शेतकऱ्यांनो जागे व्हा ..पुन्हा लाॅकडाऊन म्हणजे... आपल्याला देशोधडीला लावण्याचा प्रकार...
'पुन्हा लॉकडाऊन होणार ?' अशा मथळ्याच्या बातम्या कृपा करून पेरू नका, तुमच्या शक्यता तुमच्याच डोक्यात ठेवा. फक्त जीव गेला म्हणजे मरण नसतं तर पोटच्या लेकरासारखं वाढवलेलं पिक जेव्हा तुमच्या अचुक निर्णयामुळे शेतातच फेकून द्यावं लागतं ते सुध्दा मरण असतं. हे मरण मागच्या लॉकडाऊन मध्ये अनेक शेतकऱ्यांसह इतर व्यवसायिकांनी भोगलंय.
ए.सी मध्ये बसून तुम्हाला निर्णय घेणं सोप्पं असतंय पण रात रात जागून पाणी दिलंय शेतकऱ्यांनी, मागील वर्षीचं पिक मातीत पुरून टाकलंय. कोरोना पेक्षा जास्त लॉकडाऊनमुळे माणसं मेली आहेत ती आकडेवारी तशीच खुंटीला टांगून ठेवली तुम्ही. दुसऱ्या लॉकडाऊनचा अविचारी निर्णय घेऊ नका ही विनंती.
इलेक्ट्रॉनिक मिडियाला कळकळीची विनंती, सरकारच्या ध्यानी मनी नसलेल्या गोष्टी 'शक्यता' या शब्दाच्या आधारावर लक्ष्यात आणून देऊ नका. टीव्ही वर सतत चालणाऱ्या बातम्या बघून तुमच्या दबावाने सुद्धा सरकार निर्णय घायची तयारी करेल अर्थात तुमची तेवढी ताकद असते म्हणून म्हणलं.
सरकार,
"रानात पीक तयार हाय, आशील माल हाय समदा. लंय कष्टानं पोसलाय, आता जर हे लॉकडाऊनचं पीक मदीच उगीवलं तर कोरोना हुन म्या मरल का नाय माहीत नाय पण तोंडचा घास दुसऱ्यांदा गेल्यावर मातूर नक्की मरल, ईचार करा" - शेतकरी 🙏🏽
लेखक : - प्रगतशील शेतकरी, अभ्यासू पत्रकार शिवाजी हळणवर.
ज्वलंत विचार आहेत...,
ReplyDeleteपण गेंड्याच्या कातडीचे सरकार मुळावर उठून अन्याय करायला लागल्यावर न्याय मागायचा तो कुणाकडे...?