Thursday, August 5, 2021

पुरोगामी राजकारणातला लढवय्या ! - जेष्ट पत्रकार विजय चोरमारे यांचा लोकप्रिय तरुण नेते जितेंद्र आव्हाड यांच्या राजकीय, सामाजिक कारकीर्दीवर प्रकाश टाकणारा विशेष लेख....

 


पुरोगामी राजकारणातला लढवय्या !


राजकीय पक्षाच्या पलीकडं जाऊन राज्यभरातील पुरोगामी विचारधारेच्या युवकांमध्ये लोकप्रिय असलेल्या मोजक्या नेत्यांमध्ये डॉ. जितेंद्र आव्हाड यांचा समावेश होतो. अर्थात अशी लोकप्रियता सहजसाध्य नसते आणि मिळाल्यानंतर ती टिकवणंही अवघड असतं. परंतु आव्हाड यांनी दीर्घकाळ भूमिकेतील हे सातत्य टिकवलं आहे, त्यामुळं आजच्या सोशल मीडियाच्या प्रभावाच्या काळात त्यांना आणि पक्षालाही त्यांची भूमिका लाभदायक ठरत आलेली दिसते. विरोधी पक्षात असताना भूमिका घेऊन लढण्यासाठीची सज्जता स्वाभाविक असते, परंतु सत्तेत आल्यानंतर अनेकांचा असा जोश कमी होत असतो. आव्हाड त्याला अपवाद ठरणारे नेते आहेत. सत्तेत येऊन प्रस्थापित झाल्यानंतरही त्यांनी आपल्यातील कार्यकर्त्याचा पिंड जपला आहे. दहीहंडी उत्सव साजरा ठाण्यातील करणारा नेता ते पुरोगामी विचारधारेचा राज्यातील तरुणांचा आवडता नेता हा त्यांचा प्रवास महाराष्ट्राच्या राजकारणात  निश्चितच दखलपात्र ठरणारा आहे.


शरद पवार यांचा युवा अनुयायी म्हणून सुरू झालेला त्यांचा राजकीय प्रवास त्यांना आज जिथवर घेऊन आला आहे, त्यामागं त्यांचं पुरोगामी राजकारणातलं सातत्य आणि शरद पवार यांच्यावरील निष्ठा हे दोन घटक कारणीभूत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला गेला, तेव्हा राज्यभरातील शिवप्रेमींनी त्याविरोधात आवाज उठवला. त्यावेळी न्यायमूर्ती पी. बी. सावंत, न्या. बी. जी. कोळसे-पाटील यांच्यासारख्या विचारवंतांपासून ते अनेक पुरोगामी नेत्या-कार्यकर्त्यांना सोबत घेऊन शिवसन्मान परिषदांचं आयोजन करण्यात आव्हाड यांचा पुढाकार होता. एकाचवेळी पुरंदरेसमर्थक मंडळी, प्रसारमाध्यमे आणि राज्यसरकार यांच्याविरोधात संघर्ष करण्याची ही भूमिका कुणाही राजकीय कार्यकर्त्यासाठी जोखमीची होती, परंतु राजकीय नफा-नुकसानीचा विचार न करता आव्हाडांनी त्याविरोधात रान उठवले होते.


सुमारे बारा वर्षांपूर्वी ठाण्यात एकदा धार्मिक तणावाची मोठी घटना घडली होती. रात्री उशिरा घडलेल्या या घटनेमध्ये दोन समूहांमध्ये संघर्ष उफाळला होता. प्रचंड पोलिस फौजफाटा गोळा झाला होता आणि परिसराची नाकेबंदी केली होती. अशा परिस्थितीमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास संबंधित ठिकाणी जाऊन शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न आव्हाडांनी केल्याचे आठवते. तणावग्रस्त परिसरात जाणे धोक्याचे आहे, असे पोलिस सांगत असतानाही आव्हाड तिथं गेले, लोकांशी चर्चा केली, शांततेचं आवाहन करून परत आले होते. तणाव निर्माण करणारे किंवा तणाव निर्माण झाल्यावर आगीत तेल ओतणारे अनेक नेते असतात परंतु तणावग्रस्त परिसरात स्वतः जाण्याची जोखीम आव्हाडांनी तेव्हा घेतली होती. नंतरच्या काळातही सातत्यानं ते अशा प्रकारची जोखीम घेत आले आहेत.


