Thursday, April 29, 2021

"महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान 'श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्ट वीर' यांनी जपली सामाजिक बांधिलकी; वीर येथील 'शंभर बेडचे सुसज्ज कोविड सेंटरचे' खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन, पुरंदरचे लोकप्रिय आमदार संजय जगताप यांच्या उपस्थितीत लोकार्पण ...



वीर, दि. 28 : - कोरोना महामारीने संपूर्ण महाराष्ट्रात हाहाकार माजवलेला आहे. महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आलेला असताना  पुणे जिल्ह्यातील, पुरंदर तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान श्रीनाथ म्हस्कोबा  देवस्थान ट्रस्ट वीर यांनी सामाजिक बांधिलकी जपत, होप फाउंडेशन व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वीर येथे 100 बेडचे सुसज्ज कोविड सेंटर चालू करून कोरोनाकाळात पुरंदरकर नागरिकांसाठी चांगली आरोग्य सुविधा निर्माण केली.




पुरंदर तालुक्यातील वीर येथील  भक्तनिवास मध्ये श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्ट, आरोग्य विभाग व होप फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या कोवीड सेंटरचा लोकार्पण सोहळा खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आला. 



यावेळी पुरंदरचे लोकप्रिय आमदार संजय जगताप, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव, माजी जिल्हा परिषद सदस्य हेमंतकुमार माहूरकर, माजी सभापती अर्चना जाधव, राष्ट्रवादीचे नगरसेवक अमर धुमाळ, माजी पंचायत समिती सदस्य दिलीप धुमाळ, पुष्कराज जाधव, सोमेश्वर कारखान्याच्या संचालिका ऋतुजा धुमाळ, प्रसिद्ध उद्योजक विठ्ठल धुमाळ,  वीर देवस्थान चेअरमन संतोष धुमाळ, वीर देवस्थानचे  विश्वस्त व सल्लागार  मान्यवर म्हणून उपस्थित होते.




व्हिडिओ कॉल वरुन संवाद साधताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "देवस्थानने उभारलेले भक्त निवास कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी मिळाल्याचे समाधान वाटत आहे. केंद्र सरकारकडून मिळणारी मदत तोकडी असली तरी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या नियोजनामुळे लसीकरण व उपचारांमध्ये देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. पुरंदर  वासियांनी शासनाच्या नियमांचे पालन करून चांगली शिस्त पाळली आहे.हे युद्ध आपण सगळे मिळून जिंकण्याचा विश्वास देऊन कोरोनाचे संकट गेल्यावर सर्व सहकाऱ्यांसमवेत श्रीनाथ म्हस्कोबांच्या दर्शनासाठी येणार असल्याचे सांगितले."



कार्यक्रमा दरम्यान जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती रणजीत शिवतारे यांनी सर्वांशी संवाद साधला.




यावेळी बोलताना पुरंदरचे आमदार संजय जगताप म्हणाले की, "खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली वीर येथे  शंभर बेडचे सुसज्ज कोवीड सेंटर सुरू करण्यात आले असून हे कोवीड सेंटर दक्षिण पुरंदर मधील नागरिकांना वरदान ठरणार आहे. दिवे, सासवड, खळद , जेजुरी येथील कोवीड सेंटरचा ताण कमी होण्यास मदत होणार असल्याचे सांगितले."



  "देवस्थान ट्रस्टच्या वतीने भक्त निवासा मधील सहा मोठे हॉल , पिण्याचे शुद्ध पाणी, लाईट व रुग्णवाहिका पुरवण्यात आली असून विठ्ठलराव गणपतराव धुमाळ यांच्या वतीने पाच लाख रुपये किंमतीचे ७० बेड या कोवीड सेंटरला भेट देण्यात आले असल्याचे" वीर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष धुमाळ यांनी सांगितले. 





यावेळी तालुका आरोग्य अधिकारी उज्वला जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ स्वप्नाली शिंदे , संतोष दुधाळ, मयूर जगताप,सरपंच माऊली वचकल, राजेंद्र धुमाळ, महेश राऊत,समीर जाधव,शरद जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुष्कराज जाधव व आभार देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त, सचिव अभिजित धुमाळ यांनी मानले.



