Sunday, July 13, 2025

"जगाला प्रेरणा देणारे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचे "हे" १२ ऐतिहासिक किल्ले जगप्रसिद्ध युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळात; रायगड,शिवनेरी, सिंधुदुर्गसह बारा ऐतिहासिक किल्ल्यांचा जागतिक गौरव; गड - किल्ले संवर्धन काळाची गरज, शालेय विद्यार्थ्यांनी "या" ऐतिहासिक किल्ल्यांना भेट देऊन प्रेरणादायी शिवकाळ अनुभवा"....

मुंबई, दि. 13 : जगाला प्रेरणा देणाऱ्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या संग्रामाचे साक्षीदार आणि मराठ्यांच्या धैर्य, शौर्य, त्याग, पराक्रमाचा वारसा लाभलेले राज्यातील रायगड, राजगड, प्रतापगड, लोहगड, शिवनेरी, पन्हाळा, साल्हेर, खांदेरी, सुवर्णदुर्ग, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग तसेच तामिळनाडूतील जिंजी या बारा ऐतिहासिक  किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत झाल्याबद्दल जगभरातील करोडो शिवप्रेमींनी आनंद व्यक्त केलेला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान इतिहासाचे व महान पराक्रमाचे स्मरण करून देणारे महाराष्ट्रातील ऐतिहासिक गड - किल्ले हे लहान मुलांपासून ते तरुणाई ते अबाल वृद्धांपर्यंत भारतातील व महाराष्ट्रातील लाखो - करोडो लोकांना नेहमीच प्रेरणा देणारे आहेत. 

Flipkart  Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal!  Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

युनेस्को सारख्या जगातील प्रसिद्ध व मोठ्या संघटनेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक गड - किल्ल्यांचा, मराठा साम्राज्याचा, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान इतिहासाचा एवढा मोठा गौरव करणे हे महाराष्ट्रासाठी व भारतासाठी खूप अभिमानास्पद व गौरवास्पद आहे.

"जगाला प्रेरणा देणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे महान गड -  किल्ले राज्यातील सर्व शालेय विद्यार्थ्यांनी पाहिले पाहिजेत. प्रत्येक गड - किल्ल्यावरील शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास जाणून घेतला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने व महान पराक्रमाने पावन झालेले शिवनेरी,रायगड, सिंधुदुर्ग, प्रतापगड, पन्हाळा,राजगड, विजयदुर्ग यांसारखे शेकडो गडकिल्ले शालेय विद्यार्थ्यांनी व तरुणाईने पाहिले पाहिजेत. महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांनी तसेच तरुणाईने राज्यातील शेकडो ऐतिहासिक गड - किल्ल्यांवरती जाऊन, छत्रपती शिवाजी महाराजांचा महान इतिहास, महान जीवन कार्य समजून घेतले पाहिजे,अनुभवले पाहिजे. गड - किल्ल्यांवरील महान इतिहासातून प्रेरणा घेऊन आपलं जगणं समृद्ध केले पाहिजे."

आजच्या काळातील जीवनशैली, ताणतणाव यामुळे काही शालेय विद्यार्थ्यांमध्ये व  तरुणांमध्ये नैराश्य जाणवत आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी लढा देऊन, जगातील खूप मोठ्या संकटावरती मात करून जिद्दीने, चिकाटीने, एकजुटीने रयतेचे कल्याणकारी राज्य कसे निर्माण करता येते हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान इतिहासाने दाखवून दिलेले आहे. महाराष्ट्रातील सर्व गड - किल्ले पाहिल्यानंतर याच महान इतिहासाला उजाळा मिळतो व  स्फूर्ती मिळते.

छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील अठरापगड जाती, बारा बलुतेदार मावळ्यांना संघटीत करुन महाराष्ट्राच्या मातीत रयतेचं राज्य, शेतकऱ्यांचं स्वराज्य निर्माण केलं. रयतेचं राज्य स्थापन करण्याचा ध्यास घेऊन लढलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना याच ऐतिहासिक गड - किल्यांनी भक्कम साथ दिली होती. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या, त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमाचा इतिहास पाहिलेल्या या ऐतिहासिक किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत झाल्याने छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य, त्यांचे विचार, मराठी मावळ्यांचा पराक्रम जगभरात पोहोचेल. छत्रपती शिवाजी महाराज जगाला समजतील. ऐतिहासिक वारशाचा गौरव लाभलेल्या या बारा किल्ल्यांसह राज्यातील सर्वच किल्यांचं संरक्षण, संवर्धन करण्यासह त्यांचं महत्व, तिथे घडलेला इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण सर्वांनी पुन्हा एकदा दृढसंकल्प होऊया, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. 