ठाण्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले,त्यावेळची घटना आहे. संमेलनानिमित्त जी स्मरणिका किंवा विशेषांक काढला होता, त्यामध्ये नथुराम गोडसेचं उदात्तीकरण करणारा मजकूर होता. त्यावर्षी जन्मशताब्दी असलेल्या व्यक्तिंच्या कार्याचा आढावा घेणारा एक लेख स्मरणिकेत छापला होता आणि संबंधित लेखिकेनं त्यात `पंडित नथुराम गोडसे` यांच्या कार्याचंही गुणवर्णन केलं होतं. संमेलनाचा उदघाटन समारंभ संपता संपताच ही बाब कुणाच्यातरी लक्षात आली आणि अचानक टीव्हीवर त्यासंदर्भातील बातम्या सुरू झाल्या. त्यादिवशी दुपारी जितेंद्र आव्हाड आणि त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेले नगरसेवक नारायण पवार हे दोघेजण संमेलनाच्या मंडपात आले. दोघेच होते, कुणी तिसरा कार्यकर्ताही सोबत नव्हता. संमेलनाच्या प्रवेशद्वाराजवळ आव्हाड आलेत म्हटल्यावर काही लोक भोवतीने जमले. काही लोक जमले म्हटल्यावर आणखी काही लोक आले आणि थोडी गर्दी झाली. गर्दी झाली म्हटल्यावर पोलिस हटकायला लागले. तेव्हा आव्हाडांनी त्या पोलिसाला हातातली स्मरणिका दाखवून यात काय लिहिलंय तुम्हाला माहिती आहे का? अशी दरडावून विचारणा केली आणि झापले. तसा तो पोलिस बाजूला झाला. तिथं आव्हाडांनी स्मरणिकेची होळी केली आणि छोटंसं भाषण करून ते आले तसे निघून गेले. एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख आश्रयाखाली होणा-या संमेलनात एकट्यानं येऊन अशा रितीनं निषेध नोंदवणं मोठं धाडसाचं काम होतं. ही घटना मी प्रत्यक्ष पाहिली आणि त्यामुळं अस्वस्थ झालेले एकनाथ शिंदेही सायंकाळी पाहायला मिळाले.


शिवसेना-भाजप युतीचं सरकार जाऊन काँग्रेस आघाडीचं सरकार सत्तेवर आलं त्यावेळी सुरुवातीच्या काळात नारायण राणे विरोधी पक्षनेते होते. त्यांनी एकदा आमदारांसह विधानभवनाच्या दारातच धरणे देऊन सत्ताधा-यांना विधानभवनात जाण्यापासून रोखलं होतं. सत्ताधा-यांसाठी कसोटीचा काळ होता. त्यावेळीही ठाण्याहून जितेंद्र आव्हाड आणि त्यांचे कार्यकर्ते आल्यानंतर आंदोलकांना तुडवत सत्ताधारी लोक विधानभवनात शिरले होते.


