Sunday, February 28, 2021

करोना, जुनी लोकं आणि "वीरची पारंपारिक यात्रा" रविवार विशेष लेख...



करोना, जुनी लोकं आणि वीरची पारंपरिक यात्रा...


मागच्या वर्षी वीर गावची यात्रा संपली आणि लॉकडाऊन पडलं. लोकांनी आंगचा गुलाल नुकताच पुण्या-मुंबईत जाऊन उतरवला होता तोच सगळं बिऱ्हाड घेऊन लोकं परत गावाला आली. गरम पाणी, चहा, काढा पिणं सुरू झालं नंतर परत गावच्या वेशी बंद झाल्या, नंतरचे काही दिवस तणावाखाली गेल्यानंतर एखादा रानबोका नजरेआड झाल्यावर सावधपणे चरायला बाहेर पडणाऱ्या  कोंबड्यांसारखी गावातली-वाड्यावस्तीतली म्हातारी माणसं बाहेर पडू लागली. थोडं तुटक का होईना बसून गप्पागोष्टी करू लागली, त्यांच्या पिढीला गप्पा मारायला आता पूर्वीसारख्या पडव्या, सपराची घरं राहिली नव्हती हा भाग वेगळा पण त्यांना एखादी झाडाची सावट पुरेशी असते आपल्या सारखं AC, पंखा यावर त्यांचं सुख लटकलेलं नसतं.





त्यांच्याकाळात पण रोगराई भरपूर होती पण लॉकडाऊन चा प्रकार नव्हता. गावच्या गावं प्लेग सारख्या रोगांमुळं बसायची पण माणूस दिसल्यावर दार लावायची अघोरी प्रथा त्यांना मान्य नव्हती. त्यामुळं घडल्या प्रकाराला आत्ताच्या पिढीला दोष देणं आलंच. अगदी शिव्यांचा पाऊस पडत होता. आम्ही समोर आलो की "आमचा जमाना असला नव्हता" म्हणत डोळे खालीवर फिरायचे, काहींच्या शिव्या ऐकू यायच्या काहींचे फक्त ओठ हालायचे. बरेच जण फक्त नजरेतून व्यक्त व्हायचे.





तसा विषय गंभीर असला तरी त्यात चूक कुणाची? ना त्यांची ना आपली. मधमाश्या फक्त दगड मारणाऱ्यालाच चावतात असं नाही, जो वाटेत येईल तो शिकार होतो. आमच्या पिढीचं थोडं तसं झालंय. बघता बघता गणपती, दसरा, दिवाळी हे सण आले नी गेले. घरगुती गोड धोड करून नावाला हे सण सगळ्यांनी साजरे केले, इंग्रजी वर्ष संपलं. पण जेव्हा मांढरदेवी यात्रा रद्द झाली तेव्हा मात्र गावाकडच्या लोकांच्या मनाची चलबिचल झाली. बघता बघता वीरची यात्रा पण रद्द होणार अशा चर्चा सुरू झाल्या आणि एकदिवस त्यावरसुद्धा शिक्कामोर्तब झाला. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा योग्य निर्णय होता.





करोनाचा हा सर्वात मोठा फटका असं म्हणायला हरकत नाही. सर्व वयोगटातल्या लोकांना दुःख झालं. आपल्या पिढीनं सोशल मीडियावर भावनेला वाट करून दिली, पोस्ट पडल्या, व्हाट्सएपवर स्टेटस अपडेट झाले पण सध्या वयाची सत्तरी ते ऐशी गाठलेली किंवा शाळेत जाणारी ज्यांना सोशल मीडिया माहिती नाही ही लोकं कुठं व्यक्त होणार? एरव्ही जमान्यांवरून चालणाऱ्या गप्पा आपण हसण्यावारी घेतल्या पण आता थोडं वाईट वाटलं. वीर गावची यात्रा ही वीरगावची विशेष ओळख आहेच पण त्याबरोबर पंचक्रोशीतील गावं, राज्यातील विविध जातीधर्माचा समाज यांच्या श्रद्धेचा हा विषय.




 

इतिहासात हे पहिल्यांदाच घडतंय की वीरची यात्रा रद्द झाली. जुन्या पिढीमध्ये प्रचंड घालमेल दिसतेय, उभ्या आयुष्यात मंदिर कधी एवढे दिवस बंद नव्हतं, ना देवदर्शनाचा, रविवारच्या छबिण्याचा शिरस्ता चुकला होता. देवदर्शनाशिवाय दिवसाची सुरुवात न करणाऱ्यांना कित्येक दशकानंतर ही परिक्रमा चुकवावी लागली.





शेकडो वर्षाची परंपरा, पिढीजात चालत आलेले रितीरिवाज सगळं आयुष्यभर जसंच्या तसं पाळणारी ही पिढी पूर्णपणे गोंधळून गेली. त्याबरोबर लहान-थोर आशा सगळ्या वर्गातील लोकांची निराशा झाली.




एका जत्रेनं देव म्हातारा होत नाही पण एका जत्रेशिवाय आपण एक वर्षांनी म्हातारे होणं परवडेल का? असा प्रश्न पडणं साहजिक आहे. कारण इतर गावच्या दोन दिवसांच्या यात्रेत आणि वीरच्या यात्रेत सगळ्या बाजूने फरक जाणवतो. त्याला बरीच कारणे आहेत.





यात्रा महिनाभरावर आली की गावाची सुरू होणारी लगबग अगदी लहान थोर सगळेच कामाला लागतात. घरांची रंगरंगोटी, सारवासारव, शेताच्या कामाचे नियोजन, शहराकडून गावाकडे पळण्याची घाई आणि त्यासाठी शाळेत, कॉलेजात, ऑफिसमध्ये माराव्या लागणाऱ्या थापा, गावकऱ्यांच्या, सालकऱ्यांच्या, मानकऱ्यांच्या बैठका, कोडीतकरांचा दहा दिवसांचा सराजम, गाव धुवून पर्यायी रस्ते बनवण्याची देवस्थानची घाई, आजूबाजूच्या गावातल्या लोकांची बैलगाडी सजवण्याची गडबड, बैलांची खरेदी विक्री आणि मांढरदेव च्या जत्रेहून हॉटेल, खेळणी दुकानांची विरला येऊन बस्तान मांडायची घाई या धांदलीत पौष महिना संपून जातो. 





बघता बघता गावाला लालसर रंग यायला सुरुवात झालेली असते. एरव्ही पहाटेच्या थंडीत पडणारं पांढरं शुभ्र दुखं लालसर होऊन जातं. दिवस सरतील तसा छबिना रंगाला येतो. मानाच्या काठ्या, सजवलेल्या पालख्या, गुलाल खोबऱ्याची उधळण, "चांगभलं"चा जयघोष, माणसांची गर्दी, पोलिसांची वर्दी, भुरट्या चोरांची हातघाई, लहान पोरांचे हट्ट, पापण्या, लाडू, जिलेबी, आइस्क्रीम, रेवड्या, मोठमोठाले पाळणे सर्व परिसर गजबजून जातो.




पाहुण्यांची ये जा सुरू होते वर्षभराच्या गाठीभेटी होतात. पोरांचा गलका, गुलालात माखलेली माणसं, छोटे मोठी दुकानं मांडून ज्याची त्याची चार पैसे कमवायची घाई, लहानपणीच्या शाळकरी मित्रांच्या गाठीभेटी आणि त्यांच्या चहापाण्यासोबतच्या गप्पांनी गजबजलेली हॉटेलं आणि तेवढयात श्रींनाथांची भाकणुक कानावर पडावी आणि हजारोंच्या गर्दीत एकच शांतता पसरावी असा एक प्रसंग... शेतकरी वर्गाने पावसाचा अंदाज ऐकण्यासाठी हात जोडून कानात प्राण आणावा. भाकनुक संपली की एकच मंदिराबाहेर पडणारी झुंबड आणि पुन्हा यात्रेचा गाजावाजा सुरू.





लाखोंच्या गर्दीत अगदी पद्धतशीर चाललेला हा कारभार ज्याचा माणूस म्हणून कोणी मालक नसतो. देवाच्या श्रद्धेपोटी लाखो भाविक एकत्र येतात आणि हा उत्सव पार पडतो. लाखोंची देवाणघेवाण होते, गरजा भागवल्या जातात, वस्तू नव्याजुन्या केल्या जातात, बैलगाड्या सजतात, घुंगरांचा खळखळाट करत रस्त्याने धावतात, कष्टकरी आयुष्यात विरंगुळा येऊन जातो आणि देव यातच तर लोकांना भेटत असतो. थोडक्यात वीरची यात्रा म्हणजे निखळ नुसती वहिवटलेली परंपरा नसून तो एक आनंदाचा सोहळा असतो.




सहाजिकच शेकडो वर्षापासून चालत आलेली परिक्रमा अचानक थांबली आणि त्यावर कोणाचा काहीच इलाज चालत नाही त्यामुळं सगळ्यांची एक वेगळीच घुसमट झाली आहे. यातून आपल्याला नक्कीच काही गोष्टी शिकाव्या लागतील. शिस्त आणि आरोग्याचं महत्व समजून घ्यावं लागेल. बाकी देवाच्या मनात जे आहे तेच होईल, ते बावन बिरदांचे धनी आहेत ही आपली धारणा आहे त्यामुळे करोनाच्या संकटातून त्यांच्या कृपेने आपण सगळे लवकर बाहेर पडू अशी प्रार्थना करूयात. 


लेखक - संगणक अभियंता  व श्रीनाथ म्हस्कोबा  भक्त अजय समगीर (बांदल)


Saturday, February 27, 2021

महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान क्षेत्र वीर येथे "श्रीनाथ म्हस्कोबा व जोगेश्वरी माता" यांचा "ऐतिहासिक लग्नसोहळा" पारंपारिक पद्धतीने संपन्न; कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून, मोजक्याच मानकरी, पाटील, पुरोहित यांच्या उपस्थितीत पार पडला लग्न समारंभ...


वीर, दि.२६ : - महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुणे जिल्ह्यातील,  पुरंदर तालुक्यातील  प्रसिद्ध देवस्थान क्षेत्र वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा व जोगेश्वरी माता यांचा ऐतिहासिक विवाह सोहळा कोरोना संकटाच्या  पार्श्वभूमीवर  नियमांचे पालन करून, मोजक्याच  मानकरी, पाटील, पुरोहित  यांच्या उपस्थितीत, फटाक्यांच्या आतिषबाजीत, उत्साहात, पारंपारिक पद्धतीने संपन्न झाला.




"महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशी क्षेत्र वीरची ऐतिहासिक यात्रा यावर्षी कोरोना सदृश्य परिस्थितीमुळे, पुणे जिल्हाधिकारी यांच्या संचारबंदीच्या आदेशामुळे रद्द केली असल्यामुळे फक्त ठराविक मानकऱ्यांच्या उपस्थितीत, कोरोनाची नियमावली पाळून, मंदिरामधील सर्व धार्मिक विधी पार पडले." अशी माहिती वीर देवस्थान ट्रस्टचे सचिव तय्यद मुलानी यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.





आज पहाटे ५ वाजता मंदिरात देवाची पूजा होऊन मुख्य गाभारा बंद करण्यात आला, सहा वाजता मुख्य गाभारा दर्शनासाठी खुला करून सकाळी देवाला अभिषेक करण्यात आले. यानंतर सकाळी १०.३० वाजता देवाला दहीभाताची पूजा बांधण्यात आली. दुपारी बारा वाजता धुपारती होऊन मंदिराचा मुख्य गाभारा बंद करण्यात आला. यानंतर दुपारी १ वाजून १५ मिनिटांनी मुख्य गाभारा दर्शनासाठी खुला करण्यात आला.





क्षेत्र कोडीतची काठी - पालखी घेऊन ठराविक मानकरी, ग्रामस्थ मंडळी यांचे सायंकाळी सात वाजता क्षेत्र वीर येथे आगमन झाल्यानंतर देवाची धुपारती घेऊन वीर गावचे मुकादम पाटील, ठराविक विश्वस्त व ग्रामस्थ मंडळी, मानकरी, दागिनदार, सालकरी मंडळी यांच्या उपस्थितीत त्यांना सन्मानाने भेटा भेट होऊन वाजत गाजत स्वागत करण्यात आले. 





यावेळी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवून, योग्य ती काळजी घेऊन व्यवस्थित नियोजन केले. यानंतर मानाची काठी पालखी स्थळावर स्थानापन्न झाली. रात्री ११.३० वाजता समस्त राऊत मंडळींच्या वतीने देवाला पोषाख करून, देवदेवतांना आवाहन करण्यात आले. श्रीनाथ म्हस्कोबा देवाच्या उत्सवमूर्ती पालखीत ठेवून ढोल ताशाच्या गजरात तसेच कोडीतचीही पालखी बाहेरून अंधारचिंच येथे आल्या.



यावेळी मानकऱ्यांना फुलांच्या माळा घालण्यात आल्या. वाई व कन्हेरी पालख्यांसह मानाच्या काठ्यांची भेटा भेट होऊन सर्व पालख्या देऊळवाड्यात आल्या.





एक मंदिर प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर चंद्रकांत ज्ञानोबा धुमाळ (मुकादम पाटील) यांच्या हस्ते विधिवत मंत्रोपचार होऊन रात्री 2 वाजून ३५ मिनिटांनी श्रीनाथ म्हस्कोबा  व जोगेश्वरी माता  यांच्या लग्न सोहळ्याला सुरुवात झाली. रात्री २:४५ ला लग्नाच्या सात मंगलाष्टका होऊन, लग्न सोहळा संपन्न झाला. यावेळी पुरोहित संतोष थिटे, दीपक थिटे, नंदकुमार थिटे, किशोर थिटे व श्रीकांत थिटे यांनी पौराहित्य केले. यानंतर सर्व काठ्या - पालख्या पारंपारिक प्रदक्षिणेसाठी गेल्या.






श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टमार्फत कोरोना नियमांचे पालन करून या लग्न सोहळ्यासाठी लाईट, जनरेटर, पालखी मार्ग व्यवस्थापन, विद्युत रोषणाई, परिसर स्वच्छता, आवश्यक कर्मचारी, स्वयंसेवक, ट्राफिक पोलीस इत्यादीचे आयोजन करण्यात आले होते. मंदिरात दिलीप धुमाळ मित्र परिवारातर्फे आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती.





यावेळी श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टचे चेअरमन संतोष धुमाळ, व्हाईस चेअरमन रवींद्र धुमाळ, विश्वस्त हनुमंत धुमाळ, अभिजीत धुमाळ, अमोल धुमाळ, नामदेव जाधव, शिवाजी कदम, संजय कापरे व सचिव तय्यद मुलानी या सर्व मंडळींनी देवस्थान ट्रस्ट तर्फे सर्व व्यवस्था पाहून उत्तम नियोजन केले.





" श्रीनाथ म्हस्कोबा देवाची सन २०२१ सालची यात्रा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे रद्द करण्यात आली आहे. गुरुवार दिनांक २५/०२/२०२१ ते ०९/०३/२०२१ या काळात क्षेत्र वीर येथे शासनाचे कलम 144 लागू करण्यात आले असून भाविकांनी या काळात क्षेत्र वीर येथे येऊ नये." असे आवाहन श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष धुमाळ यांनी केले.





" लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या क्षेत्र वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा देवाची यात्रा यावर्षी कोरोना सदृश्य परिस्थितीमुळे रद्द झाल्यामुळे अनेक भाविकांना दुःख झाले पण भाविकांनी आरोग्याची काळजी घेणे सर्वात महत्त्वाचे आहे. त्यामुळे शासनाच्या आदेशाचे सर्वांनी पालन करणे गरजेचे आहे." अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार शिवदास शितोळे यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.




" महाराष्ट्रातील अठरापगड जाती-जमातींमधील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले क्षेत्र वीर येथील श्रीनाथ म्हस्कोबा देवाची यात्रा यावर्षी कोरोना सदृश्य परिस्थितीमुळे, जिल्हाधिकाऱ्यांच्या संचारबंदीच्या आदेशामुळे रद्द झाल्यामुळे लाखो भाविकांच्या काळजाचा ठोका चुकला.  कोरोना महामारीचे संपूर्ण जगावरती संकट असल्यामुळे, महाराष्ट्रातील सर्वच नागरिकांनी, भाविकांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. क्षेत्र वीर येथे शासनाचे कलम 144 लागू केल्यामुळे भाविकांनी यात्राकाळात वीर येथे येऊ नये तसेच शासनाचे सर्व आदेश पाळावेत." असे आवाहन महाराष्ट्र गर्जना न्यूजचे संपादक अजित जगताप यांनी केले.





कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्वच नागरिकांनी व भाविकांनी शासनाच्या आदेशाचे पालन केले पाहिजे.



Friday, February 26, 2021

महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान क्षेत्र वीर येथे "श्रीनाथ म्हस्कोबा व जोगेश्वरी माता" यांचा हळदी समारंभ पारंपारिक पद्धतीने संपन्न; कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून, मोजक्याच मानकरी, सुवासिनींच्या उपस्थितीत पार पडला हळदी समारंभ...



वीर, दि.२५ : - महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील  पुरंदर तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान  श्री क्षेत्र वीर येथील पारंपारिक, ऐतिहासिक यात्रा यावर्षी कोरोना  सदृश्य  परिस्थितीमुळे पुणे जिल्हाधिकारी यांच्या  संचारबंदीच्या आदेशामुळे रद्द केली असल्यामुळे श्रीनाथ म्हस्कोबा व जोगेश्वरी माता यांचा हळदी समारंभ कोरोना  संकटाच्या  पार्श्वभूमीवर  नियमांचे पालन करून, मोजक्याच मानकरी व सुवासिनींच्या उपस्थितीत पारंपारिक पद्धतीने पार पडला.




"कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थानची यात्रा यावर्षी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे रद्द झाली असल्यामुळे फक्त ठराविक मानकऱ्यांच्या उपस्थितीत, कोरानाची नियमावली पाळून, मंदिरामध्ये सर्व धार्मिक विधी पार पडले. अशी माहिती वीर देवस्थान ट्रस्टचे सचिव तय्यद मुलानी यांनी दिली.




आज २.३० वाजता नियोजित देवाचे मानकरी व राऊत मंडळी देऊळवाड्यात आले, वाजत गाजत सन्मानाने देवाची हळद मंदिरात आणली व विधीवत पूजा होऊन पोशाख व फुलांची मंडवळी देवाला बांधण्यात आली.




आज ठराविक प्रवेश पात्र राऊत मंडळींच्या मानकरी सुवासिनींच्या वतीने दुपारी तीन वाजता श्रीनाथ म्हस्कोबा  व  जोगेश्वरी माता  यांना  हळद लावण्यास सुरवात झाली. यावेळी प्रवेश पात्र, ठरवून दिलेले मुकादम पाटील, विश्वस्त, मानकरी, दागिनदार, सालकरी हजर होते. रात्री ९.३० वाजता धुपारती होऊन मंदिराचा मुख्य गाभारा बंद करण्यात आला.




" श्रीनाथ म्हस्कोबा देवाची सन २०२१ सालची यात्रा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे रद्द करण्यात आली आहे. गुरुवार दिनांक २५/०२/२०२१ ते ०९/०३/२०२१ या काळात क्षेत्र वीर येथे शासनाचे कलम 144 लागू करण्‍यात आले असून भाविकांनी या काळात क्षेत्र वीर येथे येऊ नये." असे आवाहन श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष धुमाळ यांनी  केले.




कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्वच नागरिकांनी व भाविकांनी शासनाच्या आदेशाचे पालन केले पाहिजे.





Thursday, February 25, 2021

बारामती तालुक्यातील "वाकी" गावच्या सरपंचपदी किसन बोडरे तर उपसरपंचपदी ज्येष्ठ नेते हनुमंत जगताप यांची बिनविरोध निवड...

 


बारामती, वाकी, दि.२५ : - बारामती तालुक्यातील वाकी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी किसन बोडरे तर उपसरपंचपदी ज्येष्ठ नेते हनुमंत जगताप यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी बी. ए. कांबळे यांनी दिली.



बारामती तालुक्यातील वाकी गावाने ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करून गावचा एकोपा टिकवून, गावच्या सर्वांगीण विकासासाठी एक चांगले पाऊल टाकले.





वाकी ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीमध्ये इंद्रजीत भुजंग जगताप, किसन दशरथ बोडरे, हनुमंत मानसिंग जगताप, सुधीर दिलीप गायकवाड, सुनिता लक्ष्मण जगताप, निकिता अनिल भंडलकर, वर्षाराणी सुनील जगताप, शालन विठ्ठल जगताप, कल्पना गोरख जगताप यांची ग्रामपंचायत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली.





" वाकी गावातील ग्रामस्थांनी, नवनियुक्त सदस्यांनी व जेष्ठ नेत्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थकी लावून गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार "असल्याची  प्रतिक्रिया वाकी गावचे नवनियुक्त सरपंच किसन बोडरे यांनी महाराष्ट्र गर्जना न्युजशी बोलताना दिली.




" वाकी गावातील ग्रामस्थांनी दिलेला बिनविरोध निवडीचा कौल  गावातील एकोपा दाखवणारा व गावच्या विकासासाठी दाखवलेला विश्वास आम्हा सर्वांनाच ऊर्जा देणारा आहे. गावासाठी चांगले विकास कार्य करून वाकी गावाला विकासाच्या एका चांगल्या उंचीवर घेऊन जाण्याचा आम्ही सर्वजण प्रयत्न करू." अशी प्रतिक्रिया वाकी गावचे ज्येष्ठ नेते  व नवनियुक्त उपसरपंच हनुमंत जगताप यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.





" वाकी गावचे बिनविरोध निवड झालेले सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचे मनापासून अभिनंदन, वाकी गावच्या सर्वांगीण विकासासाठी हे सर्वजण प्रामाणिकपणे प्रयत्न करून गावासाठी एकजुटीने चांगलं विकास कार्य करतील अशी आम्हाला खात्री आहे." अशी प्रतिक्रिया वाकी गावचे माजी सरपंच हनुमंत गाडेकर यांनी महाराष्ट्र गर्जना न्यूजशी बोलताना दिली.





" वाकी गावातील ग्रामस्थांनी ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करून जो विश्वास दाखवला आहे तो सार्थकी लावून नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्य, सरपंच व उपसरपंच यांनी ग्रामस्थांच्या मूलभूत समस्या सोडवून एक चांगल्या प्रकारचं विकास कार्य गावामध्ये करून आदर्श गाव निर्माण करण्याचे प्रयत्न सर्वांनी केले पाहिजे." अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र गर्जना न्यूजचे संपादक अजित जगताप यांनी दिली.





वाकी गावातील सुशिक्षित तरुण वर्गही उपमुख्यमंत्री  अजित पवार  यांच्या मार्गदर्शनाखाली गावच्या विकास कार्यासाठी विशेष लक्ष घालून पाठिंबा देत असतो.

Tuesday, February 23, 2021

"पोहरादेवी येथील गर्दीबाबत प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी; कोविडसंदर्भात आरोग्याचे नियम सर्वांना सारखेच" – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 

मुंबई, दि. 23 : वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे आज सकाळपासून झालेल्या गर्दीबाबत माध्यमांत येत असलेल्या बातम्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली असून कोविडच्या काळात अशा रीतीने आरोग्याचे नियम न पाळता गर्दी होत असेल तर संबंधितांवर जिल्हा व पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी दिले आहेत तसेच वाशीम जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना याचा अहवाल देण्यास सांगण्याच्या सूचना मुख्य सचिवांना दिल्या आहेत.




 राज्यातील कोविड परिस्थितीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी वर्षा येथे बैठकीत आढावा घेतला तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील महानगरपालिका आयुक्तांशी देखील संसर्ग रोखण्यासंदर्भात करीत असलेल्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले.





मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, "गेले वर्षभर आपण अतिशय संयमाने व निर्धाराने कोविडची लढाई लढत आहोत. आपले अनेक आरोग्य कर्मचारी, पोलीस तसेच प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी जीवावर उदार होऊन हा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या संपूर्ण काळात सर्व महत्त्वाचे धार्मिक सण आणि उत्सव नागरिकांनी शांततेत आणि शासनाने आखून दिलेल्या नियमाप्रमाणे पार पाडले. या काळात मोठमोठी धार्मिक स्थळे देखील नियमांचे पालन करीत होती आणि आता देखील मिशन बिगीन अगेनमध्ये या कार्यपद्धतीचे पालन करणे आपली जबाबदारी आहे."





मी परवाच माझ्या सोशल मीडिया लाईव्हच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या धार्मिक, राजकीय, सामाजिक कार्यक्रमांना परवानगी मिळणार नाही हे याचसाठी सांगितले कारण कोरोनाची दुसरी लाट येणे आपल्या सगळ्यांसाठी काळजीचा विषय आहे. शासन संकटाचा सामना करण्यासाठी तयार आहेच पण नागरिक म्हणून प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी पण आहे हे सर्वानी लक्षात ठेवावे, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.




Sunday, February 21, 2021

"शेतकऱ्यांनो जागे व्हा ..पुन्हा लाॅकडाऊन म्हणजे... आपल्याला देशोधडीला लावण्याचा प्रकार..." - महाराष्ट्रातील एका प्रगतशील शेतकऱ्याचा आणि अभ्यासू पत्रकाराचा रविवार विशेष लेख...




शेतकऱ्यांनो जागे व्हा ..पुन्हा लाॅकडाऊन म्हणजे... आपल्याला देशोधडीला लावण्याचा प्रकार...

'पुन्हा लॉकडाऊन होणार ?' अशा मथळ्याच्या बातम्या कृपा करून पेरू नका, तुमच्या शक्यता तुमच्याच डोक्यात ठेवा. फक्त जीव गेला म्हणजे मरण नसतं तर पोटच्या लेकरासारखं वाढवलेलं पिक जेव्हा तुमच्या अचुक निर्णयामुळे शेतातच फेकून द्यावं लागतं ते सुध्दा मरण असतं. हे मरण मागच्या लॉकडाऊन मध्ये अनेक शेतकऱ्यांसह इतर व्यवसायिकांनी भोगलंय. 




ए.सी मध्ये बसून तुम्हाला निर्णय घेणं सोप्पं असतंय पण रात रात जागून पाणी दिलंय शेतकऱ्यांनी, मागील वर्षीचं पिक मातीत पुरून टाकलंय. कोरोना पेक्षा जास्त लॉकडाऊनमुळे माणसं मेली आहेत ती आकडेवारी तशीच खुंटीला टांगून ठेवली तुम्ही. दुसऱ्या लॉकडाऊनचा अविचारी निर्णय घेऊ नका ही विनंती.




लॉक डाऊन मध्ये जरी सरकार शेतमाल विक्रीला परवानगी देत असेल तरी व्यापारी मात्र फक्त लॉकडाऊनचे कारण सांगून शेतकऱ्यांकडून कवडी मोल किमतीने माल विकत घेतात. शेतकऱ्याचा दहा रुपये किंमतीचा माल लोकांच्या उंबऱ्यापर्यंत जाईस्तोवर शंभर रुपयांचा होतो. फायदा कुणाला ? तोटा कुणाला ?




इलेक्ट्रॉनिक मिडियाला कळकळीची विनंती, सरकारच्या ध्यानी मनी नसलेल्या गोष्टी 'शक्यता' या शब्दाच्या आधारावर लक्ष्यात आणून देऊ नका. टीव्ही वर सतत चालणाऱ्या बातम्या बघून तुमच्या दबावाने सुद्धा सरकार निर्णय घायची तयारी करेल अर्थात तुमची तेवढी ताकद असते म्हणून म्हणलं.




तरीबी सरकारला लॉकडाऊन करायचे असेल तर शेतकऱ्यांच्या शेतावर पिकून तयार झालेल्या मालाची बाजार भावानुसार किंमत ठरवून ती शेतकऱ्यांच्या अकाउंटवर जमा करा किंवा शेतकऱ्यांना सामूहिक आत्महत्या करायची तरी परवानगी द्या. साहेब, आता रोगापेक्षा ईलाजच भयंकर वाटायलाय.




सरकार,

"रानात पीक तयार हाय, आशील माल हाय समदा. लंय कष्टानं पोसलाय, आता जर हे लॉकडाऊनचं पीक मदीच उगीवलं तर कोरोना हुन म्या मरल का नाय माहीत नाय पण तोंडचा घास दुसऱ्यांदा गेल्यावर मातूर नक्की मरल, ईचार करा" - शेतकरी 🙏🏽


लेखक : - प्रगतशील शेतकरी, अभ्यासू पत्रकार शिवाजी हळणवर.