" कोरोना महामारीने संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिक त्रस्त झालेले असताना पुरंदर मधील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळण्यासाठी वीर देवस्थान ट्रस्टने 100 बेडचे सुसज्ज कोविड  सेंटर सुरू करण्यासाठी उचललेले पाऊल खूपच कौतुकास्पद असून सामाजिक बांधिलकी जपून समाजात एक चांगला आदर्श निर्माण केलेला आहे अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र गर्जना न्यूज चे संपादक अजित जगताप यांनी दिली.




कोरोना काळात महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी होण्यासाठी वेगवेगळ्या सामाजिक संघटनांनी, पक्षांनी तसेच देवस्थान ट्रस्टने आरोग्य सुविधा निर्माण करून पुढाकार घेणे गरजेचे आहे.





Thursday, April 8, 2021

"पुणे शहरात 'कोरोनाचा महाउद्रेक' आज 'एका दिवसात' कोरोनाबाधितांचा आकडा '७०००' पार;" कोरोनाबाधित रुग्णसंख्येने उच्चांक गाठल्याने चिंता वाढली, ४३ जणांचा मृत्यू...

 

पुणे, दि. 08 : - महाराष्ट्रात तसेच पुणे शहरातील कोरोना संसर्गाचा विळखा वाढताना दिसत आहे. पुणे शहरात  कोरोनाबाधित रुग्णसंख्येचा उद्रेक  झालेला दिसून येत आहे. आज गुरुवारी पुणे शहरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने चिंता वाढवणारा नवा उच्चांक गाठला.  आज 'पुणे शहरात कोरोना बाधित 7,010 नवे रुग्ण आढळल्याने प्रशासनाची व नागरिकांचीही चिंता वाढली आहे'.





पुणे शहरात 48,939 रुग्णांवर उपचार चालू आहेत. आज 4,099 रुग्ण कोरोना मुक्त होऊन, बरे होऊन घरी गेले. आज कोरोना संसर्गामुळे पुणे शहरात 43 लोकांचा मृत्यू झाला. मागील काही दिवसांपासून पुणे शहरातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढत असल्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे.




पुणे महानगरपालिका प्रशासन, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग कोरोना संसर्ग कमी होण्यासाठी अनेक उपाय योजना राबवत आहेत.  कोरोना बाधित रुग्णांचा आकडा कमी होण्यासाठी पुणे शहरात कडक निर्बंध लागू केलेले आहेत. 




1) संध्याकाळी ६ ते सकाळी ६ पर्यंत संचारबंदी (अत्यावश्यक सेवा वगळून) तर दिवसा जमावबंदी.


२) ७ दिवस हॉटेल, मॉल्स, बार, सिनेमा हॉल, प्रार्थनास्थळे, आठवडी बाजार, जिम, नाट्यगृह बंद.


3) पार्सल सेवा सुरू राहणार.


4) पीएमपीएल बस सेवा पुर्णतः बंद.


5) लग्न आणि अंत्यविधी सोडून इतर कार्यक्रमावर पूर्णतः बंदी.


6)मंडई, मार्केट यार्ड, सोशल डिस्टंसिंग राखून सुरू.


7) बागा सकाळच्या वेळेत सुरू राहणार.


8) शाळा, कॉलेज 30 एप्रिल पर्यंत बंद.


9) दहावी बारावीच्या परीक्षा वेळेत होणार.


10) एमपीएससी 10 वी, 12 वी च्या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ देणार नाही.


शुक्रवारी या निर्बंधांचा फेरआढावा घेतला जाणार आहे.


महाराष्ट्रातील वाढत्या कोरोनाबाधित रुग्णांची धडकी भरवणारी संख्या पाहून महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर दिसत आहे.



पुणे शहरातील नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टंसिंग या त्रिसूत्रीचा अवलंब करणे खूप गरजेचे आहे.





'पुणे शहरातील कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होण्यासाठी शहरातील जास्तीत जास्त नागरिकांना कोरोनाची लस मिळणे खूप गरजेचे आहे.'






Wednesday, April 7, 2021

कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक 'ऑक्सिजनचा पुरवठा' रुग्णालयांना होत नसल्यामुळे; "प्रहार जनशक्ती पक्षाच्या शिलेदारांचे पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन"...

 


पुणे, दि.7 : - पुणे शहरात कोरोना संसर्गाचा विळखा वाढताना दिसत आहे. कोरोना बाधित रुग्ण संख्येचे नवे नवे उच्चांक पाहायला मिळत आहेत. पुणे शहरातील आरोग्य यंत्रणेसमोर  मोठ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. कोरोना बाधित रुग्णांना व्हेंटिलेटर बेड, ऑक्सीजन बेड मिळत नाहीयेत अशा तक्रारी नागरिक करत आहेत. 



पुणे शहरातील  रुग्णालयांना नियमितपणे ऑक्सिजन मिळत नाहीये त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करायला अडचण येत असल्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करून निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांना या ऑक्सिजनच्या गंभीर समस्ये संदर्भात निवेदन देण्यात आले.




यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे पुणे जिल्हा युवा कार्याध्यक्ष संतोष साठे, रुग्णसेवक उमेश महाडिक, प्रहार जनशक्ती पक्ष  सदस्य, रुग्णसेवक नयन पुजारी, अमोल मानकर, नितीन पगार, शुभम शहा, अमोल शेरकर, संदीप नवले, सागर ननवरे व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.




"पुणे शहरात ऑक्सिजन उपलब्ध नसल्यामुळे पेशंट दगावला जात आहे. जाब विचारायचा कुणाला?ॲम्बुलन्स मध्ये ऑक्सिजन उपलब्ध नाही. हॉस्पिटल मध्ये ऑक्सिजन उपलब्ध नाही. मग पेशंटनी काय करायचे? महानगरपालिकेच्या गेटवर जाऊन उपचार घ्यायचे का?  पुणे शहरातील अशी गंभीर स्थिती चालू राहिल्यास भरपूर पेशंट उपचाराविना दगावण्याची भीती वाढत चालली आहे. आणि त्याकरता सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल त्यामुळे आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने प्रशासनाला विनंती केलेली आहे की आपण या गोष्टीवर लवकरात लवकर लक्ष घालावे जर परिस्थितीत बदल न झाल्यास राज्यमंत्री  बच्चुभाऊ कडू  यांच्या आदेशानुसार प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने आंदोलन करू." अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते व रुग्णसेवक नयन पुजारी यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.






Sunday, April 4, 2021

महाराष्ट्रातील कोरोना रुग्ण संख्येच्या उद्रेकामुळे "राज्य सरकारने लागू केले 'हे' नवीन कडक निर्बंध"; "मिशन ब्रेक द चेन" नियमावली वाचा सविस्तर...

 


मुंबई दि. 4, महाराष्ट्र गर्जना न्यूज : महाराष्ट्रात आज  कोरोना रुग्ण संख्येचा उद्रेक झाला. आज महाराष्ट्रात  सत्तावन्न हजार पेक्षा जास्त कोरोना बाधित रुग्ण आढळले. कोरोनाचा झपाट्याने वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य मंत्री परिषदेने आज काही कडक निर्बंध लावण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. सोमवार 5 एप्रिल रात्री 8 पासून 30 एप्रिलपर्यंन्त याची अंमलबजावणी केली जाईल. हे निर्बंध लावताना एकीकडे राज्याच्या अर्थचक्राला धक्का न लावणे तसेच कामगार व श्रमिकांना त्रास न होण्याची काळजी घेण्यात आली असून लोकांची गर्दी होणारी ठिकाणे बंद करण्यावर भर देण्यात आला आहे. शेतीविषयक कामे, सार्वजनिक व खासगी वाहतूक सुरळीतपणे सुरूच राहील मात्र खासगी कार्यालये, उपाहारगृहे, चित्रपटगृहे, गर्दीची ठिकाणी बंद राहतील. आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवार रात्र ते सोमवार सकाळ असा दोन दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन लावण्याचाही निर्णय झाला.




या निर्णयानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या निर्बंधांचे काटेकोर पालन करण्यात सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन करताना आपण विरोधी पक्षांशी देखील बोललो असून त्यांनी देखील याबाबत सहकार्य करण्याची तयारी दर्शविल्याचे सांगितले.


यापुढे या आदेशांना मिशन बिगीन अगेन ऐवजी ‘ब्रेक दि चेन’ असे संबोधण्यात येईल.




यातील कोणत्या गोष्टी सुरु राहतील आणि कशावर निर्बंध राहील याची माहिती पुढीलप्रमाणे:


शेतीविषयक कामे सुरु


शेती व शेतीविषयक कामे, अन्नधान्य व शेतमालाची वाहतूक नेहमीप्रमाणे सुरळीतपणे सुरू राहील.


रात्री संचारबंदी, दिवसा जमावबंदी


राज्यात 144 कलम लागू केले जाईल. सकाळी 7 ते रात्री 8 जमावबंदी म्हणजे 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई राहील तसेच रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीस योग्य कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही. यातून वैद्यकीय व इतर अत्यावश्यक सेवा वगळण्यात येतील.


बागा, चौपाट्या, समुद्र किनारे आदी सार्वजनिक ठिकाणे रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत पूर्णतः बंद राहतील. दिवसा दिवसा या सार्वजनिक ठिकाणी लोकं आरोग्याचे नियम न पाळता गर्दी करीत आहेत असे लक्षात आले तर स्थानिक प्रशासन ते ठिकाण पूर्णपणे बंद करू शकते.





आवश्यक सेवेतील दुकानेच सुरु


किराणा, औषधी, भाजीपाला आदी जीवनावश्यक व आवश्यक वस्तू सोडून इतर सर्व प्रकारची दुकाने, मॉल्स, बाजारपेठा, 30 एप्रिलपर्यंत बंद राहतील. अत्यावश्यक वस्तू व सेवांच्या दुकानातील दुकानदार व कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करावे तसेच स्वत: व ग्राहकांकडून नियमांचे पालन होते किंवा नाही ते पाहावे.


सर्व प्रकारची वाहतूक नियमितपणे सुरूच


सार्वजनिक व खासगी अशी सर्व प्रकारची वाहतूक नियमितपणे सुरूच राहील. रिक्षांमध्ये चालक व दोन प्रवासी, टॅक्सीमध्ये चालक आणि निश्चित केलेल्या प्रवाशांपैकी 50 टक्के प्रवासी प्रवास करू शकतील.


सार्वजनिक व खासगी बसेसमध्ये उभे राहून प्रवास करता येणार नाही. आसनांवर बसलेल्या प्रवाशांनाच परवानगी आहे. प्रवाशांनी मास्क घातलेला हवा.


बस चालक, वाहक व इतर कर्मचारी यांनी आपले लसीकरण पूर्ण करावे किंवा कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र बाळगावे. बाहेरगावी जाणाऱ्या रेल्वेमध्ये सर्वसाधारण डब्यात उभ्याने प्रवासी असू नयेत तसेच प्रवासी मास्क घालतील याची काळजी रेल्वे प्रशासनाने घ्यायची आहे.




वित्तीय सेवा सोडून इतर खासगी कार्यालये बंद


खासगी कार्यालयांनी पूर्णपणे वर्क फ्रॉम होम करणे बंधनकारक राहील. केवळ बँका, स्टॉक मार्केट, विमा, औषधी, मेडिक्लेम, दूरसंचार, अशी वित्तीय सेवा देणारी तसेच स्थानिक आपत्ती व्यवस्थापन, वीज , पाणी पुरवठा करणारी कार्यालये मात्र सुरू राहतील.


शासकीय कार्यालये- ५० टक्के उपस्थितीत


शासकीय कार्यालये जी थेट कोरोनाशी संबंधित नाहीत तेथील कर्मचारी उपस्थिती 50 टक्के मर्यादेपर्यंत राहील. शासकीय कार्यालयांत अभ्यागतांना प्रवेश नसेल. आवश्यक असेल तर कार्यालय किंवा विभाग प्रमुखाचा प्रवेश पास लागेल. कार्यालयांतील बैठका ऑनलाईनद्वारे घ्याव्यात. केवळ कार्यालय परिसरातल्या कर्मचाऱ्यांना बैठकीस प्रत्यक्ष उपस्थित राहता येईल.


मनोरंजन, सलून्स बंद


मनोरंजन व करमणुकीची स्थळे बंद राहतील. चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे, व्हिडीओ पार्लर्स, क्लब्स, जलतरण तलाव, क्रीडा संकुले,  सभागृहे, वॉटर पार्क्स पूर्णपणे बंद राहतील.


प्रार्थना स्थळे दर्शनार्थीसाठी बंद


सर्वधर्मीयांची स्थळे, प्रार्थना स्थळे बाहेरून येणारे भक्त व दर्शनार्थीसाठी  बंद राहतील मात्र याठिकाणी काम करणारे कर्मचारी , पुजारी वगैरे यांना दैनंदिन पूजा अर्चा करता येईल. या कर्मचाऱ्यांचे लसीकरण देखील लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावे.


उपाहारगृहे व बार पूर्णतः बंद


उपाहारगृहे व बार पूर्णतः बंद राहतील. पण उपाहारगृह एखाद्या हॉटेलचा भाग असेल तर ते तेथे राहणाऱ्या अभ्यागातासाठीच सुरू ठेवता येईल, बाहेरील व्यक्तीसाठी प्रवेश असणार नाही. मात्र टेक अवे किंवा पार्सलची सेवा सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सुरू राहील.




खाद्य विक्रेत्यांसाठी पार्सल सेवा


रस्त्याच्या कडेला असणाऱ्या खाद्य विक्रेत्यांना सकाळी ७ ते रात्री ८ केवळ पार्सल सेवेसाठी व्यवसाय सुरू ठेवता येईल. पार्सलची वाट पाहणाऱ्या ग्राहकांना सुरक्षित अंतर नियमांचे पालन करावे लागेल. मात्र नियमांचे पालन होत नाही असे दिसले तर स्थानिक प्रशासन ते पूर्णपणे बंद करता येईल.


ई कॉमर्स सेवा सुरु


ई कॉमर्स सेवा नियमितपणे सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सुरूच राहील. होम डिलिव्हरी देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेले असणे अत्यावश्यक आहे. अन्यथा त्या व्यक्तीस 1000 रुपये आणि संबधीत दुकान किंवा संस्थेस 10 हजार रुपये दंड ठोठावण्यात येईल.


सर्व कटिंग सलून्स, ब्युटी पार्लर्स, स्पा बंद राहतील. याठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी देखील लवकरात लवकर लसीकरण पूर करावे.


वृत्तपत्रे छपाई आणि वितरण सुरु


वृत्तपत्रे छपाई आणि वितरण नेहमीप्रमाणे सुरू ठेवण्यात येईल मात्र विक्रेत्यांनी लसीकरण करून घ्यावे.


शाळा- महाविद्यालये बंद राहतील. मात्र 10 वी व 12 वी परीक्षांचा अपवाद असेल. सर्व खासगी क्लासेस बंद राहतील.





उद्योग व उत्पादन क्षेत्र सुरू


उद्योग व उत्पादन क्षेत्र सुरूच राहील, मात्र याठिकाणी आरोग्याचे नियम पाळले गेलेच पाहिजेत याची काळजी व्यवस्थापनाने घ्यावी.


चित्रीकरण सुरु ठेवता येईल मात्र गर्दीचा समावेश असलेली चित्रीकरणे करू नये तसेच सर्व कर्मचारी व चित्रीकरण स्थळावरील लोकांची आरटीपीसीआर चाचणी प्रमाणपत्र बंधनकारक आहे. 10 एप्रिलपासून याची अंमलबजावणी होईल.


आजारी कामगाराला काढता येणार नाही


बांधकामे सुरू असलेल्या ठिकाणी मजूर, कामगारांनी राहणे गरजेचे आहे.  केवळ साहित्याची वाहतूक करण्यासाठी परवानगी देण्यात येईल. कोणत्याही कामगारास कोविड झाला या कारणासाठी काढून टाकता येणार नाही. त्याला आजारी रजा द्यायची आहे. रजेच्या काळात त्याला पूर्ण पगार द्यावा लागेल कामगारांची आरोग्य तपासणी ठेकेदाराने करायची आहे.


तर सोसायटी मिनी कंटेन्मेंट


5 पेक्षा जास्त रुग्ण एखाद्या सोसायटीत आढळल्यास ती इमारत मिनी कंटेन्मेंट म्हणून घोषित करणार. तसा फलक लावणार , बाहेरच्या लोकांना प्रवेश बंदी.


महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचे आकडा कमी होण्यासाठी सर्वच नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन केले पाहिजे. तसेच मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टंसिंग या त्रिसूत्रीचा अवलंब करणे गरजेचे आहे.



महाराष्ट्रातील प्रसिद्ध 'सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई' यांना राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी "भुमाता ब्रिगेड संघटनेविषयी विचारले परखड, जाहीर प्रश्न"....

 


पुणे, दि. 4 : - महाराष्ट्रातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी भुमाता ब्रिगेड या संघटनेविषयी परखडपणे जाहीर प्रश्न विचारलेले आहेत. 




राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका अभ्यासपूर्ण व आक्रमकपणे विविध चॅनेलवर विकास लवांडे मांडत असतात. महाराष्ट्रातील महिला प्रश्नांसाठी लढणाऱ्या प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना भुमाता ब्रिगेड संघटनेविषयी विकास लवांडे यांनी विचारलेले परखड, जाहीर प्रश्न त्यांच्याच शब्दात खालील प्रमाणे...





राष्ट्रीय नेत्या सन्मानीय  तृप्ती देसाई यांना जाहीर प्रश्न :


आपली भूमाता महिला ब्रिगेड ही स्वयंसेवी संस्था आहे की संघटना? याची माहिती मिळावी.


ब्रिगेडची अधिकृत नोंदणी असेल तर त्याबाबतची रजिस्टर नंम्बर वगैरे सविस्तर माहिती मिळावी.


सदर ब्रिगेडची संस्थापक सदस्य , राष्ट्रीय  कार्यकारीणी , राज्य कार्यकारिणी ,पुणे कार्यकारिणी  ,संस्थापक सदस्य , ब्रिगेडचे मुख्य कार्यालय पत्ता , इत्यादी सर्वांचे नाव, पत्ते, संपर्क नंम्बर कुठं मिळेल ? कोण देईल ?


आपल्या जाहिरात स्वरूपाच्या वेबसाईटवर ही सर्व माहिती का दिलेली नाही ? 


सदर ब्रिगेडच्या वतीने वार्षिक अधिवेशन ,मासिक बैठका होतात किंवा कसे ? 


ब्रिगेडचा वार्षिक जमाखर्च, हिशोब वगैरे लेखापरीक्षण दरवर्षी होत असल्यास त्याबाबत धर्मादाय आयुक्तांकडे सादर केला जातो किंवा कसे ? 


भूमाता महिला ब्रिगेडचा दैनंदिन ,मासिक ,वार्षिक सर्व प्रकारचा खर्च कसा भागवला जातो? त्याबाबत माहिती मिळावी.

 

आपल्याकडे महिला अत्याचार प्रकरण आल्यास त्याबाबतची कार्यपद्धती काय असते ?  आलेल्या तक्रारीबाबत खऱ्या खोट्याची वास्तवाची शहानिशा करण्याची आपल्याकडे काही विशिष्ट यंत्रणा किंवा पद्धत आहे काय ? असेल तर त्याबाबत स्पष्टीकरण मिळेल का ?


ब्रिगेडचे सदस्यत्व घेण्यासाठी नियम, अटी, फी इत्यादी काय आहेत ? 


आजपर्यंत महिला अत्याचार प्रकरणात ब्रिगेडच्या प्रयत्नामुळे किती व कोणत्या आरोपींना शिक्षा मिळाली आहे त्याची माहिती मिळेल का ? 


भूमाता महिला ब्रिगेडमध्ये कोणत्याही पत्रकार परिषदेत किंवा तुमच्या तथाकथित आंदोलनात राष्ट्रीय नेत्या तृप्ती देसाई वगळता  इतर मुख्य पदाधिकारी कुणीही कधीच दिसत नाहीत , याचे कारण काय ? 


भूमाता ब्रिगेडचे मुख्य ध्येय , धोरण, उद्दिष्ट व आपली राष्ट्रीय विचारधारा काय आहे ? आपण हिंसा मानता किंवा अहिंसा मानता ? 


आपल्या वेबसाईटवर मोघम स्वरूपाची व जाहिरात स्वरूपाची माहिती आहे ,ब्रिगेडबाबत संघटनात्मक सर्व तांत्रिक व कायदेशीर सर्व सविस्तर माहिती वेबसाईटवर उपलब्ध का नाही ?


आपल्या ब्रिगेडला शासन यंत्रणा , पोलीस यंत्रणा , महिला आयोग , न्यायव्यवस्था यांवर विश्वास आहे किंवा कसे ? 


भूमाता महिला ब्रिगेडकडे महिलांच्या प्रश्नांवर कार्यरत असलेल्या पदाधिकारी व सदस्यांचे अधिकृत प्रशिक्षण झालेले आहे किंवा कसे ? प्रशिक्षित महिला किती आहेत? 


आपल्याकडे कुणीही पीडित स्त्री पुरुष न्याय मागायला येतात तेव्हा त्यांचेकडून फी स्वरूपात किती पैसे घेतले जातात किंवा कसे ?