शरद पवार हे सातत्याने काँग्रेससह विरोधकांच्या निशाण्यावर असत. पवारांच्यावर अनेक हल्ले झाले. आता आता पवारांवरील टीकेला प्रत्त्युत्तर देण्यासाठी जयंत पाटील, नवाब मलिक, हसन मुश्रीफ यांच्यापासून अनेक नेते पुढे सरसावतात. परंतु पाच-सात वर्षांपूर्वीची परिस्थिती पाहिली तर पवारांच्यावरील टीकेचे उत्तर देण्यासाठी स्वतः पवारांनाच पुढं यावं लागायचं. त्याव्यतिरिक्त पवारांवरील वार झेलणारी आणि संबंधितांना प्रत्त्युत्तर देणारी जी दोन माणसं होती, त्यापैकी एक होते आर. आर. पाटील आणि  दुसरे जितेंद्र आव्हाड. देवेंद्र फडणवीसांचं सरकार सत्तेवर असतानाही आव्हाडांचा सातत्यानं संघर्ष सुरू असायचा. तो एकीकडं राजकीय स्वरुपाचा असायचा, आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे दुस-या बाजूला तो सामाजिक पातळीवरही असायचा. सामाजिक पातळीवर भूमिका घेऊन कोणत्याही विषयाला थेट भिडणं, हे आव्हाडांचं इतर राजकीय नेत्यांहून वेगळेपण आहे. अशा भूमिका घेणं राजकीय नेत्यांना आणि त्यांच्या पक्षांनाही गैरसोयीचं असतं. अशा भूमिका प्रत्येकवेळी पॉलिटिकली करेक्ट असतात असं नव्हे, परंतु त्याचा विचार न करता आव्हाड वेळोवेळी त्या घेत आले आहेत. विरोधात असताना आक्रमक असलेले आव्हाड सत्तेत आल्यानंतर बदलतील, असं अनेकांना वाटत होतं, परंतु मंत्रिपदानंतरही त्यांच्या वृत्तीत फरक पडलेला दिसत नाही.


सामाजिक क्षेत्रात काम करणारा नेता सत्तेच्या राजकारणात किती संवेदनशीलतेनं काम करू शकतो, हे आव्हाडांनी गृहनिर्माण मंत्री म्हणून काम करताना दाखवून दिलं आहे. टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणा-या रुग्णांच्या नातेवाईकांचे किती हाल होत असतात, याची कल्पना त्या अनुभवातून न गेलेल्यांना कळू शकणार नाही. खासदार सुप्रिया सुळे यांच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर ट्विट करून त्यांनी त्यासंदर्भातील मागणी जाहीरपणे केली. त्याला प्रतिसाद देताना आव्हाड यांनी तातडीनं टाटामध्ये उपचारासाठी येणा-या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी म्हाडातर्फे शंभर फ्लॅट्सची देण्याची घोषणा केली. स्थानिकांच्या तक्रारीमुळे सुरुवातीला त्यासंदर्भात काही मतभेद झाले, परंतु तो प्रश्न मार्गी लागला आहे.


मधल्या अतिवृष्टीच्या काळात महाड तालुक्यातील तळिये गावावर दरड कोसळल्यामुळं अख्खं गावच नामशेष झालं. पुणे जिल्ह्यातील माळीण गावाच्या दुर्घटनेनंतर तशाच प्रकारची ही भीषण दुर्घटना होती. या गावाचं संपूर्ण पुनर्वसन करण्याची जबाबदारी म्हाडाच्यावतीनं स्वीकारल्याची घोषणा गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली. एरव्ही मुंबईकेंद्रित काम करणा-या म्हाडाच्या जाणिवेच्या कक्षा आव्हाड यांनी यानिमित्ताने नुसत्या व्यापकच केल्या नाहीत, तर त्यांना संवेदनशीलतेची जोड दिली. आपल्याकडं असलेले अधिकार तुम्ही नीट समजून घेतले तर किती चांगल्या रितीने काम करता येतं हेच त्यांनी यानिमित्तानं दाखवून दिलं.


मुंबईतील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा निर्णय केवळ आव्हाड यांच्याच नव्हे, तर महाविकास आघाडी सरकारच्या कारकीर्दीतला एक महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय ठरावा. गेली दोन-तीन दशकं बीडीची चाळींच्या पुनर्विकासाच्या चर्चा सुरु होत्या. अनेक घोषणा झाल्या होत्या, त्यामुळं इथले रहिवासी वर्षानुवर्षे फक्त पुनर्विकासाची स्वप्नं पाहात होते. त्यांची ही उलघाल समजून घेण्यासाठी तेवढीच संवेदनशीलता आवश्यक होती. ज्यांचं बालपण चाळीत गेलं आहे अशा जितेंद्र आव्हाडांनी ती समजून घेतली त्यातूनच हा ऐतिहासिक प्रकल्प मार्गी लागू शकला.


आज आव्हाडांचा वाढदिवस, त्यानिमित्त त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा !


लेखक : - जेष्ठ पत्रकार, विजय चोरमारे 


No comments:

Post a Comment