"डोळ्यांच्या कॅमेऱ्यात क्लिक झालेली वीरची ऐतिहासिक जत्रा! मनाला भिडलेली, माणुसकी समृद्ध करणारी जत्रा"..
जत्रा हा महाराष्ट्राचा एक धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा. अनेक जत्रा महाराष्ट्रात लोकप्रिय आहेत. त्यातलीच एक म्हणजे वीरची जत्रा! माघ पौर्णिमा जवळ येऊ लागली की महाराष्ट्राला वीरच्या यात्रेचे वेध लागतात. माघ पौर्णिमेच्या दिवशी देवाचं लग्न असतं, आदल्या दिवशी देवाला आणि देवीला हळद लावली जाते.
स्त्रिया या संधीचा न चुकता आनंद लुटतात. हळद लावण्यासाठी महिलांना थेट मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश असतो. पूर्वी श्रीनाथांच्या गाभाऱ्यात स्त्रियांना प्रवेश नव्हता. २०१४ पासून अमावस्या सोडून हा प्रवेश स्त्रियांसाठीही खुला करण्यात आला आहे. स्त्रियांना आणि इतर सर्वांनाच नेहमीच सर्व धार्मिक स्थळांमध्ये आणि मंदिरांमध्ये प्रवेश कायम खुला असावा, त्यावर कुणाची मक्तेदारी असू नये असं वाटतं. माणसांच्या श्रध्देची स्थानं जात, धर्म, लिंग, वर्ण, उच्च-नीच, गरीब-श्रीमंत अशा भेदभावांच्या सगळ्या भिंतींपासून मुक्त असावीत.
माघ पोर्णिमेच्या संध्याकाळपर्यंत सोनवडी, कन्हेरी, वाई, कोडीत, राजेवाडी अशा विविध ठिकाणाहून पालख्या येत असतात. पालख्यांसोबत अनेक भाविक वीरपर्यंत पायी आलेले असतात.. मग बाजारतळावर येऊन कुणी कसंही, कुठंही जागा मिळेल तिथं अंग टाकतं.
Flipkart Best Offer... Headphones & Speakers : Upto 80% Off... Limited Time Deal! Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
आजूबाजूच्या गोंगाटाची, गर्दीची कल्पना असूनही नसल्यासारखी.. कित्येक दिवसात अशी गाढ झोप त्यांना लागलीच नसावी असं वाटतं त्यांना पाहून. अगदी निरागस दृश्यं. हळूहळू चहूबाजूंनी अफाट गर्दी होते आणि पौर्णिमेच्या रात्री श्रीनाथ म्हस्कोबा आणि जोगेश्वरी देवीचं लग्न लागतं.
देवाचं लग्न लावलं की दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत यात्रा बरीच पांगलेली असते. पुन्हा चतुर्थी-पंचमीपर्यंत यात्रेला नवा रंग येतो, बैलगाड्या येऊ लागतात. पालं बांधली जातात. नव्याने जत्रा भरते.
"बैलगाड्या जुंपून, मजबूत ताटी बांधून, बैलांना सजवून-धजवून.. रंगरंगोटी करुन, घुंगरमाळा घालून, पायात चाळ चढवून चहुबाजूंनी बैलजोड्या खुळूखुळू तालावर वीरची वाट धरतात. तट्ट्या तर इतका सुरेख, व्यवस्थित बांधलेला असतो की पाहत राहावं! बैलगाड्या हे वीरच्या यात्रेतलं एक खास आकर्षण"..
"पुरंदरसह आसपासच्या भोर, वेल्हासारख्या तालुक्यांतून वीरच्या यात्रेला भाविक कुटुंबंच्या कुटुंबं ८-१५ दिवस राहायला येतात. पालं करुन राहणं हे वीरच्या यात्रेचं एक खास वैशिष्ट्य. यात विशेषतः चहुबाजूंचा शेतकरी वर्ग अधिक दिसतो. आतापर्यंत आम्ही कुटुंब घेऊन कधीच कोणत्या यात्रेला राहायला गेलेलो नाही, त्यामुळे या माणसांबद्दल नेहमीच अप्रूप वाटत आलंय."
Ajio Best Offer.. Casual Wear : Upto 90% Off | Starting at Rs 200... Shop Now! For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
कुणी भक्त निवास इमारतीत राहतात, तर कुणी शाळांच्या प्रांगणात, कुणी बाजार तळावर, कुणी काळूबाईच्या माळावर, कुणी विठ्ठल-रखुमाई मंदिराच्या आवारात, कुणी विरेश्वराच्या प्रांगणात आणि कुणी जागा मिळेल तिथं पालं उभारलेली असतात. वीरच्या यात्रेतली ही एक निराळीच मौज असते.
