांबणार नाही. प्रत्येक कार्यकर्त्यांनी संभाजी ब्रिगेडला कुटुंब मानून यापुढेही काम करावं लागेल. म्हणून संभाजी ब्रिगेड ग्राम पातळीपासून शहर आणि जिल्हा शाखेपर्यंत कार्यकर्त्यांचे मजबूत संघटन झाले पाहिजे.


 



यासाठी सर्वांनी वेगवेगळ्या पध्दतीने अंग झटकून काम केलं पाहिजे. गटबाजी, हेवेदावे हे आपल्याला चालणार नाही. यासाठी एकमेकांचा सन्मान करून संघटन वाढीसाठी आता घराच्या बाहेर रस्त्यावर येऊन काम केलं पाहिजे. 'गाव तिथे शाखा आणि घर तिथे कार्यकर्ता...' हे संभाजी ब्रिगेडचे यापुढेही ब्रीद असलेच पाहिजे.




आपण सर्वसामान्य लोकांसाठी काम करतो. संभाजी ब्रिगेड प्रा.लि. कंपनी नसून सर्वांसाठी अनलिमिटेड विचारधारा आहे. तरुण, विद्यार्थी, कष्टकरी, कामगार, शेतकरी व सर्वसामान्य जनतेसाठी आजपर्यंत लढत आलेलो आहोत. 




या सर्वांना आता चांगला पर्याय म्हणून संभाजी ब्रिगेड परिवारात आणलं पाहिजे. 'सदस्य नोंदणी' जास्तीत जास्त झाली पाहिजे. प्रत्येक कार्यकर्ता सक्षम झाला पाहिजे अशी संभाजी ब्रिगेडच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे. १००% समाजकारण आणि १००% राजकारणात संभाजी ब्रिगेड भविष्यात इतिहास घडवणार आहे.





यासाठीच संभाजी ब्रिगेडचा प्रत्येक राज्य, जिल्हा, तालुका व इतर पदाधिकारी प्रामाणिकपणे काम करत आहे. तो अजून सक्षमपणे काम करावे यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याला पदाधिकारी म्हणून जबाबदारी दिली पाहिजे. काम वाढवलं पाहिजे.


 


यासाठी संभाजी ब्रिगेडच्या कामाची आखणी केली पाहिजे. म्हणून संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष मा. अॕड. मनोज आखरे व महासचिव मा. सौरभ खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली संभाजी ब्रिगेड ची घोडदौड सुरू आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली दि. 21, 22, 23 मे 2021 रोजी राज्यस्तरीय बैठक घेऊन संभाजी ब्रिगेडच्या सर्व राज्य पदाधिकारी व जिल्हाध्यक्षांना स्पष्ट आदेश देण्यात आलेले आहेत की, यापुढे १) संभाजी ब्रिगेडचे संघटन वाढीसाठी प्रत्येकांनी प्रयत्न करावेत. २) कार्यकारणीचे पुनर्गठन करावे, ३) जिल्हा आणि इतर सर्व कार्यकारणी वाढवाव्यात. ४) जुन्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सन्मान करून त्यांना वेगळे वेगळ्या पदावर काम करण्याची संधी द्यावी. ५) संघटन वाढीसाठी प्रत्येकाला संधी द्यावी आणि त्यांच्याकडून काम करून घ्यावे... असा स्पष्ट आदेश देण्यात आलेला आहे.




संभाजी ब्रिगेड आपलं कुटुंब आहे. संभाजी ब्रिगेडचे विचार हे महाराष्ट्र साठी प्रेरणादायी आहे. युगपुरुष मा. पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी दिलेले विचार राष्ट्राला समर्पीत आहेत. आपल्याला हे विचार सगळ्यांना एकत्र मिळून पुढे घेऊन जायचे आहेत. कारण महापुरुषांच्या विचारांची पुरोगामी आणि परिवर्तनवादी चळवळ म्हणून संभाजी ब्रिगेड वर फार मोठी जबाबदारी आहे. आपल्याला समाजकारणा बरोबर राजकारण सुद्धा आपल्या हिंमतीवर करायचे आहे. 




त्यामुळे आपल्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी इतर पक्ष्यांच्या नेत्याचे किंवा कार्यकर्त्यांची स्टेफनी म्हणून काम करू नये. डबल ढोलकी कार्यकर्ते कार्यकारणी मध्ये अजिबात नसले पाहिजे. दोन डगरींवर पाय असणारी माणसं नेहमी धोका देतात हा इतिहास आहे. म्हणून 'एक झेंडा आणि एक दांडा...' हातात घेणारेच कार्यकर्ते आपल्याला अपेक्षित आहेत. त्याच पद्धतीने आपली पुढची दिशा असली पाहिजे.




आपल्या नेतृत्वाच्या खांद्यावर'ची जबाबदारी आपण सर्वांनी वाटून घेतली तरच आपलं संघटन वाढेल. समाजाचा प्रत्येक प्रश्न हा आपला प्रश्न म्हणून आपण सोडवला पाहिजे. आपण सतत हजरजबाबी, आक्रमक, संघटनात्मक आणि धोरणात्मक काम केलं पाहिजे.


आपल्या नेत्यांना आपला अभिमान वाटावा, आपल्या कामाचं कौतुक व्हावं... यासाठी आपल्याला सर्वोच्च काम करावे लागेल. तरच भविष्यामध्ये आपल्या नेतृत्वाचा मानसन्मान होईल आणि संभाजी ब्रिगेड ची वेगळी ओळख महाराष्ट्रामध्ये अबाधित राहील. यासाठी प्रामाणिक निष्कलंक व प्रेरणादायी पदाधिकारी आणि कार्यकर्ते घडवावेत. यासाठीच आपल्या सगळ्यांचा प्रयत्न असला पाहिजे. कारण आपण लढणारे कार्यकर्ते आहोत. 'संभाजी ब्रिगेड आपल्या दारी...' हा विश्वास प्रत्येकाला मिळाला पाहिजे.


मी लढलो तरच माझ्यासोबत लढणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. म्हणून बळ, बुद्धी आणि चातुर्य वापरून व्यवस्थेतील जळमटं आपल्याला बाजूला काढायचे आहेत. विचारांच्या दिशा वाढवून कामाचा पाऊस पडल्याशिवाय यापुढे आपल्याला तरणोपाय उरणार नाही. वेगवेगळ्या पक्ष्यांची, नेत्यांची स्पर्धा सुरू असल्यामुळे आपल्यालाही त्या स्पर्धेत दिमाखात चालायचा आहे. त्यासाठी आपले संघटन मजबूत केले पाहिजे. म्हणून कार्यकर्त्यांची फळी वाढवण्यासाठी प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी 'संघटनात्मक' प्रयत्न करावा. थांबू नका, दुसऱ्याला टाळी द्या. 'चांगले काम' हीच आपली पुढची कार्यक्षम दिशा असेल. चला कामाला लागू...


आपण लढत राहू, माणसं जोडत राहू, 

लढणारांची संख्या आपोआप वाढत राहील...!


जय जिजाऊ...!! जय शिवराय...!!!


लेखक : - सामाजिक चळवळीमध्ये, जनतेच्या गंभीर प्रश्नांसाठीच्या वेगवेगळ्या आंदोलनात अग्रेसर असणारे तरुण सामाजिक कार्यकर्ते, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे.