Sunday, June 6, 2021

"मराठा समाजातील तरुणाई बुद्धिमत्ता, कौशल्य, कठोर परिश्रमाने,एकजुटीने यशाची नवी शिखरे गाठतील" - आरोग्य क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करून "गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये" ठसा उमटवणारे प्रसिद्ध डॉक्टर सागर माने यांचा रविवार विशेष लेख...


"मराठा समाजातील तरुणाई बुद्धिमत्ता, कौशल्य, कठोर परिश्रमाने, एकजुटीने  यशाची नवी शिखरे गाठतील"


मी मराठा आरक्षणाचा पूर्ण समर्थक आहे. आपण सर्वांनी मराठा आरक्षणाच्या कायदेशीर लढाईसाठी एकजुटीने  लढले पाहिजे.  त्याच वेळी, आपण मराठा समाजातील काही महत्वाच्या गोष्टींचा विचार गांभीर्याने केला पाहिजे अश्या काही गोष्टींवर मी प्रकाश टाकू इच्छितो.


१) आरक्षणाचा लाभ मिळवून सरकारी नोकरी मिळेल अशा सरकारी क्षेत्रात पाच टक्क्याहून कमी रोजगाराची संधी आहे. पण सर्वात जास्त नोकरीची संधी खासगी उद्योग क्षेत्रांमध्ये आहे. जिथे फक्त बुद्धिमत्ता आणि कौशल्येच काम करतील. म्हणूनच आम्ही आमची कौशल्य विकसित करून आपल्या क्षेत्रात उत्कृष्ट पारंगत झाले पाहिजे. उद्योगात आवश्यक असलेले आपले कौशल्य व तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे. वित्त, व्यवस्थापन, औषध उत्पादन, सोने - चांदी दागिन्याचा व्यवसाय , वाहतूक,आयात निर्यात अशा अनेक अग्रगण्य उद्योगांमध्ये कार्यरत राहण्याचे आपल्या मराठा समाजातील लोकांचे प्रमाण कमी आहे. मराठा समाजाने अशा सर्वच महत्वाच्या व्यावसायिक क्षेत्रात चमकण्यासाठी मोठे काम केले पाहिजे.




2)आपण सर्वांनी कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा, अलौकिक बुद्धिमत्तेची, अनमोल ज्ञानाची उपासना केली पाहिजे. आपला समाज राजकारणामध्ये मोठया प्रमाणावर अग्रेसर आहे पण   संशोधन आणि नाविन्यपूर्ण उद्योग, शैक्षणिक क्षेत्र, वेगवेगळ्या महत्वाच्या उद्योग आणि व्यावसायिक क्षेत्रात आपला समाज फार कमी प्रमाणावर आहे.



3) एक योद्धा म्हणून आपण  गरीबी, निरक्षरता, सामाजिक अन्याया विरोधात लढले पाहिजे. पण बहुतेक वेळा आपण इतर मराठा कुटुंबांशी लढतो.




4) काही लोक नेहमीच आपल्या शीघ्रकोपी स्वभावाचा फायदा घेत असतात. तथ्ये व वास्तविकता जाणून न घेता  आमचे तरुण रस्त्यावर आणि सोशल मीडियावर राजकीय लढाईत, वादविवादात गुंतलेले आहेत. आपल्या आदर्श व्यक्तिमत्वांबद्दल, रोल मॉडेलबद्दल तरुणाई पूर्णपणे संभ्रमित आहे. सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी तो चांगली वृत्तपत्रे आणि चांगली पुस्तके  कधीच वाचत नाही. 




5)महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्यांमधील सर्वाधिक मृत्यू हे मराठा कुटुंबातील आहेत. कुणी  या गंभीर विषयाची दखल घेतली आहे का?




6) जर आरक्षण आम्हाला देण्यात आले तर आपण ते आपल्या आर्थिकदृष्ट्या कुमकुवत असलेल्या कुटुंबांना न्याय देणारे ठरेन किंवा दुसर्‍या उदाहरणाप्रमाणेच ठरावीक श्रीमंत लोकांना लाभ होण्यापेक्षा बहुसंख्य गरिबांना लाभ मिळाला पाहिजे.



मला वाटते की आपण जे सहज करू शकतो ते आपण प्रथम केले पाहिजे.


१)मराठा समाजातील सर्वांनीच एकमेकांना मदत करा, जर हे शक्य नसेल तर आपल्या समाज बांधवांना  विरोध करू नका. प्रत्येकाने शिक्षण, करिअर मार्गदर्शन आणि आपत्कालीन परिस्थितीत, अडचणीच्या काळात कमीतकमी एका मराठा कुटूंबाला आधार दिला पाहिजे. मदत केली पाहिजे.



२)आपल्या तरुण पिढीला महत्वाची शिकवण द्या की "केवळ अभ्यास आणि कठोर परिश्रम हीच यशाची गुरुकिल्ली आहे." "मराठा समाजातील तरुणाई बुद्धिमत्ता, कौशल्य, कठोर परिश्रमाने,एकजुटीने  यशाची नवी शिखरे नक्कीच गाठतील" 




3)समाजात एकजुटीने राहणे ही समाजाला प्रगतीच्या शिखरावरती घेऊन जाणारी महत्त्वाची गोष्ट आहे. आपण एकमेकांच्या चांगल्या दिवसांमध्ये एकत्र  नसलो तरी कठीण परिस्थितीत मात्र आपण एकमेकांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे.




4)आपल्या समाजासाठी थोडेसे तरी महत्त्वाचे योगदान द्या. वेळ, पैसा, कल्पना, मार्गदर्शन,जी करता येईन ती छोटीशी मदत यापैकी काहीही द्या.  अश्या सामाजिक चळवळीची खरी उणीव आहे. समाजातील जे लोक  यशस्वी झाले आहेत ते आपल्या समाजापासून लांबच राहतात. अंतर ठेवतात. इतरांकरिता ते खूप कमी  वेळ देतात आणि आपले स्वतःचे वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी, कोणीही त्यांच्या जवळच्या आणि प्रिय व्यक्तींमध्ये त्याच्या कर्तुत्वाचा उंचीवर पोहोचणार  नाही याची ते काळजी घेतात.



5)आपल्या जवळच्या आणि प्रियजनांची झालेली प्रगती मोठ्या मनाने मान्य करून, कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवरती टाका. ग्रामीण भागात खूप वेळा आपल्या माणसाची प्रगती सहन होत नाही ही मोठी चिंताजनक बाब आहे. (आमच्यातला सर्वात मोठा - रोग " बघवत नाही")


6)छत्रपतींच्या कुटुंबानंतर, आपल्या मराठा समाजाला ध्येयवादी, दूरदृष्टीचे चांगले नेतृत्व मिळाले नाही.



7)आम्हाला इतर सर्व जाती, धर्म, संस्कृती याविषयी आदर आणि सहिष्णुता असली पाहिजे. आपले कोणीही शत्रू नाहीत. आपले महान, जाणते राजे, आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत  छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्याही जातीचा आणि धर्माचा द्वेष केला नाही. खरं तर त्यांनी स्वराज्य निर्माण करण्यासाठी इतर जाती व धर्मांची मदत घेऊन आदर्श राज्यकारभार केला. द्वेष माणुसकी संपवते तर  सहानुभूती, प्रेम चांगला समाज निर्माण करते. आपल्यापैकी बहुतेक जण सर्व गोष्टींबद्दल नेहमीच वाद घालण्यात व्यस्त असतात, चुकीच्या वादविवादामुळे वैमनस्य निर्माण होते आणि प्रेमाने समजून घेतले की आपुलकी आणि करुणा निर्माण होते.




मित्रांनो आणि सर्व जेष्ठ मंडळींनो, मी फक्त प्रामाणिकपणे महत्त्वाच्या विषयावर  व्यक्त झालेलो आहे. मी परिपूर्ण नाही, तरी मी वरील मुद्दे / विचार आत्मसात करण्याचा प्रयत्न करीत आहे. आशा आहे की मी कोणास दुखवले नाही.  मला कोणाच्याच भावना दुखवायचा नाहीयेत. "माणुसकी, प्रेम, जिव्हाळा, शिक्षण, कौशल्य, ज्ञान, बुद्धिमत्ता, कठोर मेहनत,आपुलकी, सहिष्णुता, यासारख्या जीवनातील अनेक महत्त्वाच्या पैलूंनी माणसाचं जगणं समृद्ध होतं.



लेखक : - आरोग्य क्षेत्रात  सामाजिक बांधिलकीने विशेष उल्लेखनीय कार्य करून, गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये  ठसा उमटवणारे, प्रसिद्ध डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर सागर माने.








"युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचे 'जगाला प्रेरणादायी' असे 'शेती व जमीन महसूल विषयी' आदर्श धोरण" - शिवराज्याभिषेक दिन; विशेष लेख...

 


छत्रपती शिवाजी महाराजांचे शेती व जमीन महसूल विषयी धोरण


भारत हा शेती प्रधान देश असून राज्याचे विविध प्रकारचे उत्पन्न हे मुख्यत: जमिनीपासून मिळत असे. येथील बहुसंख्य प्रजा शेतीवरच अवलंबून होती.  सतराव्या शतकातील राजकीय स्थित्यंतराचा शेतकऱ्यांचा जीवनावर परिणाम झालेला दिसून येतो. सततचे युद्धाचे प्रसंग, पावसाची अनिश्चितता, आर्थिक सहाय्याचा अभाव, जुलमी राजवट इत्यादीमुळे शेतकऱ्याला त्याच्या व्यवसायात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असे.


शिवपूर्वकाळात शासनसंस्था आणि तिचे अधिकारी शेतकऱ्यांकडून त्यांच्या उत्पन्नाच्या 50 टक्क्‌यांपेक्षा जास्त सारा वसूल करत याची छत्रपतींना जाणीव होती. शेतकऱ्यांची जबर पिळवणूक होत असे. छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतसारा धोरण आखतांना प्रजाजनांना दिलासा देणारा दृष्टीकोन अवलंबिला होता. गतकाळाचा वारसा म्हणून चालत आलेली कर आकारणीतील सर्व प्रकारची अनिश्चितता तसेच अन्याय व जुलूम जबरदस्तीने लादले गेलेले कर रद्द करुन त्याचे प्रेम व सहकार्य मिळवावे व राज्याचे धान्योत्पादन वाढवावे ही त्यांची इच्छा होती.




शिवाजी महाराजांनी जमीन व्यवस्था लावून देण्याच्या बाबतीत गजाने किंवा काठीने जमीन मोजण्याची मलिक अंबरी पद्धत राबवली तसेच बिघ्यांच्या परिणामात जमीन मोजणी करुन उत्पन्न निश्चित करण्यास सुरुवात केली. पुण्यासभोवतालच्या प्रदेशात धरणे बांधली, कालव्याने जमिनींना पाटाच्या पाण्याचा पुरवठा केला आणि या माध्यमातून गरीब शेतकऱ्यांना सरकारी मदतीची खाजरजमा करून दिली.




बहुसंख्य प्रजा शेतीवरच अवलंबून असल्याने शेतीची सुधारण हे महाराजांच्या राज्य कारभारातील एक महत्त्वाचे सूत्र राहिले. अनेक वर्षाच्या लष्करी धामधुमीमुळे अनेक खेडी ओस पडली होती.  महाराजांनी त्या गावांच्या पाटील, कुलकर्णीसारख्या वतनदारांना बोलावून परागंदा झालेल्या रयतेस आपल्या गावी आणून लावणी-संचणी करुन गावे आबादान करण्याचे प्रयत्न केले.


सन 1667-1669 मध्ये शिवाजीराजांनी आपले लक्ष जमीन महसूलीच्या व्यवस्थेकडे वळवले. जमिनीच्या अचूक मोजणीसाठी अण्णाजी दत्तो याची नेमणूक केली. त्यांच्या कार्यामुळेच पुढे त्याची प्रधानमंडळात नेमणूक केली.  त्यांनी जमिनीची मोजणी करुन पिकाऊ जमिनीची सीमा निश्चिती करीत नकाशे तयार केले. जमिनीचा कस जाणून घेण्याचे प्रयत्न केले. इंग्रज शेतीतज्ञ मेजर जाव्हिस म्हणतो, शिव काळात जवळ जवळ बारा प्रकारच्या जमिनीचा विचार होई. पिकाऊ जमिनीची वर्गवारी करण्यात आल्यावर पिकांच्यादृष्टीने त्याचे मुल्यमापन होई.



जमिनीच्या उत्पन्नावरील सारा आकारणी करण्याच्या बाबतीत शिवाजी महाराजांनी खूप काळजी घेतली. प्रजासुखाविषयी ते विशेष दक्ष असत. कोणत्याही शेतकऱ्यावर वा जमिनदारावर अन्याय होणार नाही याची ते खात्री करुन घेत.  आपल्या अधिकाऱ्यांना चुकीची सारा आकारणी करण्यास त्यांनी मनाई केली होती. आपल्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी महाराजांनी स्थानिक रहिवाशांचे सहाय्य व सहकार्य घेतले.  जनहित आणि स्वराज्य विकासास त्याच्या मनात सर्वोच्च स्थान होते. परंतु स्वराज्यविकास साधण्यासाठी जनहिताचा कोणत्याही काळी बळी दिला नाही.




सन 1676 मध्ये प्रभानवल्लीचा सुभेदार रामजी अनंत यास लिहिलेल्या पत्रात लिहिले आहे की, ‘रयतेकडून भाजीच्या देठाचीही अपेक्षा न करता रास्त आणि बिनचुक वर्तन केले पाहिजेत’. हे पत्र राज्याभिषेकानंतरचे आहे. हे पत्र इतके मोलाचे आहे की त्यातील विचारधन आजही शेतीचा विकास करण्याच्या कामी उपयुक्त ठरावे.




सारा वसूल करतांना रयतेवर अधिक भार पडणार नाही, जुलूम जबरदस्ती होणार नाही याची काळजी घ्यावी. शेतीच्या उत्पन्नात रयतेचा वाटा रयतेला मिळेल आणि सरकारचा वाटा सरकारला मिळेल असेच वर्तन करावे. रयतेवर काडीचाही जुलूम केला अथवा गैरवर्तन केले तर राजे तुमच्यावर नाराज होतील  हे पक्के समजावे, असेही पत्रात म्हटले आहे.




आण्णाजी दत्ता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरुन व्यक्तीश: शेतकऱ्यांना व कुळांना प्रत्यक्ष गावात जाऊन भेटत. त्याच्या अडचणी समजून घेत याविषयीची संदर्भसाधने (कागदपत्रे) उपलब्ध आहेत.  त्यावरुन खात्री होते की, सदर प्रश्नाकडे पाहण्याचा शिवाजी महाराजांचा दृष्टीकोन केवळ लोकशाही वादीच नव्हे तर योग्य न्याय आणि तत्वाधिष्ठीत होता हे दिसते.  सरकारचे धोरण शेतकऱ्यांचे शोषण करण्याचे नसून उलट त्यांच्याकडून फक्त न्याय कर भरण्याची अपेक्षा केली जात होती हे यावरुन स्पष्टपणे दिसून येते.


पडीक जमिनी लागवडीखाली आणण्यासाठी महाराजांनी शेतकऱ्यांना शेतसाऱ्याबाबत मोठ्या सवलती देऊ केल्या. तुमच्या जमिनीवर 4 वर्षापासून ते 12 वर्षापर्यंत अंशत: करवसुली होईल असे त्यांना आश्वासन दिले. सरकारने लोकांच्या ठिकाणी विश्वास निर्माण करुन अधिकाधिक पड जमिनी लागवडीखाली आणून राज्याचे उत्पन्न वाढविले.



एखाद्या गावात पूर आला असेल, किंवा लागोपाठ दोन वर्षे अवर्षणाची स्थिती असेल किंवा गावाचा प्रदेश शत्रुसैन्याने उद्ध्वस्त केला असेल तर सरकार उदारपणे गावकऱ्यांना जमिनीवरील व इतर करात सुट देई.  गरीब शेतकऱ्यांना बैलजोड्या, नांगर यासारखी अवजारे व पेरणीसाठी बि-बियाणे पुरवून मदत करण्यात यावी असा शिवाजी महाराजांचा हूकूम होता.


बी-बियाणांचा पैदास खास करुन सरकारी जमिनीत होत असे. ‘बोजहुडी’ या नावाने त्यांना गावकऱ्यांना पुरवठा करीत.  महाराजांनी इनाम जमिनी देखील पडीक राहू दिल्या नाहीत.  अशा जमिनी त्यांनी काढून घेतल्या (इतिहासाचार्य राजवाडे खंड 15 मध्ये माहिती मिळते) धार्मिक संस्थांनी नापीक किंवा पडजमिनी लागवडीखाली आणून धान्योत्पादन वाढवावे या उद्देशाने त्यांनी अशा जमिनी त्यांना इनाम म्हणून दिल्या.




सरकारी अधिकाऱ्यांनी काही गावात जादा करवसुली केली तेव्हा महाराजांनी ताबडतोब ती परत करण्याचा हुकूम सोडला आणि तिचा काही भाग पुढील वर्षाच्या वसुलीशी जूळून घेतला. (शिवकालीन कागदपत्रात सुपे व जुन्नर परगण्यातील 61 गावांची यादी देण्यात आली आहे)


शिवकालीन जमिनी विषयी सुधारणा


स्वराज्यातील सर्व जमिनीचे अचूक मोजमापन केले.

नापीक व पडजमिनी लागवडीखाली आणल्या.

जमिनीची पाहणी करुन शेतीचे उत्पन्न निश्चित केले.

कोणत्याही आपत्तीपासून पिकांच्या, शेतकऱ्यांच्या व गांवकऱ्यांच्या रक्षणाची व्यवस्था केली.


सतराव्या शतकात शेतकऱ्यांला कोणकोणते कर व पट्टया द्याव्या लागत होत्या? याची कल्पना आल्यास छत्रपती शिवाजी महाराजांच्या जमीन-महसूलीविषयीच्या धोरणाचे व सुधारणांचे मोल यथार्थपणे आपल्याला कळून येईल.  यापूर्वीच्या शासनाच्या काळात शेतकऱ्यांना तेलपट्टी, तूटपट्टी, जंगमपट्टी या सारखे सुमारे 50 पट्टया व कर भरावे लागत.  या करांपैकी बहुतेक कर महाराजांनी रद्द करुन एकूण 40 टक्के कर वसूल केला.


शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या जमीन महसूल पद्धतीत राज्याचे व  शेतकऱ्यांचे हितसंबंध वेगळे मानले गेले नाहीत. हे त्यांच्या धोरणाचे विशेष होते.  जार्व्हिसच्या शब्दात सांगावयाचे म्हणजे शिवाजी महाराजांच्या शेतीविषयक आणि जमीन महसूलासंबंधीच्या धोरणाने शेतकऱ्यांवर व कुळांवर विस्मयकारक परिणाम घडून आला. शिवाजी महाराजांनी स्वराज्यातील जमिनीचा सर्व पृष्ठभाग, जमिनीचा प्रत्येक तुकडा व डोंगराळ भाग लागवडीखाली आणून तेथे पोषक व उपयोगी झाडाझुडपांची जोपासना केली.




शिवाजी महाराजांचे राज्य "जनतेच्या सहकार्यामुळे विकास पावले" ही विचारार्ह गोष्ट आहे. महाराजांच्या जमिनीची व महसूलीची काळजीपूर्वक पाहणी करुन जार्व्हिस याने असे अनुमान काढले की गोंधळ, लढाया आणि द्रोह करण्याच्या सार्वत्रिक वृत्तीचा हा काळ असून देखील, महसूल व्यवस्था आणि जनता यांची स्थिती सुधारली.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या या कार्यामुळेच जनतेने ‘रयतेचा राजा’ (शेतकऱ्यांचा राजा) ही त्यांना मानाची सर्वोच्च पदवी दिली.


लेखक : - डॉ. सर्जेराव भामरे (मुख्य सचिव, राजवाडे संशोधन मंडळ, धुळे)



Monday, May 31, 2021

'पुणे शहरातील कोरोनाचे निर्बंध शिथिल'; "कोरोना पूर्णपणे संपलेला नाही, आपल्याला तिसरी लाट सामूहिकपणे रोखायचीय, तुम्हा सर्वांच्या साथी शिवाय शक्य नाही" - महापौर मुरलीधर मोहोळ



पुणे, दि. 31 : - महाराष्ट्रात तसेच पुणे शहरातील कोरोना संसर्गाचा विळखा गेल्या काही दिवसांपासून कमी होताना दिसत आहे. पुणे शहरात  कोरोनाबाधित रुग्णसंख्येत घट झालेली दिसून आल्यामुळे, दिलासादायक परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पुणे शहरातील निर्बंध  शिथिल करण्यात आलेले आहेत. 



"पुणे शहरात आपण बहुतांशी निर्बंध शिथिल केलेले असले तरी कोरोना पूर्णपणे संपलेला नाही. आपल्याला तिसरी लाट सामूहिकपणे रोखायचीय, पण ते तुम्हा सर्वांच्या साथी शिवाय शक्य नाही. त्यामुळे बाहेर वावरताना प्रचंड काळजी घ्या." असे आवाहन पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी नागरिकांना केले.




आज सोमवारी पुणे शहरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झालेली दिसून आली. आज 'पुणे शहरात कोरोना बाधित 180 नवे रुग्ण आढळल्याने, कोरोनाबाधित रुग्णसंख्येत घट झाल्यामुळे प्रशासनाला व नागरिकांनाही दिलासा मिळताना  दिसत आहे.



पुणे शहरात 6,020 रुग्णांवर उपचार चालू आहेत. आज   751 रुग्ण कोरोना मुक्त होऊन, बरे होऊन घरी गेले. आज कोरोना संसर्गामुळे पुणे शहरात 24 लोकांचा मृत्यू झाला. मागील काही दिवसांपासून पुणे शहरातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा कमी होत असल्यामुळे दिलासादायक परिस्थिती निर्माण होत आहे. पुणे शहरातील शिथिल झालेले निर्बंध खालीलप्रमाणे...




उद्यापासून पुणे शहरात काय सुरु राहणार?

1. सकाळी 7 ते दुपारी 2 यावेळेत पुण्यात सर्व प्रकारची दुकाने सुरु.

2. शासकीय कार्यालये 25 टक्के क्षमतेने सुरु असणार.

3. बार व रेस्टॉरंट हे फक्त पार्सल सेवेसाठी सुरु राहतील.

4. महानगरपालिका क्षेत्रातील सर्व बँका कामाच्या सर्व दिवशी सुरु राहतील.

5. महानगरपालिका क्षेत्रातील मद्य विक्रीची दुकाने सर्व दिवस सकाळी 7 ते २ दुपारी वाजेपर्यंत सुरु राहतील.

6. कृषी संबंधित दुकाने आणि त्यांच्याशी संबंधित आस्थापना तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती हे सर्व दिवस सकाळी 7 दुपारी 2 वाजेपर्यंत सुरु राहतील.

7. ई-कॉमर्समार्फत अत्यावश्यक वस्तू व सेवा तसेच अत्यावश्यक व्यतिरिक्त वस्तू यांची घरपोच सेवा सुरु कर करण्यास मुभा.




पुणे शहरात काय बंद असणार?


1. जिम, मंगल कार्यालय, उद्याने, मैदान, पीएमपीएमएल बससेवा बंद राहणार.

2. पुणे मनपा हद्दीत नव्या आदेशानुसार खासगी कार्यालये पूर्णपणे बंद असणार आहेत.

3. शनिवार आणि रविवार सकाळी 7 ते 2 यावेळेत केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरु राहणार, अन्य दुकाने बंद असणार.

4. दुपारी 2 नंतर नागरिकांना घराच्या बाहेर पडता येणार नाही.

 



पुणे महानगरपालिका प्रशासन, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग कोरोना संसर्ग कमी होण्यासाठी अनेक उपाय योजना राबवत आहेत.  




पुणे शहरातील नागरिकांनी लॉकडाऊनचे सर्व नियम पाळून, मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टंसिंग या त्रिसूत्रीचा अवलंब करणे खूप गरजेचे आहे.



'पुणे शहरातील कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होण्यासाठी शहरातील जास्तीत जास्त नागरिकांना कोरोनाची लस मिळणे खूप गरजेचे आहे.'


Tuesday, May 25, 2021

"कोरोनामुळे निधन पावलेल्या मित्राच्या कुटुंबीयांच्या मदतीला धावून आले 'दहावीचे वर्गमित्र'; एक लाख 21 हजार रुपयांची मदत करून, जपली माणुसकी....

 

पुरंदर, वीर, दि. 25 : - महाराष्ट्रात कोरोना संसर्गाच्या महामारीमुळे अनेक कुटुंबातील, कुटुंबप्रमुख मृत्युमुखी पडल्यामुळे शेकडो, हजारो कुटुंबांवरती मोठे संकट कोसळलेले आहे. पुणे जिल्ह्यातील, पुरंदर तालुक्यातील वीर येथील "अस्तित्व प्रतिष्ठानचे" संस्थापक व संचालक, वंचित व अनाथ मुलांसाठी "गुरुकुल" चालवणारे सामाजिक कार्यकर्ते संतोष वाघ यांचे कोरोना मुळे गेल्या महिन्यात निधन झाले. संतोष वाघ यांच्या  दहावीच्या सन 1994 - 95 च्या बॅच मधील सर्व वर्गमित्रांनी मदत निधी गोळा करून वाघ कुटुंबीयांना एक लाख 21 हजार रुपयांची मदत करून माणुसकी समृद्ध करणारा आदर्श निर्माण केला.


अनाथांचा नाथ, समाजात गोरगरीब लोकांना, मित्रांना, विविध माध्यमातून मदत करणारे आणि आपले स्वतःचे घर न बांधता, गोरगरीब, अनाथ मुलांसाठी स्वतःच्या शेतात शाळा, गुरुकुल उभे करणारा असा हाडाचा सामाजिक कार्यकर्ता संतोष वाघ यांचे अचानक निधन झाल्याने  वाघ कुटुंबावर मोठे संकट कोसळले. संतोष वाघ यांच्या दहावीतील 1994 - 95 च्या बॅच मधील सर्व मुले व मुली, वर्गमित्रांनी सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून मदत निधी गोळा करून संतोष वाघ यांच्या दोन्ही मुलींच्या नावावर प्रत्येकी पन्नास हजार रुपये फिक्स डिपॉझिट केले. व 21 हजार रुपये रोख आर्थिक मदत त्यांच्या कुटुंबीयांना दिली. 




यावेळी वीर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष  संतोष धुमाळ,  निजाम मुलाणी, सचिन कापरे,  अमोल राऊत, राहुल साबळे  व राहुल समगीर  हे मित्र परिवार उपस्थित होते. सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहणाऱ्या संतोष वाघ यांच्या कुटुंबीयांना संतोष वाघ यांच्या दहावीतील सर्व मित्रपरिवाराने केलेली लाख मोलाची मदत माणुसकीची शिकवण देणारी आहे.




"आमच्या मित्राच्या कुटुंबावरती  एवढे मोठे संकट कोसळल्यावर माणुसकीच्या नात्याने, मैत्रीच्या नात्याने मदत करणे आमच्या सर्व मित्र परिवाराचे कर्तव्य आहे. अस्तित्व प्रतिष्ठान च्या माध्यमातून, गुरुकुलच्या माध्यमातून संतोष वाघ यांनी गोरगरीब अनाथ मुलांसाठी खूप मोठे सामाजिक कार्य  केले आहे." असे वीर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष धुमाळ यांनी सांगितले.




"आम्हा वर्गमित्रांना एकत्र आणणारा, सगळ्यांच्या मदतीला धावून जाणारा,  गोर गरीबांना मदत मिळवून देणारा, अनाथ,सिंगल पेरन्ट्स मुलांसाठी शाळा उभी करणारा, असा सामाजिक कार्यात अग्रेसर असणारा ,आमच्या साठी प्रेरणास्त्रोत असणाऱ्या मित्राला विनम्र अभिवादन. आमच्या मित्राचे प्रेरणादायी सामाजिक कार्य सर्वांच्या स्मरणात कायम राहील." अशी प्रतिक्रिया  शिक्षक मित्र निजाम मुलाणी यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.




"आम्हा सर्व मित्रांना एकत्र आणणारा, सर्वांशी प्रेमाने आपुलकीने, माणुसकीने वागणाऱ्या आमच्या मित्राचे अचानक निधन होणे हे खूप मोठे दुःख आहे आमच्या सर्व  मित्रपरिवारासाठी. सामाजिक बांधिलकीतून आमच्या सर्व वर्गमित्रांनी संतोषच्या कुटुंबाला केलेली मदत आमच्या सर्वांचे कर्तव्य आहे." अशी प्रतिक्रिया राजेंद्र वाघ यांनी दिली.




"वीर येथील अस्तित्व प्रतिष्ठानचे संचालक संतोष वाघ यांचे गेल्याच महिन्यात कोरोनाने  निधन झाले. आणि सर्व पंचक्रोशीतील मित्रमंडळींना धक्का बसला. एक सच्चा माणूस,  एक चांगला सामाजिक कार्यकर्ता,  अनाथांचा नाथ गेल्याची भावना सर्वांच्या मध्ये दिसून आली. आपल्या घरातील कर्ता पुरुष नसल्यावर काय यातना भोगाव्या लागतात? त्या फक्त घरातल्या स्त्रीलाच माहिती असते. घर, प्रपंच चालवताना किती संकटांना तोंड द्यावे लागते? त्या माऊलीला माहित असते. अशा माऊलीचे सगळे दुःख आपण हलके करू शकत नाही,  परंतु फुल नाही  फुलाची पाकळी म्हणून आपण मदत करणे हे सामाजिक दायित्व आहे. आणि याच भावनेतून इयत्ता दहावीचे 94 - 95 चे बॅच सर्व मुले व मुली यांनी मिळून संतोष वाघ यांच्या कुटुंबियांना एक लाख 21 हजार ची जी मदत केलेली आहे व या कुटुंबाला जो आर्थिक आधार दिलेला आहे तो खरंच प्रेरणादायी आहे. या उपक्रमाबद्दल सर्व मुला-मुलींचे आभार मानावे तेवढे थोडेच आहे. समाजातील प्रत्येक घटकाने सोशल मीडियाचा असा विधायक उपयोग करून माणुसकी जिवंत असल्याचे दाखवून द्यावे." असे दैनिक पुढारीचे अभ्यासू पत्रकार शिवदास शितोळे यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी  बोलताना सांगितले.




"समाजातील दुर्लक्षित, पीडित घटकांसाठी निस्वार्थपणे, प्रामाणिकपणे कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्रात खूप कमी आहेत. संतोष वाघ यांनी गोरगरीब, अनाथ मुलांसाठी केलेले निस्वार्थी, प्रामाणिक, सामाजिक कार्य कायम सर्वांच्या लक्षात राहील. सामाजिक कार्यकर्ते संतोष वाघ यांचे कोरोनामुळे, अचानक झालेले निधन सर्वांसाठी धक्कादायक आणि वेदनादायी आहे. वाघ कुटुंबावर  एवढे मोठे संकट कोसळल्यानंतर, संतोष वाघ यांच्या दहावीच्या सन 1994 - 95 च्या बॅचमधील सर्व वर्गमित्रांनी मदत निधी गोळा करून एक लाख 21 हजार रुपयांची वाघ कुटुंबाला केलेली मदत माणुसकी समृद्ध करणारी आहे." अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र गर्जना न्यूजचे संपादक अजित जगताप यांनी दिली.





कोरोना महामारीच्या काळात समाजातील सर्वच घटकांना फटका बसलेला आहे. अशावेळी समाजातील सर्वच लोकांनी माणुसकी जपणं  खूप महत्त्वाचे आहे.


Sunday, May 23, 2021

"इतिहास अभ्यासक तुमचा खोटारडेपणा समोर आणतील आणि जागृत शिवप्रेमी तुमचे थोबाड काळे करतील"....युवा लेखक अनिल माने यांचा विशेष लेख..."रीनैसंस स्टेट" या गिरीश कुबेरांच्या पुस्तकातील छत्रपती संभाजीराजे, छत्रपती घराण्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह, चुकीच्या, बदनामीकारक लेखनाला, इतिहास अभ्यासक व युवा लेखक अनिल माने यांनी दिले सणसणीत, अभ्यासपूर्ण उत्तर...

 

लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी त्यांच्या “Renaissance State” पुस्तकात छत्रपती घराण्याविषयी बदनामीकारक मजकूर लिहल्याने शिवप्रेमींमध्ये संताप आहे. कुबेर यांच्या पुस्तकात असणारे काही वादग्रस्त मुद्दे पुढीलप्रमाणे : - 




१) छत्रपती संभाजी महाराजांनी आपला वारसाहक्क मिळवण्यासाठी महाराणी सोयराबाई यांच्यासह शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील अनमोल प्रतिभावान मंत्र्यांना ठार केले.




२) छत्रपती संभाजी महाराज अत्यंत धाडसी असले तरी त्यांच्यात वडिलांकडे असणाऱ्या संयम आणि मुत्सद्दीपणाची कमतरता होती.




३) इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांशी जुळणारे कोणी व्यक्तिमत्त्व असेल तर ते बाजीराव पेशवे आहेत.


गिरीश कुबेर हे अर्थशास्त्राचे चांगले अभ्यासक आहेत, पण छत्रपती घराण्याच्या इतिहासाविषयी त्यांचा जास्त अभ्यास नसल्याचे दिसते. त्यांच्या मुद्द्याची छाननी केली असता आपणास ते कळून येईल. 





१) छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाप्रसंगी युवराज म्हणून संभाजीराजांना मान मिळाला होता. शिवरायांच्या पश्चात संभाजीराजेच स्वराज्याचे छत्रपती बनणार होते हे सांगायला कुठल्या ज्योतिषाची आवश्यकता नव्हती. वारसाहक्कासाठी संभाजीराजांनी सोयराबाईंना ठार केले हा मल्हार रामराव चिटणीसाच्या डोक्यातून बाहेर आलेला केवळ एक आरोप आहे. त्याचीच री गिरीश कुबेरांनी ओढली आहे. वास्तविक चिटणीस सांगतो ती घटना घडल्यापासून महाराणी सोयराबाई एक वर्ष जीवंत होत्या. ऑगस्ट १६८० मधील एका पत्रात छत्रपती संभाजीराजांनी सोयराबाईंबद्दल “स्फटिकाप्रमाणे निर्मळ मनाची माता” असे उद्गार काढले होते. संभाजीराजे आणि महाराणी सोयराबाई यांच्यात कसलाही कलह नव्हता. राहिला विषय छत्रपती शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील मंत्र्यांचा तर आपल्याविरुद्ध कट केल्यानंतरही त्यांना एकदा मोठ्या मनाने माफ करुन मंत्रिमंडळात घेणारे छत्रपती संभाजीराजेच होते. या मंत्र्यापैकी काहींनी स्वराज्यद्रोह करण्याचा प्रयत्न केला, त्याचीच शिक्षा म्हणून त्यांना हत्तीच्या पायाखाली देण्यात आले. संभाजीराजांनी छत्रपती शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील मंत्र्यांना वारसाहक्कासाठी ठार केले नसून, त्यांना स्वराज्यद्रोहाबद्दल शिक्षा केली. 




२) छत्रपती संभाजी महाराज हे खुद्द शिवरायांच्या आणि जिजाऊ माँसाहेबांच्या जडणघडणीत तयार झाले होते. एकाच वेळी हातात तलवार आणि लेखणी घेऊन लढणारा राजा म्हणून त्यांची नोंद घेतली जाते. संभाजीराजे युद्धभूमीवर जितके कुशल तितकेच राजकीय डावपेचात निपुण होते. संभाजीराजांनी लिहलेला बुधभूषण ग्रंथ वाचला तरी त्यांच्यातील राजकीय समज लक्षात येते. वयाच्या नवव्या वर्षी औरंगजेबाच्या दरबारात पाच हजारी मनसबदार आणि वयाच्या तेविसाव्या वर्षी स्वराज्याचे छत्रपती म्हणून कारभार पाहणारे, स्वराज्याचा विस्तार करणारे, स्वराज्याच्या सीमा बळकट करणारे, फंदफितुरी समूळ नष्ट करणारे, औरंगजेब बादशहाचा मुलगा अकबर याला बापाच्याच विरोधात वापरण्याचा डावपेच हा मुत्सद्देगिरीचाच भाग आहे. गिरीश कुबेरांनी एकदा परकीय अभ्यासकांनी संभाजीराजेंबद्दल व्यक्त केलेली मते वाचली तरी त्यांना संभाजीराजांच्या संयम आणि मुत्सद्देपणाचा अंदाज येईल.




३) छत्रपती शिवाजी महाराज हे असे व्यक्तिमत्त्व होते ज्यांची तुलना केवळ स्वतःशीच होऊ शकते. त्यांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केले. त्यांच्या पश्चात संभाजीराजांनी त्याचा विस्तार केला. छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराराणी यांनी स्वराज्याचे रक्षण केले. थोरले छत्रपती शाहू महाराज यांनी स्वराज्याचे रुपांतर बलाढ्य साम्राज्यात केले. गिरीश कुबेरांनी छत्रपती संभाजी महाराजांनंतर त्यांचे पुत्र थोरले छत्रपती शाहू महाराज यांनाही बगल देऊन बाजीरावांना पुढे रेटण्याचा प्रकार केला आहे. बाजीराव पेशवे पराक्रमी होतेच, पण छत्रपती शिवाजी महाराजांशी त्यांची तुलना होऊच शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज तर खूप दूर राहिले, थोरल्या छत्रपती शाहूंचा झाकोळला गेलेला इतिहास जरी नुसता उजेडात आला तर त्याच्यापुढे बाजीराव पेशव्यांचा इतिहास दिपून जाईल. 





गिरीश कुबेर हे व्यक्तिमत्त्व “मला जे वाटते तेच लोकांना वाटले पाहिजे” असा विचार करणाऱ्यापैकी आहे. लोकसत्ताचे संपादक असणे म्हणजे सर्वज्ञानी असणे असा त्यांचा कदाचित भ्रम झाला असावा. “बळीराजाची बोगस बोंब” या अग्रलेखातून त्यांच्या बौद्धिक दिवळखोरीचे आणि “असंतांचे संत” या अग्रलेखातून पळपुट्या संपादकाचे दर्शन आपल्याला घडले आहे. कोविडोस्कोप सदरातील वाड्ःमयचौर्याबद्दल सर्वत्र त्यांची लायकी निघत आहे. 


“Renaissance State” या पुस्तकात कुबेरांनी इतका धादांत खोटारडा इतिहास लिहला असेल, तर त्यांच्या आगामी “Shivaji in South Block : The Unwritten History of a Proud People” नावाचे पुस्तकात काय केले असेल ? कुबेरांनी छत्रपती घराण्यावर लिहण्याआधी किमान इतिहासाचा नीट अभ्यास करायला हवा. जेम्स लेन प्रकरण घडल्यानंतर महाराष्ट्रात कुणीही उठावं आणि छत्रपतींच्या इतिहासाची मोडतोड करावी असे दिवस राहिले नाहीत. इथले सजग इतिहास अभ्यासक तुमचा खोटारडेपणा समोर आणतील आणि जागृत शिवप्रेमी तुमचे थोबाड काळे करतील...


लेखक : - इतिहास अभ्यासक, युवा लेखक अनिल माने 






Wednesday, May 19, 2021

"महाराष्ट्राच्या 'या' पोलीस शिलेदाराने जिंकली तरुणाईची मने; सोशल मीडियावरील "श्रीनाथ म्हस्कोबा वीर" या व्हाट्सएप ग्रुपने जपली सामाजिक बांधिलकी; पुरंदर तालुक्यातील "वीर येथील श्रीनाथ कोविड सेंटरला 55 हजार 555 रुपये व वैद्यकीय साहित्य देऊन दिला मदतीचा हात"...

 


पुरंदर, वीर, दि. 19 : - महाराष्ट्रात कोरोना संसर्गाच्या महामारीने समाजातील सर्वच घटकांना फटका बसलेला आहे. राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर खूप ताण आलेला आहे. सोशल मीडियावर अनेक नकारात्मक, गंभीर विषयांवरील पोस्ट, बातम्या वाचून मन निराश होते, सुन्न होते. पण समाजात  दिलासादायक, प्रेरणादायी कार्य करणाऱ्या लोकांकडे, ग्रुपकडे,  संस्थांकडे पाहून वाटते की माणुसकी जिवंत आहे. 




पुणे जिल्ह्यातील, पुरंदर तालुक्यातील, वीर गावचे सुपुत्र, इतिहास अभ्यासक, पोलीस शिलेदार बापूसाहेब धुमाळ यांच्या संकल्पनेतून आकार घेतलेल्या सामाजिक उपक्रमाला सोशल मीडियावरील "श्रीनाथ म्हस्कोबा  वीर" या व्हाट्सअप ग्रुपच्या सदस्यांनी भरभरून प्रतिसाद देऊन मदत केल्याने,श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्ट वीर व वीर ग्रामस्थ यांच्या सहकार्याने व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील श्रीनाथ म्हस्कोबा भक्तांनी सढळ हाताने मदत केल्यामुळे सोशल मीडियावरील "श्रीनाथ म्हस्कोबा वीर" या व्हाट्सएप ग्रूपच्या माध्यमातून 'श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्ट वीर व शासन यांच्या संयुक्त विद्यमाने पुरंदर तालुक्यात वीर येथे सुरू केलेल्या श्रीनाथ कोविड सेंटरला 55 हजार 555 रुपयाचा मदतनिधी देऊन व 50 पीपीए किट, 50 बेडशीट, 12 डॉक्टर्स व परिचारिका यांना लागणारे वैद्यकीय साहित्य देऊन, सामाजिक बांधिलकी जपत, मदतीचा हात पुढे करून सोशल मीडियावरील व्हाट्सएप ग्रूप "श्रीनाथ म्हस्कोबा  वीर" यांनी समाजात एक चांगला आदर्श सामाजिक उपक्रम राबविला. 




यावेळी श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टचे चेअरमन  संतोष धुमाळ, विश्वस्त अभिजीत धुमाळ, सल्लागार विशाल धुमाळ, माजी विश्वस्त दिलीप धुमाळ, राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र धुमाळ, "श्रीनाथ म्हस्कोबा वीर" ग्रुपचे ऍडमिन, इतिहास अभ्यासक, पोलीस शिलेदार  बापूसाहेब धुमाळ, श्रीनाथ ग्रुपचे सदस्य अमोल चंद्रकांत धुमाळ, सागर नढे, अशोक बुरुंगले, अरुण धुमाळ, डॉक्टर सुनील धुमाळ,  भरत धुमाळ, गिरीश क्षीरसागर, अमोल धोंडीबा धुमाळ, देविदास चवरे, पांडुरंग धुमाळ, अरुण धुमाळ, माऊली कुंभार,  संतोष थिटे व श्रीनाथ ग्रुपचे सदस्य व देवस्थानचे पदाधिकारी  व मान्यवर उपस्थित होते.




मागील काही वर्षांपासून सोशल मीडियावर, प्रामाणिक भक्तिभावाच्या उद्देशाने लोकांना घरी बसून महाराष्ट्रातील कुलदैवतांचे, आराध्य दैवतांचे दर्शन व्हावे यासाठी 'श्रीनाथ म्हस्कोबा वीर' या व्हाट्सएप ग्रुपचे ऍडमिन बापूसाहेब धुमाळ त्यांच्या मित्रांच्या सहकार्याने भक्तीचे चांगले उपक्रम राबवत आहेत.




"सोशल मीडियावर फक्त पोस्ट वाचणे व फॉरवर्ड करणे यापेक्षाही सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आपण कोरोनाकाळात चांगले काम करणाऱ्या पुरंदर तालुक्यातील, वीर येथील श्रीनाथ कोविड सेंटरला मदत करण्याच्या भावनेतून 'श्रीनाथ म्हस्कोबा वीर' या आमच्या व्हाट्सएप ग्रुपवर ऍडमिन या नात्याने कोविड सेंटरला मदतनिधी या  सामाजिक उपक्रमासाठी  मदतीचे आवाहन केले.  प्रत्येकाने 100 रुपये मदतनिधी दिला तरी 16000 रुपये मदतनिधी जमा होईन तो मदतनिधी श्रीनाथ कोविड सेंटरला देऊयात. ही पोस्ट ग्रुपवर शेअर केल्यावर श्रीनाथ म्हस्कोबा वीर या ग्रुपमधील सदस्यांनी या सामाजिक उपक्रमासाठी खूप चांगला प्रतिसाद दिला. 



वीर देवस्थान ट्रस्ट, वीर ग्रामस्थ यांनी या उपक्रमाला खूप चांगले सहकार्य केले. महाराष्ट्रातील सर्व श्रीनाथ म्हस्कोबा भक्त परिवार, ताईसाहेब ग्रुप, महिला वर्ग, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार बांधव, मित्रपरिवार यांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे अल्पावधीतच 55 हजार 555 रुपये मदतनिधी जमा झाला. कामटे ऑटोमोटिव्हचे उद्योजक अमित कामठे व विशाल कामठे यांनी  50 पीपीए किट, 50 बेडशीट, 12 डॉक्टर व परिचारिकांना लागणारे वैद्यकीय साहित्यांचे किट मदत दिली. आमच्या 'श्रीनाथ म्हस्कोबा वीर' ग्रुपच्या माध्यमातून 55 हजार 555 रुपये मदतनिधी व वैद्यकीय साहित्य, कोविड सेंटर उत्तम चालवणाऱ्या वीर देवस्थान ट्रस्टला सुपूर्त करून कोविड सेंटरला मदत करण्याचा आमच्या ग्रुपचा संकल्प पूर्ण झाला." अशी प्रतिक्रिया 'श्रीनाथ म्हस्कोबा वीर' या ग्रुपचे ऍडमिन,इतिहास अभ्यासक, पोलीस शिलेदार बापूसाहेब धुमाळ यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.




पुरंदर तालुक्यातील वीर येथील श्रीनाथ कोविड सेंटरच्या माध्यमातून तालुक्यातील रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळत आहेत. श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टचे चेअरमन संतोष धुमाळ यांनी 'श्रीनाथ म्हस्कोबा वीर' ग्रुपच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. "सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून या 'श्रीनाथ म्हस्कोबा वीर' या ग्रुपने राबविलेला सामाजिक उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहे व इतर ग्रुपलाही प्रेरणा देणारा आहे." अशी प्रतिक्रिया श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टचे चेअरमन संतोष धुमाळ यांनी दिली.



"बापुसाहेब धुमाळ यांनी सोशल मीडियावरील ग्रुपच्या माध्यामातून सामाजिक कार्य कसे करु शकतो? याचे  अतिशय उत्तम उदहारण  समाजासमोर ठेवले आहे . सर्व ग्रुप व ग्रुपबाहेरच्या मंडळींनीही यामध्ये चांगले सहकार्य केले. त्याबद्दल बापूसाहेब व सर्वांचे हार्दिक अभिनंदन. अशा सहकार्यामुळे काम करणार्‍या लोकांचाही उत्साह शतपटीने वाढतो. असेच कार्य आपण कायम सुरु ठेवावे. श्रीनाथ साहेबांच्या छत्रछायेखाली अजुन मोठी कामे होतील. अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर सुनील धुमाळ यांनी दिली.



"बापूसाहेब  करत असलेले कार्य खरंच प्रेरणादायी आहे. आपण कायमच गावातील प्रत्येक सामाजिक ,धार्मिक, सांस्कृतिक तसेच गावाच्या विकासासाठी सदैव तन, मन, धनाने तत्पर असता. त्याच बरोबर सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची तुमची सचोटी वाखनण्याजोगी आहे. येणाऱ्या काळात अशीच सामाजिक सेवा आपल्या हातून घडो अशी प्रतिक्रिया पुरंदरचे शिवसेनेचे युवा नेते समीर जाधव यांनी दिली.



"'श्रीनाथ म्हस्कोबा वीर' या व्हाट्सएप ग्रुपच्या माध्यमातून राबवलेला हा  सामाजिक उपक्रम हा समाजातील सर्वांसाठीच खूप प्रेरणादायी आणि चांगला उपक्रम आहे. बापूसाहेब यांचे कार्यही नक्कीच खूप कौतुकास्पद आहे. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून  लोकहिताच्या उपक्रमांसाठी पुढाकार घेऊन  सर्वांनीच मदत केली पाहिजे अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते व युवा नेते भरत धुमाळ यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.




"समाजामध्ये चांगले सामाजिक उपक्रम राबवणारे सोशल मीडियावरील फार कमी ग्रुप बघायला मिळतात. 'श्रीनाथ म्हस्कोबा वीर' या ग्रुपने राबवलेला सामाजिक उपक्रम समाजातील सर्वच घटकांसाठी प्रेरणादायी व चांगली शिकवण देणारा आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रसह्याद्रीच्या पत्रकार सविता शितोळे यांनी दिली.




"बापुसाहेब धुमाळ यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच प्रामाणिक भक्तीच्या चळवळीच्या माध्यमातून समाजात एक आदर्श सामाजिक उपक्रम राबवून, श्रीनाथ म्हस्कोबा ग्रुपच्या माध्यमातून  कोविड सेंटरला केलेली मदत ही सामाजिक जबाबदारीचे भान जपणारी व तरुणाईसाठी हा प्रेरणादायी उपक्रम आहे. जनसामान्यांना भक्तीच्या माध्यमातून जोडून सामाजिक बांधिलकी जपत चांगले सामाजिक उपक्रम राबवणे हा माणुसकी समृद्ध करणारा प्रवास आहे." अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र गर्जना न्यूजचे संपादक अजित जगताप यांनी दिली.




कोरोना महामारीच्या काळात सोशल मीडियाचा विधायक कार्यासाठी, सामाजिक उपक्रमांसाठी कसा उपयोग करता येऊ शकतो? हे आदर्श उदाहरण "श्रीनाथ म्हस्कोबा वीर, या व्हाट्सएप ग्रुपने समाजासमोर कृतीतून दाखवून दिलेले आहे.