एकदा मी माझ्या ४ वर्षाच्या भाच्याला घेऊन जत्रेत बैलांचे, बैलगाड्यांचे फोटो काढत होते. तो सुद्धा हे एन्जॉय करत होता. काही बैलांच्या हावभावावरुन जर त्यांचा फोटो काढण्याला नकार आहे, हे ते दर्शवत असतात, तर तेव्हा मी फोटो नाही काढायचे. हे सारं मी माझ्या भाच्याशीही बोलत होते आणि त्याला ते समजत होतं.
आपण बैलांचा फोटो घेताना जर त्यांना कम्फर्ट असेल तरच फोटो घ्यायचा असं आम्ही ठरवलं. प्रवासाहून आल्यावर निवांत बसून आराम करणारी बैलं पाहताना जणू त्यांच्यातली शांतता जशीच्या तशी आपल्यापर्यंत पोहचते असं वाटतं. वीरच्या यात्रेत बैलजोड्यांचे फोटो क्लिक करणं हा छंदच जडलाय मला! एकदा काय झालं, मी बैलांचा फोटो काढत होते, तेवढ्यात त्या पालातले एक काका मला म्हणाले, की “तायडे बैलांच्या मालकाचा बी फोटो काढायचा असतो, बैलांसंगं...”
मीही आनंदाने पुन्हा क्लिक केलं! साहजिकच आहे, त्यांनीच त्यांची नीट काळजी घेतलेली असते आणि त्यांना सुदृढ केलेलं असतं. जनावरांच्या दाग-दागिन्यांची (घुंगुरवाळा, चाळ आणि बरंच काही) स्पेशल दुकानं असतात जत्रेत. तिथं अशा हौशी शेतकऱ्यांची झुंबड उडालेली असते.
"आपल्याला भावणारी आणखी एक गोष्ट म्हणजे ठिकठिकाणी रचलेल्या, पेटवलेल्या चुली.. घातलेला शेणाचा सडा. काही चुली तर इतक्या सुबकतेनं रचलेल्या आणि पांढऱ्या मातीनं सारवलेल्या असतात की त्या माऊलींच्या हातांच्या कलेची आणि मायेची चुणूक त्यात डोकावतेच. डोळ्यांच्या कॅमेऱ्यात आपोआपच क्लिक होतात असे क्षण! या पेटलेल्या चुली बिकट परिस्थितीत सकारात्मकता मनात तेवत ठेवणाऱ्या मशालीच वाटतात. स्थलांतरित कामगारांना पोटाला भाजी- भाकरी आणि उघड्यावर संसार थाटत पाठीवर बिऱ्हाड बांधत पुढं चालत राहायला बळ देतात."
यात्रा म्हटलं, की हौशी, नवसी आणि गवसी, ओघानं आलेच! यातले हौशी मला जवळचे वाटतात. हे हौशी जत्रेकरु मोजक्या साधन-सामग्रीवर पिढ्यानपिढ्या जत्रेला येत आले आहेत. म्हणतात नं.. ‘हौसेला मोल नाही..’ ते बैलांच्या चारा-पाण्याची चोख व्यवस्था करतात. चारा त्यांनी येतानाच आणलेला असतो.
माझ्या आईच्या भाषेत सांगायचं तर “प्रवासाचा शीण आलेला असला तरी त्यांची किती लगबग असते. बैलांना चारा-पाणी घालणं, चूल मांडणं, पिण्याचं पाणी आणणं, स्वच्छता, सडा-सारवण, पाठोपाठ कालवणं खदखदू लागतात. कोकणातल्या भाताचा दरवळ तर कुठल्या कुठे पसरलेला असतो.” कोणतं चैतन्य असतं या मंडळींमध्ये!
माझ्या वडिलांच्या ओळखीतले एक शेतकरी गृहस्थ त्यांच्या कुटुंबासह अनेक वर्षांपासून जत्रेला येतात. ३-४ दिवस पालात राहतात. त्यांचा पुरणपोळ्यांचा नैवेद्य असतो, दरवर्षी आमच्या घरुन दगडी पाटा-वरुटा घेऊन जातात, आमटीचं वाटण वाटायला. जेवणाचं एक ताट ते नेहमी आमच्यासाठी घेऊन येतात. त्या आमटीची चव काही निराळीच! यात्रेत गेलं की खूप ठिकाणी पंगती दिसतात, गोपाळ जेवताना दिसतात. यालाच ‘गजी’ किंवा ‘शिद’ घालणं असं म्हणतात. खरं तर यात्रेला आलेलं एक माणूसही उपाशी राहू नये, या विचारातून पुढे आलेली ही पद्धत आहे. या निमित्ताने जाती-धर्माचा भेदभावही मोडीत निघतो.
वीरच्या यात्रेवरचं प्रेम म्हणजे इथल्या घडशी-गोसाव्यांनी त्यांच्या बोलीभाषेत श्रीनाथ आणि जोगेश्वरीवर रचलेली गाणी.. त्यांना लावलेल्या सुंदर..लोकप्रिय चाली! यात्रेत ठिकठिकाणी वाजणारी ही गाणी ‘माहौल’ बनवतात.. छबिना आणि भाकणूक हे वीरच्या यात्रेतील महत्वपूर्ण धार्मिक भाग आहेत. छबिन्यातला नृत्यप्रकार मला विशेष आवडतो. वाद्यांच्या तालावर अनेक लोकं नृत्य करण्यात तल्लीन झालेली असतात.
भाकणूकीत सदर वर्षाचा पीक-पाण्याचा अंदाज मांडला जातो, कुठे दुष्काळ असेल, कुठे पाऊस होईल याचे अंदाज मांडले जातात. वीरच्या यात्रेत धनगर समाजातील मंडळींचंही विशेष महत्व. श्रीनाथांचे भक्त कमळाजी हे धनगर समाजातील होते असं मानलं जातं. त्यामुळे धनगरांचा देव अशी देखील श्रीनाथांची ओळख आहे. धनगर समाज मोठ्या प्रमाणात जत्रेत सामील होतो.
Samsung Mobile.. Best Buy is Live! Lowest Prices on Samsung Mobiles. For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
जत्रेत ओळखीचे भेटतात तसे अनोळखीही भेटतात.. किंवा नव्या ओळखी होतात. एकदा दाराच्या उंबरठ्यावर उभी राहून रस्त्यावरची वाहतूक पाहत होते. समोर एका जीपमधून जाणाऱ्या एका शाळकरी मुलाने माझ्याकडे पाहून हात केला. तो माझ्या ओळखीचा नव्हता, पण तरीही मीही त्याला प्रतिसाद म्हणून हात केला. पुढे कधीतरी त्या मुलाशी भेट होईल असं उगाच वाटत होतं. जवळपास एक वर्षानंतर वेल्ह्यातल्या गुंजवणेच्या शाळेत जाण्याचा प्रसंग आला.
तिथल्या प्राथमिक शाळेत सहावीच्या वर्गातल्या मुलांशी मी बोलत होते.. (तेव्हा एका सामाजिक संस्थेसोबत मी वेल्हा तालुक्यातील शाळांसोबत जीवन कौशल्य शिक्षणाचा प्रकल्प राबवत होते.) तेव्हा एक मुलगा पुढे आला आणि म्हणाला, ‘ताई वीरच्या जत्रेत मी तुम्हाला हात केला होता...’ ओळखलेलं नसताना मीही त्याला हात केला याबद्दल आश्वस्त वाटलं मला आणि मस्तही!
यात्रा म्हणताच अनेक आकर्षणं आपल्याला खुणावू लागतात. नकली दागिन्यांची, खेळण्यांची, बांगड्यांची दुकानं, पाळणेवाले, गारीगारवाले, गुड्डी के बालवाले, फुगेवाले आणि बरंच काही.. व्यक्तीपरत्वे ही आकर्षणं वेगवेगळी असतात. लहान मुलांचं एका खेळण्याने आणि एका पाळण्यात बसल्याने मन भरत नसतंच. उडवायला फुगे आणि वाजवायला पिपाण्या असतातच. अधून-मधून चमचमीत खाऊचा ब्रेकही असतो.
वीरच्या जत्रेत काचेच्या बांगड्यांच्या दुकानांनी (कासारांनी) आख्खी एक रांग व्यापलेली असते. तिथून जाताना जत्रेतल्या भुयारात गेल्यासारखं वाटतं. लाकडी वस्तू हे जत्रेतलं एक खास आकर्षण. लाकडी पोळपाट लाटणं, काटवट, डाव, शोभेच्या वस्तू आणि बरंच काही. लोखंडी भांड्यांच्या दुकानांचीही हल्ली गर्दी दिसते. यांचा जणू एक स्वतंत्र सेक्शनच असतो. विशेषतः महिलांची तिथं झुंबड उडालेली असते.
लाकडापासून बनवलेल्या या वस्तूंची रचना आणि सुबकता पाहणं, त्या हाताळणं यातही खूप आनंद वाटतो. विक्रेते विक्रीला बसलेले असताना दुसऱ्या बाजूला पोळपाटांना सुबक आणि मजबूत बनवण्याचं त्यांचं कामही चालूच असतं. लोकरीच्या जेन, घोंगड्यांचा बाजार हे या यात्रेतलं एक विशेष आकर्षण. मागच्या अनेक वर्षांपासून त्यांचा बाजारही विशिष्ट ठिकाणीच भरतो! यात्रेत किती वेगवेगळ्या वस्तू, कपडे, खाद्यपदार्थ विकायला असतात, आनंद देणारी, मनोरंजनाची साधनं असतात. सामान्य माणसाच्या नजरेतून पाहायचं तर जत्रेत विविध प्रकारे मोठी आर्थिक उलाढालही होत असते.
पूर्वी तमाशा हे देखील वीरच्या यात्रेचं एक खास आकर्षण होतं. पुरुष मंडळींची तुफान गर्दी व्हायची. मला नेहमी प्रश्न पडायचा, तमाशा सादर करायला महिला असतात, त्यांचा नाच आणि बरंच काय काय असतं, पण मुलींना आणि स्त्रियांना तिथं जाण्याची, प्रेक्षक म्हणून अनुभव घेण्याची बंदी का असते? याचं समाधानकारक उत्तर आजही मिळत नाही. तमाशाच्या वेळी तंबूच्या बाहेर होणारी भांडणंही आपण कायम ऐकून असतो, कदाचित अशाच कारणामुळे मागच्या काही वर्षांपासून इथे वर्षानुवर्षापासून चालणारी तमाशाची परंपरा खंडीत झाली आहे. मागच्या काही वर्षांपासून आखाड्यात कुस्त्यांचा डावही रंगतो.
Tata CLiQ...Best Offer... Ten Ten Sale is LIVE! Upto 80% Off Across Categories....For Special Discount Offers Click on Below 'Buy Now'
Buy Now
यात्रेतली गंमत म्हणजे कुणालाही फोन करायचं म्हटलं की पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहावा लागतो, वीरला असा अनुभव वर्षातून याच वेळेला येतो. ज्याने त्याने कानाला मोबाईल लावलेला असतो. अर्थातच नेटवर्क जाम असतं. अफाट गर्दी झालेली असते. काहींना गुलालात माखलेली गर्दी पाहायला आणि त्या गर्दीत निव्वळ फिरायलाही आवडतं. दुकानांच्या रांगांमधून तरूण मुलं उगाच इकडून तिकडं, तिकडून इकडं फिरत असतात.
काही जण तर लक्ष वेधून घेण्यासाठी मोठ्यानं पिपाण्या वाजवतात. वय हो! दुसरं काय! यात्रेतली गर्दी .. वाहतुकीची कोंडी आणि जागोजागी तैनात असलेलं पोलीस दल हे एक समीकरणच! अनेक पोलीस स्त्रियाही बंदोबस्ताला असतात. त्यांचे यात्रांमधले अनुभव काय आहेत, हेही कधीतरी जाणून घ्यायला हवं!
जत्रेत गोडाचा नैवेद्य.. म्हणजे पुरणपोळीचा आणि तिखटाचा म्हणजे मटणाचा. दोन्ही जेवणावळींचा यथेच्छ आनंद घेणारी असंख्य मंडळी समाजात आहेत. तरीही सध्याच्या परिस्थितीत अन्न म्हणून न पाहता, शाकाहार-मांसाहार यांच्या मान-अपमानावरुन होणारी चर्चा ही केवळ जातीय/धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या हेतूने केली जाताना आढळते.
वास्तविक पाहता दोन्ही प्रकारच्या आहारांना आपल्या धर्माने आणि संस्कृतीनेही सामावून घेतलं आहे. प्रत्यक्षात आपल्या यात्रा-जत्राही सहकार्य, माणुसकी, एकोपा आणि धार्मिक सलोखा रुजवू पाहत असतात माणसा-माणसामध्ये.. छबिन्यात कसलाही भेदभाव विसरुन नाचणं असेल, मिळेल त्या पंगतीला जेवणं असेल, शेजारुन येणाऱ्या-जाणाऱ्यांचा धक्का लागून लागून आपणही गुलालात रंगून जाणं असेल!
माझ्या नजरेनं टिपलेली.. मला उमगलेली वीरची यात्रा मांडण्याचा प्रयत्न केलाय.
लेखिका : - सामाजिक कार्यकर्त्या, प्राजक्ता धुमाळ.