युनेस्कोच्या यादीत महाराष्ट्रातील किल्ल्यांचा समावेश व्हावा यासाठी प्रयत्न केलेल्या राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाचे त्यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
                                  Buy Now

"छत्रपती शिवरायांचे गडकिल्ले म्हणजे केवळ दगडधोंड्यांचे बांधकाम नाही, तर ते महाराष्ट्राच्या अस्मितेचे भक्कम बुरुज आहेत. आज त्यांना जागतिक दर्जा मिळाल्याने स्वराज्याच्या इतिहासाला नवसंजीवनी मिळाली आहे. राज्यातील दुर्ग दुर्गेश्वर रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग आणि खांदेरी हे ११ किल्ले शिवकालीन सामरिक रणनीती, अद्वितीय स्थापत्यकौशल्य आणि सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक आहेत. या यशासाठी महाराष्ट्र शासनाने अतिशय अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय पद्धतीने प्रस्ताव तयार केला होता. प्रधानमंत्री कार्यालयाने “मराठा लष्करी स्थापत्य” प्रस्तावाची निवड करून युनेस्कोकडे पाठवली. या यशात राज्य सरकारच्या प्रयत्नांबरोबरच केंद्र सरकारच्या नेतृत्वात झालेल्या शिष्टमंडळाच्या प्रयत्नांना मोलाचे यश मिळाले आहे." अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारे राज्यातील ११ आणि तामिळनाडूतील 'जिंजी' किल्ला अशा एकूण १२ गडकिल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याची बातमी ही प्रत्येक नागरिक, शिवप्रेमी आणि इतिहास प्रेमीच्या हृदयात अभिमानाचं स्फुल्लिंग पेटवणारी आहे. 

हे केवळ एक ऐतिहासिक यश नाही, तर स्वराज्याच्या स्थापनेसाठी लढलेल्या या गडकोटांना जागतिक स्तरावर मिळालेलं मान्यतेचं शिक्कामोर्तब आहे. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली उभे राहिलेले हे किल्ले  स्वराज्याच्या शौर्य, त्याग आणि स्वातंत्र्याच्या चळवळीचे सजीव साक्षीदार आहेत.

"आज या गडकिल्ल्यांना मिळालेला जागतिक दर्जा म्हणजे आपल्या इतिहासाच्या आणि सांस्कृतिक ठेव्याच्या समृद्धतेची कबुली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचा, युद्धनीतीचा आणि राज्यकारभाराच्या विचारसरणीचा अभ्यास आता जागतिक पातळीवर चर्चेचा, अभ्यासाचा आणि प्रेरणेचा विषय ठरणार आहे."

"या गौरवाच्या क्षणी एक मोठी जबाबदारी आपल्या सर्वांवर येऊन ठेपते ती म्हणजे या ऐतिहासिक वारशाचं जतन, संवर्धन आणि सन्मानपूर्वक देखभाल. किल्ल्यांची केवळ भेट देणं, फोटो काढणं आणि जयघोष करणं पुरेसं नाही तर त्यांच्या स्वच्छतेची, सुरक्षिततेची आणि ऐतिहासिक मर्यादेची जाणीव ठेवणं ही खरी शिवभक्ती आहे. इतिहास जिवंत ठेवायचा असेल, तर तो स्मरणातच नव्हे तर कृतीत उतरवावा लागतो. कारण, संवर्धनाशिवाय वारसा फक्त आठवण बनून राहतो."

या ऐतिहासिक क्षणाबद्दल भारत सरकार, पुरातत्व विभाग, इतिहास संशोधक आणि शिवप्रेमी जनतेचे सर्वांचेच योगदान महत्त्वाचे आहे. 

आपल्या गडकोटांना मिळालेला हा सन्मान केवळ अभिमानाचा क्षण नाही, तर पुढील पिढ्यांसाठी त्यांना सन्मानाने जपण्याच्या संकल्पाचा क्षण आहे.

Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

"युनेस्कोकडून मिळालेली ही मान्यता म्हणजे केवळ महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वैभवाला अधोरेखित करणारा सन्मान नाही, तर ती पर्यटन, स्थानिक रोजगार, संशोधन आणि नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे. महाराष्ट्रातील गडकोटांभोवती स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देणारी नवीन अर्थव्यवस्था निर्माण होण्याची दिशा या निर्णयामुळे निश्चित झाली आहे."

"शिवकालीन गडकोटांना युनेस्कोकडून मिळालेली मान्यता ही आपल्या संस्कृतीचा, स्वराज्य संकल्पनेचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचा जागतिक स्वीकार आहे. हे महाराष्ट्रासाठी एक तेजस्वी पर्व आहे. महाराष्ट्राच्या मातीतून घडलेली ही दुर्गशक्ती आता जागतिक मंचावर मानाने झळकणार  आहे."


या जागतिक मानांकनासाठी सांस्कृतिक कार्य विभागाच्या अंतर्गत असलेल्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय यांच्यातर्फे प्रस्ताव तयार करण्यात आला होता. यामध्ये रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी (महाराष्ट्र) आणि जिंजी (तामिळनाडू) यांचा समावेश होता.

युनेस्को’च्या जागतिक वारसा स्थळ मानांकनासाठी आवश्यक असलेल्या “अद्वितीय वैश्विक मूल्य (Outstanding Universal Value)” या निकषांवर हे किल्ले खरे उतरले. शिवकालीन दुर्गांचे सामरिक, स्थापत्य व सांस्कृतिक महत्त्व, सह्याद्रीच्या कुशल वापरातून साकारलेली माची स्थापत्यशैली आणि गनिमी काव्याचे युद्धतंत्र या सर्व बाबी मानांकनाच्या निर्णयामध्ये निर्णायक ठरल्या.

या ऐतिहासिक घडामोडीसाठी अनेक शासकीय यंत्रणांनी एकत्रितपणे कार्य केले. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण आणि संस्कृती मंत्रालय, भारत सरकारमार्फत २०२४-२५ या वर्षाकरिता निवडलेल्या ५ प्रस्तावांपैकी महाराष्ट्राचा मराठा लष्करी स्थापत्य हा प्रस्ताव प्रधानमंत्री कार्यालयाने युनेस्कोकडे पाठविण्यासाठी निवडला होता.

या यशस्वी प्रवासात वास्तुविशारद डॉ.शिखा जैन आणि पुरातत्व संचालक डॉ.तेजस गर्गे यांचे योगदान मोलाचे ठरले. ‘युनेस्को’च्या ४६व्या अधिवेशनात राज्यातील अधिकारी, गड संवर्धन समिती सदस्य व तज्ज्ञांचा सहभाग होता. ऑक्टोबर २०२४ मध्ये ICOMOS तज्ज्ञ श्री. ह्वाजोंग ली यांनी या १२ किल्ल्यांची स्थळ भेट घेतली आणि जिल्हाधिकारी व वनविभागांनीही सहकार्य केले.

या जागतिक मानांकनासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी युनेस्कोच्या  महानिर्देशकांची भेट घेऊन शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, भारताचे युनेस्कोतील स्थायी प्रतिनिधी विशाल शर्मा आणि पुरातत्व संचालनालयाचे उपसंचालक हेमंत दळवी या सर्वांच्या प्रयत्नांमुळे हे यश शक्य झाले.

Ajio  Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now!  For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'

                             Buy Now

"हे जागतिक मानांकन केवळ ऐतिहासिक किल्ल्यांचे गौरवगान नाही, तर पर्यटन, संशोधन व स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणारा निर्णायक टप्पा आहे. या माध्यमातून महाराष्ट्राचे शौर्य, स्थापत्य परंपरा आणि स्वराज्यरचना आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर अधोरेखित झाली आहे."

“छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेली दुर्गसंपदा म्हणजे महाराष्ट्राच्या शौर्याचा वारसा आहे. ‘युनेस्को’चा दर्जा हा त्या ऐतिहासिक समृद्धतेला जागतिक मान्यता देणारा आहे.” असे मत सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी व्यक्त केले आहे.

"छत्रपती शिवरायांचे १२ किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आले आहेत. मराठा साम्राज्याचा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी गड किल्ल्यांचा हा गौरव प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटावा असा आहे. शिवनेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, लोहगड, पन्हाळा, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग,सुवर्णदुर्ग,खांदेरी आणि तामिळनाडूतील जिंजी या किल्ल्यांना "अद्वितीय वैश्विक मूल्य" म्हणून जागतिक वारसा यादीत(world heritage list) अंतर्भूत करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अलौकिक नेतृत्वातील मराठ्यांचं शौर्य,पराक्रम आणि स्वराज्याचा दैदिप्यमान इतिहास जगभरातील नागरिकांना,पर्यटकांना परिचित होण्यास यामुळे मदत होणार आहे.यासाठी पाठपुरावा करणाऱ्या राज्य व केंद्र सरकार आणि युनेस्कोला मनस्वी धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान पराक्रमाला मानाचा सलाम" अशी प्रतिक्रिया मा. नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, शिवभक्त नंदकुमार जगताप यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.

"छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अद्वितीय दूरदृष्टीचा आणि पराक्रमाचा अमिट ठसा म्हणजे त्यांचे दुर्गराज – किल्ले. या किल्ल्यांमध्ये इतिहास, स्थापत्यकला, संरक्षणशास्त्र आणि स्वराज्याचे सत्त्व सामावले आहे. आज गर्वाने सांगावेसे वाटते की महाराजांचे १२ ऐतिहासिक किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाले आहेत. ही केवळ महाराष्ट्राचीच नव्हे तर संपूर्ण भारताची अभिमानास्पद कामगिरी आहे. या मान्यतेमुळे जागतिक स्तरावर आपल्या दुर्गसंस्कृतीचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. हे केवळ ऐतिहासिक स्मारक नसून ते प्रेरणास्थान आहेत. या निर्णयामुळे या किल्ल्यांचे संवर्धन आणि जागतिक पर्यटनदृष्ट्या विकास होण्यास मोठा हातभार लागेल. ही ऐतिहासिक घडी शिवप्रेमींना, इतिहासप्रेमींना आणि सर्व भारतीयांना अभिमानाची आहे. आम्ही शासन आणि युनेस्कोचे मनापासून आभार मानतो आणि या ऐतिहासिक वारशाचे संवर्धन करण्यासाठी कटिबद्ध आहोत." अशी प्रतिक्रिया प्रहारचे जनशक्ती पुणे जिल्हा उपाअध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते, शिवभक्त मंगेश ढमाळ यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी  बोलताना दिली.

"छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 ऐतिहासिक किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट होणे हा प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानास्पद  क्षण आहे. गड - किल्ले संवर्धन ही एक अशी महत्वपूर्ण बाब आहे की आपल्या पूर्वजांचा इतिहास पुढच्या पिढ्यांना कायम समजत रहावा म्हणून त्यांचे जतन आणि त्याचा वारसा हा जपला गेलाच पाहिजे.अनेक महत्वपूर्ण मुद्द्यांची योग्य काळजी घेत, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व, पर्यावरण संरक्षण, पर्यटन विकास, सामाजिक जाणीव जागृती, जनसमुदाय सहभाग, कायदेशीर संरक्षण, शिक्षण आणि जनजागृती, तंत्रज्ञानाचा वापर, नियम आणि योजना, योग्य विचार व योग्य अंमलबजावणी केल्यास आपला महाराष्ट्र हा कायम एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठेवा म्हणून जगामध्ये नावलौकिक कमवत राहील" अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते सुधीर ढमाले यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.

"जगाला प्रेरणा देणाऱ्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान इतिहासाचा, महान पराक्रमाचा व महान गड - किल्ल्यांचा गौरव जगप्रसिद्ध युनेस्कोने केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने पावन झालेल्या 12 किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळात समाविष्ट केल्यामुळे जगभरातील लाखो - करोडो शिवभक्तांची मान अभिमानाने उंचावली आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाचा, भारतातील प्रत्येक भारतीय माणसाचा जगभरात सन्मान वाढवणारा ही गौरवास्पद क्षण आहे. राज्य सरकारने महाराष्ट्रातील सर्वच गड - किल्ल्यांचे चांगल्या प्रकारे संवर्धन करून, जगभरातील लाखो पर्यटक महाराष्ट्रातील शेकडो गडकिल्ले पाहण्यासाठी यावेत यासाठी गडकिल्ल्यांचा सर्वांगीण विकास केला पाहिजे." अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र गर्जना न्यूजचे संपादक अजित जगताप यांनी दिली.

महाराष्ट्राची महान संस्कृती व महान इतिहास जगभरात पोहचण्यासाठी सरकारने व तरुण पिढीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. जगातील कुठल्याही क्षेत्रामध्ये मोठे यश मिळवण्यासाठी तरुण पिढीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातून प्रेरणा घेऊन, जिद्दीने चिकाटीने, निष्ठेने काम केले तर आपल्या आवडीच्या क्षेत्रातील उच्चतम पातळीवरती निश्चितच पोहोचू शकते. 

"भारत सरकारने व महाराष्ट्र सरकारने देशभरातील व महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक अभ्यासक्रमाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा महान इतिहास, महान जीवनकार्य एक चांगले शैक्षणिक धोरण म्हणून  शिकवले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेकडो गड - किल्ल्यांचे संवर्धन राज्य सरकारने, भारत सरकारने, महाराष्ट्रातील लाखो - करोडो शिवभक्तांनी एकजुटीने करणे गरजेचे आहे."

महाराष्ट्रातील वेगवेगळ्या सामाजिक संघटना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या विविध सामाजिक संघटना गड - किल्ले संवर्धनाचे खूप चांगले काम करत आहेत. सरकारने त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं रहाणे खूप गरजेचे आहे.

No comments:

Post a Comment