आपल्या ब्रिगेडचा स्त्री पुरुष  विषयक दृष्टिकोन कसा व कोणता आहे ? त्याबाबत काही स्पष्ट विचारधारा आहे काय ? 


भूमाता ब्रिगेडच्या राष्ट्रीय नेत्या सन्मानीय तृप्तीताई देसाई यांनी वरील सर्व प्रश्न व मुद्यांची सविस्तर अधिकृत माहिती विषयाला अजिबात फाटे न फोडता व कसलीही चिडचिड न करता जगजाहीर देणे त्यांची नैतिक व कायदेशीर जबाबदारी आहे. कृपया विषयांतर नको.


------ विकास लवांडे

  (एक सामान्य नागरिक )




भुमाता ब्रिगेड या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून तृप्ती देसाई महाराष्ट्रात आणि देशभरात महिलांना न्याय मिळण्यासाठी, महिला प्रश्नांसाठी  आक्रमकपणे आंदोलन करत असतात यावेळी अनेकदा टिकेला सामोरे जावे लागते.



Saturday, April 3, 2021

"पुणे शहरात 'कोरोनाचा उद्रेक' आज 'एका दिवसात' कोरोनाबाधितांचा आकडा ५७०० पार;" कोरोनाबाधित रुग्णसंख्येने उच्चांक गाठल्याने चिंता वाढली, ३५ जणांचा मृत्यू...

 


पुणे, दि. 03 : - महाराष्ट्रात तसेच पुणे शहरातील कोरोना संसर्गाचा विळखा वाढताना दिसत आहे. पुणे शहरात  कोरोनाबाधित रुग्णसंख्येचा उद्रेक  झालेला दिसून येत आहे. आज शनिवारी पुणे शहरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने चिंता वाढवणारा नवा उच्चांक गाठला.  आज 'पुणे शहरात कोरोना बाधित 5,720 नवे रुग्ण आढळल्याने प्रशासनाची व नागरिकांचीही चिंता वाढली आहे'.




पुणे शहरात 39,518 रुग्णांवर उपचार चालू आहेत. आज 3293 रुग्ण कोरोना मुक्त होऊन, बरे होऊन घरी गेले. आज कोरोना संसर्गामुळे पुणे शहरात 35 लोकांचा मृत्यू झाला. मागील काही दिवसांपासून पुणे शहरातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढत असल्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे.



पुणे महानगरपालिका प्रशासन, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग कोरोना संसर्ग कमी होण्यासाठी अनेक उपाय योजना राबवत आहेत.  कोरोना बाधित रुग्णांचा आकडा कमी होण्यासाठी पुणे शहरात कडक निर्बंध लागू केलेले आहेत. 



1) संध्याकाळी ६ ते सकाळी ६ पर्यंत संचारबंदी (अत्यावश्यक सेवा वगळून) तर दिवसा जमावबंदी.


२) ७ दिवस हॉटेल, मॉल्स, बार, सिनेमा हॉल, प्रार्थनास्थळे, आठवडी बाजार, जिम, नाट्यगृह बंद.


3) पार्सल सेवा सुरू राहणार.


4) पीएमपीएल बस सेवा पुर्णतः बंद.


5) लग्न आणि अंत्यविधी सोडून इतर कार्यक्रमावर पूर्णतः बंदी.


6)मंडई, मार्केट यार्ड, सोशल डिस्टंसिंग राखून सुरू.


7) बागा सकाळच्या वेळेत सुरू राहणार.


8) शाळा, कॉलेज 30 एप्रिल पर्यंत बंद.


9) दहावी बारावीच्या परीक्षा वेळेत होणार.


10) एमपीएससी 10 वी, 12 वी च्या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ देणार नाही.


पुढच्या शुक्रवारी या निर्बंधांचा फेरआढावा घेतला जाणार आहे.





महाराष्ट्रातील वाढत्या कोरोनाबाधित रुग्णांची धडकी भरवणारी संख्या पाहून महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर दिसत आहे.




पुणे शहरातील नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टंसिंग या त्रिसूत्रीचा अवलंब करणे खूप गरजेचे आहे.


'पुणे शहरातील कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होण्यासाठी शहरातील जास्तीत जास्त नागरिकांना कोरोनाची लस मिळणे खूप गरजेचे आहे.'